Thursday, November 26, 2020

समुद्रीची 'कातरवेळ'...!!!

सांजवेळी नभी रंग उधळती,
पाखरं मनसोक्त हुल्लड घालती,

वारा समुद्रीचा, पानासंगी शीळ वाजवतो,
मनी विचारांचे तरंग उठवतो,

दूर देशीचा तो थंडगार वारा,
आजही आणतो अंगावरी शहारा,

पश्चिम क्षितिजावर सूर्य विसावतो,
अनामिक हुरहुरीचे वावटळ उठवतो,
लाटांना सोनेरी साज चढतो,

त्या किनाऱ्याला आलिंगन देती,
तेव्हाच हृदयाला कंपने भासती,

उडवून फवारे आठवनींचे,
नाही विसरत चिंब करायचे,

जरी पुसली लाटांनी नावं त्या रेतीवरची,
नाही विसरली आठवण त्या भेटीची,

कौतुक या समुद्राचंच वाटतं,
लाटांचं उन्मळून येणं,
किनाऱ्याचं झेलत राहणं,
आतल्या आत तुटत राहणं, 
नवं त्या समुद्राला नसतं,

असंख्य कहाण्या शांतपणे पोटात घेतो,
अनेक प्रेमाचा-विरहाचा साक्षी बनतो,

तेव्हांच निरोपाचा क्षण येतो,
टांगेवाला टाच मारितो,
टप-टप-टप करत आठवणींच्या गावा जातो,
'तो' किनारा 'ती' लाट मागे सोडीतो,
नव्या किनाऱ्याच्या नव्या लाटेच्या शोधात दौडतो....!!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃



'ति'च्या कल्पनेचा 'तो'...!!


जेव्हा कधी एकटी होती,
तेव्हा तेव्हा साथ मात्र त्याची होती,

आलीच आसवं कधी नयनी,
सावरून त्याने जपली तळहातांनी,

तिचा भाव मनीचा,
क्षणात तो जाणायचा,

हरवली नाही कधीच ती विचारांच्या गर्दीत,
नसला बरोबर, तरी तोच होता तिच्या आठवणीत,

एकटी असताना आभासातील भास होता,
तिच्या बडबडीचं हक्कांच व्यासपीठ होता,

रणरणत्या उन्हात सावली होता,
भर पावसात त्याचा हात हाती होता,

तो विश्वासाचं दुसरं नाव होता,
काळजी करण्याचा त्याचाचं प्रण होता,

कधी एकटं तिला वाटलंच नाही,
कारण त्याने कधी साथ सोडलीच नाही,

असाच होता तर,
तिच्या मनीचा राजकुमार,

जरी नसला प्रत्यक्षात,
पण तिच्या मात्र होता स्वप्नात,

#तिच्या_कल्पनेचा_तो
#जिंदगी_का_फ़ंडा🍃






Monday, November 9, 2020

अल्लड पाऊस....!!

डाव जो मांडला होता,
खेळ तो रंगला होता.

एक एक आठवण मनात साठवली होती,
प्रत्येक क्षणांची लघोर रचली होती,
पण रचता रचताच ती कोसळी होती.

आजही पडतो पाऊस अंगणी,
आजही भिजते नयनीची पापणी.

काळ लोटत आहे पाऊस पडत आहे,
बेधुंद पडणारा पाऊस खिडकीतून दिसतो आहे.

पण आतश्या पाऊस नाही करत 'चिंब' भिजल्यावर,
ज्या पावसात नाही दिसत 'थेंब' नयनातून पडल्यावर.

तो पडतो प्रेमभराने,
 देवूनी दुःख विरहाचे.

झाडाच्या पानांवरून पडणारा पाऊस,
पहिल्यासारखा भासत नाही.
गालांवरून घरंगळत येणारा थेंब,
अंगी शहारे उमटवत नाही.

पण तरीही भिजणं मात्र थांबलं नाही,
कधी अंगणी तर कधी मनोमनी.

आजही दिसते खिडकीतून भिजणारी 'ती',
आजही भासते मज अल्लड 'ती'.
पाऊस पडतो जसा झाडाच्या पानांवरून अंगणात
तसाच तिच्या गालावरून कल्पनेच्या कुंचल्यात....!!

#काल्पनिक😍
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, November 8, 2020

अण्णा आणि दादा..!!!

       'अण्णा' आणि 'दादा'(आजोबा): जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असेल तर या दोन अवलीयांचा..!!  वय नवद्दी पार केलेले 'दादा' तर आयुष्याचं अर्ध शतक पूर्ण केलेले माझे 'अण्णा'..

     'दादा' गौरवर्णीय, गळ्यात मोठ्या मण्यांच्या तुळीशीच्या दोन माळा, त्याला टपोरे रुद्राक्ष..!! कपाळी शोभेल असा अष्टगंध, डोईवर पालखुर प्रकारातला लाल फेटा,अंगात तीन बटनांचा नेहरू आणि पायाच्या गोठ्यापर्यंत धोतर अन् पायात चामडी जोडे..! एकंदरीत तुकोबांसारखा पेहराव.पाठीचा कणा ताठच होता, पण आता वय झाल्याने शरीर थकलं होतं त्यामुळे आता थोडे झुकले होते.वयानुसार केस पांढरे झालेत, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात.पण त्या चेहऱ्यावरचं तेज आजही झळकतं.
दादांचा स्वभाव खुप रागीट-कडक, सव्हीस जणांच्या कुटूंबात त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोणी नसायचं. आवाजातील खणखणीतपणा, राकटपणा, हजरजबाबीपणा म्हणजे आजही तरुण तडफदारच... 


दादांच्या अगदी विरुद्ध स्वभाव माझ्या अण्णांचा...!!  दादांना काही थोडंस खटकलं की आकाश पाताळ एक करणारे तसे 'अण्णा' अगदी शांत स्वभावाचे.... 

     गांधी टोपी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा...!! गळ्यात तुळशीची माळ भाळी चंदनाच्या लेपावर लावलेला अष्टगंध. उंचीच्या मानाने पिळदार शरीरयष्टी एकंदरीत अगदी विलोभनीय व्यक्तिमत्त्व....!!

     'दादा' आणि अण्णांच्या स्वभावातील तफावतीबरोबर जुळवून घ्यायचं म्हणजे मोठी कसरतच... एकाच प्रसंगावर दोन वेगवेगळे मत प्रवाह स्पष्ट दिसायचे-जाणवायचे आणि यामुळे त्या प्रसंगाचे आयाम कळण्यास कायम मदत होऊन, कोणतं योग्य आणि कोणतं अधिक योग्य याची जाण लवकर आली.

     दोघेही अध्यात्माशी जोडलेले एवढंच काही साम्य होतं. त्यामुळे अध्यात्म लवकर अंगवळणी पडलं...दादांचा भल्या पहाटेचा हरिपाठ आजही मंत्रमुग्ध करतो.सकाळची सुरवात प्रसन्न होते.


     मी लहान असताना 'दादा' वेगवेगळ्या गावांना भेटीगाठी घ्यायला जाताना मला कायम सोबती घेऊन जायचे.... त्यात त्यांच्या मित्रमंडळी जोडण्याची कसब, ओळखी वाढवणं.. बोलताना कसं बोलावं, दोन शब्द बोलावे पण अगदी मनाच्या तळघरातून, सांगावं तर चांगला विचार...!! गावातल्या पंचांबरोबर झालेल्या गप्पा त्याकाळी कळत नसायच्या. पण शांत बसून ऐकायचं आणि जमेल तितकं समजून घ्यायचं, जे कळलं नसेल ते प्रवासादरम्यान दादांना प्रश्न विचारून-विचारून भांडावून सोडायचं हा आठवड्यातून एकदाचा दिनक्रम आणि यामुळे चांगल्या माणसांची एक सुंदर साखळी निर्माण करायची, ओळखी वाढवून चांगलं-वाईटाची जाण लवकर आली . अनोळखी माणसांनाही आपुलकीने बोलावे, कधी कोणास वाईट बोलून मन दुःखी करू नये, तोडून बोलू नये या गोष्टी आपोआपच दादांमुळे अंगवळणी पडत गेल्या. नंतर कितीतरी दिवस दादांचा सोबती,  एक मित्र बनून मीच असायचो. काही काळानंतर काही कारणास्तव आमची सोबत सुटली, भेट दुर्मिळ झाली. पण जेव्हा कधी भेटलो तेव्हा पुन्हा त्याच मैत्रीपूर्ण नात्याने भेटायचो.कधी वाट चुकवून दादा परतायचे मग माझा त्रागा व्हयचा, घर डोक्यावर घ्यायचो...!!

तसे माझे 'अण्णा'
      तसे'अण्णा', माझे खूप जवळचे प्राणप्रिय मित्रच. लहान असताना अंगणात उभा राहून शेतात गेलेल्या बापाला हाक मारण्यासाठी या मुखातून पहिले शब्द बाहेर पडेल ते म्हणजे "अण्णा".
     माझी बालपणात अण्णांबरोबर सायकल सवारी असायची त्यांच्या सायकलच्या नळीवर टॉवेलने गुंडाळून माझ्यासाठी 'अण्णा' छान बैठक लावायचे आणि आमची सवारी दिवस-दिवस फिरत असायची. त्यांच्या बरोबरच्या या प्रवासाची सर आताच्या कोणत्याच सवारीला येणार नाही. माझ्यासाठी पतंग बनवणं, मातीचे बैल बनवणं , जोंधळ्याच्या काड्यांपासून बैलगाडी, लिंबाच्या काड्यांपासून बनवलेली अंगठी, अण्णांच्या खांद्यावर बसून आख्खी यात्रा पहिली, आख्खा बाजार खांद्यावर बसून पहिला आणि 'अण्णा' बाजाराची पिशव्या सांभाळत मला सगळ्यात उंच असल्याचा, आकाश ठेंगणे झाल्याचा भास द्यायचे आणि मी टाळ्या वाजवल्यावर त्या रणरणत्या उन्हातही अण्णांचा चेहरा आनंदाने फुलून जायचा.अशी कितीतरी मोठी यादी आहे.
     म्हणजे अण्णांविषयी काय सांगावं शब्दच सुचत नाहीत पण तोडक मोडक बोलणं इष्टच...
     आईच्या सांगण्यानुसार 'अण्णा' त्यांच्या धामधुमीच्या काळात खूप रागीट आणि कडक स्वभावाचे होते.
     पण आता खूप आमूलाग्र बदल झालाय.'अण्णा' म्हणजे शांत तितकाच संयम यांचा अप्रतिम मिलाफ.
     रागात पटकन कोणी काही बोलून गेलंतरी चेहऱ्यावरचा निरागस भाव पाहून रागावणाराच कुचंबून, झालेली चूक आपोआप लक्षात येऊन गप्प बसायचा. 'अण्णा' कधी समजावुन सांगण्यात ऊर्जा वाया लावत नाहीत कृतीतून योग्य ती गोष्ट सांगून देतात.
     कितीही राग आला, एखादी गोष्ट आवडली नसलीतरी पटकन कधी सांगत नाही, म्हणत नाहीत हे चुकीचं आहे, ते पटलं नाही. पण कृतीतून योग्य संदेश द्यायची कसब आकर्षकच...

     मध्यंतरीच्या काळात खूप वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. एकाचवेळी खूप जीवघेणे प्रसंग आले.खूप आघाड्यांवर लढाई करावी लागली. आजपर्यंतच्या प्रवासात अण्णांना एवढं निराशावादी किंवा खचलेलं पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच चेहऱ्यावर चिंता दिसली होती.पण काळ सरत गेला, गढूळ झालेलं पाणी निवळत गेलं आणि पुन्हा माझे आण्णा पूर्वपदावर येतायत काळ जाईल तसं व्यवस्थित होईल या आशेवर...!!!

                   असे कसे 'अण्णा' तूम्ही,
                   कधीच थांबला नाहीत..!!
        आलाच थकवा तर कधी बोलला नाहीत,
       आमच्यासाठी तुमची स्वप्न स्वप्नंच ठेवलीत,
                 तीच स्वप्न लेकरात पाहिलीत,
                      पोटाला चिमटा काढून,
                    लेकरांची हौस भागवलीत..!!
                      असे कसे 'अण्णा' तूम्ही,
           कधीच थांबला नाहीत..!!  
                             तूम्ही तर अखं आयुष्य वेचलत,                                            
असे माझे 'अण्णा' माझ्यासाठी दिवसाची रात्र केली, दुःख पचवली, कृतीतून संस्कारच बीजं रोवलीत, समाजाचं काही देणं लागतो याच भान दिलं, जमेल तितकं चांगलं वागायचं हे रक्तात भिनवलत.

शतशः प्रणाम....!!तुमच्या अंशाएव्हढी सर येवो!!!

#'अण्णा'_'दादा'❤️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, November 6, 2020

प्रवास...!!

आयुष्य हा एक प्रवास आहे,
ज्याची सुरवात अन् शेवट,                                  
एकट्यानेच सूरु होऊन एकट्यानेच संपतो...!!

त्या प्रवासाला आंनदायी कसं बनवायचं,                             

 हे पांथस्थ्याच्या चालण्यावर निर्भर असतं.                  प्रवासाचा महोत्सव करता यावा..!!

या वाटेवर रमतगमत चालायचं , वळणावर थांबायचं , चढ उतार आल्यावर वेग आवरायचा, भरभरून आस्वाद घ्यायचा....!!

आनंदाची फुले वेचायची, वेचताना ठेच लागली तरी पुन्हा उठायचं, ठेच देणाऱ्याचे आभार मानून, प्रवासाचा आनंद अनुभवत चालत राहायचं दिगंतरापर्यंत ......!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, October 30, 2020

चंद्र आहे साक्षीला..!!

चंद्र आहे साक्षीला,
तुझ्या माझ्या भेटीला,

लख्ख चांदणं अंगणी शिपलं होतं,
अंधाराला मनीच्या दूर पळवलं होतं,

तुझा हात हाती घेताना चांदणीही लाजली होती,
मिचकावीत डोळे गालातल्या गालात हसली होती,

ती थंड वाऱ्याची झुळूक होती,
तेव्हांच गवताची पाती शहारली होती,

पहाट होता होता दवबिंदूंनीं नाहली होती,
तेव्हांच सूर्यकिरणांनीं चमकली होती,

ती रात पुनवेची होती,
तिची त्याची मिठी घट्ट होती,

जशी कलेकलेने पुनव सरत गेली,
तशी तिची त्याची साथ सुटत गेली,

आजही येते भेटीला मनातल्या मनात,
पूनवेच्या रातीला कल्पनेच्या कुंचल्यात..!!!

#काल्पनिक
#कोजागिरी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, October 19, 2020

स्मशान....!!

 
    एखाद्या संध्याकाळी स्मशानातून एक फेरी मारून
तर पहा काय दिसेल....!! ऐशोआरामी अगदी श्रीमंतीत जन्मलेला आणि गरीबीत हालाकीत दिवस कठवलेला वेगळा भासत नाही.उच-नीच यांच्यात काही फरक जाणवत नाही, थोर-मोठा, जाती-धर्म ही असली लेबले स्मशानाच्या दारांतच गळून पडलेली दिसतील.

     कालपर्यंत एका वेगळ्याच आविर्भावात असणारे इथं येऊन शांत झाले, नाहीसे झाले, मातीचे झाले.

     काही लाखांच्या गाडीत बसणारा, luxurious life जगलेला आणि अनवाणी पायांनी दगड-धोंड्यांच्या वाटेवर कसाबसा चालत असलेलाही इथं येऊन एकत्र झाले, मिसळले.

     आता ही माती त्यांची वेगळी ओळख देत नाही. 'हि' अमुक-अमुक श्रीमंतांची, 'ही' अमुक-अमुक गरिबाची असं काही-काही सांगत नाही.

     'मी', 'माझं', 'मला' म्हणत खूप जगलं गेलं. पण आज-आजतर एका कोपऱ्यात असहाय बनून एक निरूपयोगी गोष्ट झालेली दिसेल.

     कालपर्यंत पुढे-मागे लुडबुड करणारे, माझे म्हणवणारे सगळे सोबतीला होते , क्षणभर ही उसंत देत नव्हते.आणी आज तीच माणसं...बॉडीला माती होण्याचीही वाट न पाहता पाठ दाखवून निघून गेले.

                      इथं कशाचाचं भेदभाव नाही.
                      ना जातीचा ना धर्माचा, 
                      सगळे सारखेच झाले.

     मग आजपर्यत जी धडपड झाली, मी काही वेगळा आहे हे दाखवण्यासाठी धावाधाव झाली,
या धावाधावीत काही सुटले गेले, काही सोडले गेले.
आपल्याच खांद्याला-खांदा लावून चालणाऱ्यांना खड्यात लोटलं, कधी आपण लोटले गेलो.
का...?? हे कश्यासाठी अंतिमतः तर सगळेच पाठ फिरवून निघून गेले. त्या गर्दीतही दिसले.-.

                   काही बळेच आसवं ढाळत होते,
                   काही नुसतंच नाटक करत होते,
                   काही मान खाली घालून गर्दीत चालत होते,
                   काही तर आजही निर्विकारच होते.

     आज सद्गुणांचा खुपचं उदो-उदो झाला, कोणाला दुर्गुण दिसलाच नाही..? सगळेच 'चांगला होता' हे बिरुद लावत होते.
थोड्यावेळ मलाच शंका यावी हे माझ्यासाठी आहे का..? पण जवळ तर दुसरी बॉडी दिसत नव्हती. हो-हो बॉडीचं थोड्यावेळा पूर्वीचा जिवंत जीव 'बॉडी' या प्रवर्गात मोडतोय.
जे घडत होतं ते जरा अनपेक्षितच वाटत होतं.

     स्मशानातून फेरी मारताना उच-नीच, जात-धर्म, कुळ यांचा जरी भेदभाव दिसत नसलातरी,
     या मातीत प्रकर्षाने जाणवते होते इथपर्यंतच्या प्रवासातील 
अपमानाचे शल्य, बोचणारे काटे, दिलेले-पचवलेले धोके
असंख्य विजय, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त पराजय 
आपल्याच म्हणवणाऱ्यांचा मोह, मत्सर, क्रोध, प्रेम, हेवा यातलं आता काहीच उरलं नव्हतं.

     मग प्रश्न पडावा एवढी मोठी धावपळ का..? अंतिमतः जर शून्य सुद्धा राहणार नसेल.

                       तर हा माझा तो परका,
                       हा मित्र तो शत्रू,
                       तो अपमान,
                       ते काटे,
                       ती फुलं ,
                       हे नक्की काय होतं....??

     पण आता या प्रश्नाच्या उत्तरात काही गम्य नाही.
आता खुप उशीर झाला होता. आता काही सेकंदात माती होणार होती. पण हे कळायला स्मशानात जावं लागतं.
गमतीशीर आहे ना...!!
     ज्याने आयुष्यातला मोठा पराजय पाहिलाय, त्यालाच विजयाचं महत्व कळतं.
ज्याने गरिबीचे चटके सहन केलेत, त्याला पैसा काय हे कळतं.
ज्याने असंख्य काटे अनुभवलेत, त्याला फुलाचं महत्व कळतं.
ज्याने रखरखत्या सूर्याला डोक्यावर घेतलंय, त्यालाच सावली म्हणजे काय कळतं.
ज्याने मरण जवळून पाहिलंय, त्याला जगण्याचं महत्व कळतं.
ज्याने विरहाचं दुःख उपभोगलंय, त्यालाचं प्रेमाचं गमक कळतं.

     आयुष्य खूप सुंदर आहे पण जर बाकी काही उरणार नसेल तर आयुष्य जगण्याचे आयाम नक्की बदलायला हवेत.
हे सूंदर आयुष्य आणखी सुंदर बनवूयात...!!
आंनदी असा जय हो...मंगल हो....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, October 16, 2020

व्यथा बळीराजाची...!!

कशी सांगू शेतकऱ्याची व्यथा,
पीक कधी ओल्याने तर कधी कोरड्या दुष्काळाने नेलं,
कधी  हमीभावाने तर कधी व्यापाऱ्याने भावात लुटलं,
हाता तोंडाला आलेला घास,
पावसाने हिरावून नेला...!!

दिवाळीला लेकराला नवी कापडं घ्यायची होती,
कारभारणीला लय दिसातून एक साडी घ्यायची होती,
त्याची चप्पल तर पार झिजली होती,
कपडे ठिगळं लावून लावून शिवली होती..

आवनदा पाऊस ठीक होता, पीक पण जोमात होतं,
कष्टाचं चीज होणार होतं,
पण आभाळ कोसळलं,
होत्याचं नव्हतं झालं,
ज्याने दिलं त्यानेच नेलं,
शेतकरयाचं स्वप्न डोळ्यातून टपकलं.
खचू नको रे शेतकऱ्याच्या पोरा 

एक दिस तुझाही येईल,
दुरून पाहणारी माणसं नतमस्तक होतील....!!

#शेतकरी_वाचवा
#अतिवृष्टी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, October 12, 2020

एक प्रवासी..!!

या वाटेचा मी प्रवासी,
साथ काट्यांची दगड धोंड्यांची..!

आस सह्यादीची, सह्याद्रीसम उंच होण्याची,
सवय मज कायम रखरखत्या उन्हाची,
अवचित भेटली ती घेउनी शीतलता चंद्राची..!

क्षणभर थबकली त्या तळ्यावरती,
प्रतिमा पाहिली.. तिची की चंद्राची..??

मी आपला याच प्रश्नात दंग,
भरतो कुंचल्याने कल्पनेचे रंग..!

असो, मी आपला वेडा प्रवासी,
साथ मज रखरखत्या उन्हाची,
आस मज सह्याद्रीची....!!

#कल्पनेतील_ट्रेकर😍
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, October 7, 2020

एक सायंकाळ..!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
विचारांचं काहूर शांत व्हावं,
मनी उठलेली वादळं क्षणात नाहीसं व्हावीत,
सलणारे काटे निखळून पडावेत,
त्या जखमा भरून निघाव्यात..!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
आजूबाजूच्या गोंगाटाचं भान विसरावं,
स्वतःच्या स्वतःमध्येच शांत बसावं...!!
ना कसल्या महत्वकांक्षा असाव्यात
ना कसला हेवा असावा...!

ना विजयाच्या आंनदाची पताका दिसावी,
ना पराजयाचं पांढरं वस्त्र उंचावलेलं दिसावं...!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
एकच गोंगाट होऊन धावपळीची चाहूल लागावी,
टी-टी-टी वाजणारं मशीन झोपी जावं,
राहिलेला शेवटचा दीर्घ श्वास सुटावा,
शांत....शांत......अन्....शां.....त..!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...