होळी सरून आता उन्हानीं चांगलाच ताव धरला होता, त्यातच निसर्गाने पानगळीचा हंगाम चालू केलेला.
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली काही काळाची हिरवळ आता सोनेरी रंग ल्यावून आता पूर्ण रूपडचं पालटून टाकत होती.
काही दिवसांतच चैत्र पालवी फुलायला लागलेली अन् त्यामुळे त्या सोनेरी रंगात निसर्गानं निरनिराळे रंग भरायला चालू केलंय ...
दूर कुठंतरी काटेसावर बहरून आलांय जणू एखाद्या स्त्रीने भाळी लालबुंद कुंकूच ल्यायलय असं काही भास होत होता... त्याने एवढ्या पानगळीतही ऊर्जा भरत होती...
बहाव्याने पिवळ्या रंगाचा दागिनाच बनवला होता जणू... जसं की त्याने तो कोणास उसंत काढून अर्पणच केलाय...
निवडुंग, पळस, चाफा अन् गुलमोहर यांनीही त्यांच्या कामात थोडी ही कसूर ठेवली नव्हती.
कोणी नेमून दिलेल्या कामांनुसार इमानेइतबार नखशिखांत खरे उतरत होते.
निसर्गाचं हे रूपडं डोळ्यात साठवणं, जपून ठेवणं हे भाग्य काही थोडं नसे....
उन्हाच्या तळपत्या दिवसातही निसर्ग मात्र बहरतच होता ... याच चैत्र पालवीच्या मुहूर्तावर गुढीपाडवा मात्र दार ठोठावत होता...
याच फुलेल्या निर्सगाच्या देण्याचं, लेणं बनवून दाराशी तोरण बांधून नववर्षाची तयारी होतेय...
उन्हाळकामे संपवून नव्या चैतन्याचं स्वागत होत होतं.
निसर्ग कदाचित हाच तर निरोप घेऊन आलेला असतो,
पानगळीच्या रूपात सगळं सुटून मातीत मिसळावं अन् चैत्र पालवीच्या संकेतातून पुन्हा नव्याने बहरून जावं...
पानगळीच्या काळात बदल स्वीकारून आपल्याकडे उरलेल्या तुटपुंज्या विवेकावर काटेसावर, पळस , अन् बहवा फुलवावा...!!!
निसर्गाच्याच नियमांनी चालणं
जमवलं की पावलं खूप अडखळत नाहीत,
ठेचा लागतीलही
पण त्याने पाय मोडल्याचं दुःख होणार नाही,
झालेल्या जखमांनी,
आता सगळं संपलंच असं,
अवकाळी काळे ढग मानगुटीवर बसण्याची शक्यता दुर्मीळच...!!!
'स्व'त्व अन् 'मि'त्व याचं कोडं पडणार नाही....
निसर्गाचंच देणं हे
त्याचंच हिरावून घेणं,
आपलं-आपलं म्हणता-म्हणता
आपणच परकं होणं...
#जगणं ❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


No comments:
Post a Comment