नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता.
हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन थंडावा जाणवत होता. याने उन्हाळ्याची तीव्रता थोडीतरी कमी झाली होती.
आजचा सुट्टीचा वार जरा हळू-हळूच पुढे सरकत होता. कित्येक दिवसांनी आवश्यक असणाऱ्या हळुवारपणाची जाणीव देत होता...
तिन्हीसांज झाली होती अन् हळुवारपणेच प्रकाशाचं साम्राज्य जाऊन आता अंधार अधिराज्य गाजवत होता.
'तो' मात्र अंधुकश्या खोलीत, खिकडीपाशी बसून पश्चिम क्षितीजावर टक लावून शून्यात पाहत होता. जणु कित्येक वर्षांच्या तपानंतर त्याला हा निवांतपणा, ही एकांताची खिडकीजवळची जागा आणि पश्चिमेला उगवलेला शुक्र असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता.
नैऋत्येकडून थंडावा आणणारा वारा अन् ही शांतता त्याला पुनश्च एकदा स्वतःशीच जोडत होती.
जगाच्या धावपळीत आपणही कधी ओढलो गेलो, नुसते ओढलोच नाही तर बांधलो गेलो हेच त्याला कळत नव्हतं. धावणारं जग, पळणारी माणसं, श्वास घेतोय म्हणून जीवंत आहोत याची जाणीव अन् उणीव याचा काहीच ताळमेळ लागत नव्हता.
यात आपणच आपल्याला दूरकुठंतरी हरवून बसलो आहोत अन् वास्तवातल्या झगमगाटात धूसर होत गेलो, असं त्यांस राहून-राहून वाटत होतं. जगण्याच्या संवेदना या गर्दीत हरवणार नाहीत यासाठी खूप कसरत करावी लागणार होती. खोलीतला हा अंधार मात्र त्याच्या जगात शांततेचा प्रकाश भरत होता. कधी-कधी जग धावतेय म्हणून धावतोय की आपल्यालाच धावायचंय याचं कोडं आज तोच उलगडत होता.
अश्यातच खिडकीजवळचा मोगरा मात्र खोलीत दरवळत होता. तो आज पुन्हा-पुन्हा खुणावत होता जगण्यासाठी अंधुकशी खोलीही सुगंधाने मोहरुन जाते. फक्त त्यासाठी हवी असते,
आपल्या हक्काची, आपल्या ओसरीची, आपली जागा,
हातात आधाराची स्वतःची काठी, मायेची उब देणारी आपल्याच ठिगळं पडलेल्या कापडांपासून बनवलेली आपली गोधडी अन् पाठीवर जगण्याच्या वाटेवर कमावलेलं सुंदर आठवणींच गाठोडं, जे घेऊन चालता यावं तिन्हीसांजेला सूर्य अस्तचलाकडे जाताना, समुद्राच्या लाटा किनाऱ्याला जोरजोरात धडका मारताना, पक्षी पुन्हा घरट्याकडे परतताना, चालता यावं आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे.... जगण्याच्या अतिउच्च आनंदीपणाने....!!!
#जगणं ❣️
#जिंदगी_का_फंडा🍃










