Saturday, May 24, 2025

सर्द भिजलेला....!!!



ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता. घाई-घाईत सगळं साहित्य बॅगेत त्याने अक्षरशः  कोंबून भरलं होतं, त्यात आवर्जून घेतलेली छत्री मात्र ऑफिसातच विसरून राहिली होती... नेहमीप्रमाणे... ही व्यथा खुप पुढं निघून आल्यावर त्याच्या ध्यानी आली होती. पण आताश्या सुटलेल्या गोष्टींचं काही सोयर सुतक राहिलंच नव्हतं. कित्येक छोट्या मोठ्या क्षणांना आपलंस करण्यात, कितीतरी 'आपल्या' म्हणाव्या अश्या गोष्टी पुढ्यातून निसटल्या होत्या, काही सोडल्याही होत्या. त्यामुळे छत्रीच त्याला काही विशेष असं वाटलं नाही. प्रत्येकवेळी सुटलेल्या गोष्टींचा मतितार्थ मात्र काढून झाला होता 'कदाचित हे असंच असेल जीवन असं कायम वाटत होतं'...!!

कसं असतं ते जगणं...? कोणाला विचारणार ना...? ज्याच्या त्याच्या व्यथा अन् कथा अलगच असतात... 

माणसं वाढली, कनेक्टिव्हिटीही वाढली पण काहीतरी दुरावलं हे मात्र नक्की हे पुन्हा प्रकर्षाने जाणवलं ....!!

धक्के खात, रस्त्याच्या अवस्थेमुळे शेजाऱ्यांचे

कोपरखिळे खात ... त्याच्या घराचा (सॉरी फ्लॅटचा) स्टॉप येऊन जातो. बॅग सावरत, मोबाईल सावरत त्याने उतरून घेतलं. आत्तापर्यंत थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा त्यांच स्वागत केलं. सुटलेल्या छत्रीचा मनस्ताप देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण त्याला काही फरक पडलाच नाही. सर्द भिजलेल्या कपड्यानिशी तो सोसायटीच्या दारात आला. 

जखमेवर मीठ म्हणा... नाहीतर काळजी म्हणा... वॉचमनने हात करत "साहेब आजही छत्री विसरलेच होय....!" असं म्हणत गालात हसला...!!

छत्रीचं कौतुक त्याला काही नव्हतंचमुळी...कित्येक जगाला न दिसणाऱ्या गोष्टी सुटल्या होत्या.. त्याला ही आठवत नसतील इतकं काही 'आपलं' स्वतःचं म्हणावं असं सुटलं होतं... त्यामुळे तोही आपल्याच भिजलेल्या सर्द झालेल्या स्वतःकडे पाहत कुत्सित हसला...!

तसाच जीना चढत तो खोलीत आला.

बॅग ठेवून, चेंज करून, वाफाळता चहा बनवला अन् गॅलरीत आला.

गॅलरीत बसल्यावर, त्याला आत्तापर्यंत धावतच होतो याची जाणीव होऊन गेली. धावण्यात, धावतो आहोत हेही कळू नये याचं मात्र नवल वाटलं.

गॅलरीतून जाणवणारा बेधुंद पाऊस, त्याबरोबरच थंड वारा आणि खाली रस्त्यावर गर्दीतून वाट काढत पटपट घर जवळ करणारी , जगण्यासाठी धावणारी सगळी माणसं तो पाहत होता.

काहीवेळापूर्वी याच गर्दीचा एक भाग असणारा तो आता मात्र शांत एकांत अनुभवत होता, आपल्या गॅलरीतल्या आवडत्या जागी बसून....!!

ऐन तारुण्यातल्या रंगीबेरंगी रंगवलेल्या आयुष्याचा इतका ब्लॅक अँड व्हाईट कॅनव्हास असेल असं कधी कल्पनेत ही न वाटलेला तो.... गॅलरीतल्या वाफाळत्या चहाचा तो निवांतपणा कृतार्थ होऊन अनुभवत होता... 

गावाकडच्या आठवणी, कॉलेजातल्या आठवणी, ती दंगा मस्ती, तो अल्लडपणा... वाट्टेल तेव्हा सायकल काढून, नंतर थोडे मोठे झाल्यावर बाईक काढून मारलेली सैर ही किती अनोखं होतं ना...!!

 असं स्वतःशीच बडबडत होता...

जीवन जगायचंय म्हणता-म्हणता खूपच दूरवर आलो की काय असंही वाटून गेलं. हाही कित्येक दिवसांनी मिळालेला क्षण उद्यासाठी अप्रूपच वाटेल काय की ...?? याचीही शंका वाटून गेली. 

हातातला चहा संपत आला होता, पण कॉलेजच्या कोपऱ्यावरच्या टपरीवरचा चहा मात्र अजूनही ताजातवाना वाफाळताच होता, आठवणींच्या रूपात...!!!

चहा प्यायला म्हणून गेलेली जमात तासंतास रमलेली असायची, कोण चहामध्ये, कोण सिगारच्या धुरामध्ये, तर कोण कोणाच्या धुंदीमध्ये...तर कोण गप्पांच्या लहरीमध्ये... किती अनोखं होतं ना हे सगळं, अगदी सुंदर स्टोरीच्या चित्रपटांसमचं...

आताही दिसते की ती टपरी दुरून, तोच चहावाला, तीच गरम चहाची किटली, तोच चहाचा सुगंध...

पण फक्त चहापिणारे बदलले, त्यांच्या कहाण्यांमधील पात्र बदलले, कहाण्या या सर्वांच्या सारख्याच हो , काही अर्धवट, मळकट कळकट झालेल्या... 

.... दुरूनच टपरीकडे बघत 'तो' शोधत होता... 

हरवलेल्या 'त्याला,, सुटलेल्या 'ति'ला अन् स्वतःमधल्या अल्लड बालकाला...!! आजही धावता धावता.... पावलं अडखळतातच...पापण्या ओलवतातच, वळवाच्या पावसासम अवकाळपणे....!! 


#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Thursday, May 15, 2025

वळवातली तिन्हीसांज....!!!


 तिन्हीसांजेचं एकाकीपण डोईवर घेऊन आतमध्ये डोकावू पाहणारं मन हल्ली खूप कमीवेळा भेटावयास येतं. पण जेव्हा भेटतं तेव्हा कित्येक दिवसांची उतराई मात्र करत असतं.

अशीच एक तिन्हीसांज कित्येक दिवसांनी भेटत होती त्यात कसलीही घाई नव्हती. कुठं जायचं नव्हतं ना कुठं थांबायचं बंधन होतं.

तो, त्याची एक बंद खोली अन् खिडकीतून डोकावणारी तिरपी सोनेरी किरणं...

त्याच्याच तंद्रीत तो तिन्हीसांजेस पाठीमागे हात बांधून एकांत अनुभवत होता. पाठी बांधलेल्या हाताच्या बोटांची कसलीशी चुळबूळ मात्र चालू होती. कुठलीशी न सुटणारी आकडेमोड करत बोट चाळत होता कुठला हिशोब होता त्यालाच माहित. बाहेर पावसाळी वातावरण भरून येत होतं, पाहता पाहता तिन्हीसांज ढगांनी आच्छादून जात होती. पण त्याला याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला यापासून दूर कोणतरी  घेऊन जात होतं. आयुष्यातले कुठलेतरी,  बोटांनाही ठाऊक नसलेले कित्येक हिशोब तो चाळत होता. यात

काही पैशांचे, काही उधारीचे, काही मानाचे, काही अपमानाचे, काही प्रेमाचे, काही विरहाचे, काही हुकलेल्या संधीचे, काही हिरावलेल्या घासाचे, काही चुकलेल्या वाटांचे, काही चुकवलेल्या वाटांचे,

काही मिळालेल्या ठेचांचे, रक्ताळलेल्या पावलांचे,

काही आठवणीतल्या क्षणांचे, तर काही क्षण कधीच न सांगता येणाऱ्या आठवणींचे...

असे कित्येक बोटांवर हिशोब न मांडता येणारे, कधीच न उलगडता येणारे कोडी बोटांनी चाळत होता . यात तिन्हीसांज सरून गेल्याचं भान ही त्यास उरले नव्हते. तो मात्र आपल्याच दरवाजा बंद केलेल्या खोलीत येरझाऱ्या मारत होता. अगदी स्तब्ध होऊन....

खोलीत काही जिवंत होतं तर ती फक्त भिंतीवर लटकवलेल्या घड्याळाच्या काट्यांची टिक टिक......

त्याने दरवाजा जरी बंद केला असला तरी मात्र खिडकी  बाहेरच्या जगाची चाहूल देत होती... हीचतर कदाचित खासियत असते खिडकीची...

आपल्याला वाटेल तेव्हाच जगाची चाहूल घेण्याची खुबी जपून ठेवलीय तिने.... हेवा वाटला सजीव वाटणाऱ्या निर्जीव खिडकीचा....

घड्याळाच्या टिक  टिक शिवाय काहीच ऐकू न येणाऱ्या खोलीत...  आता मात्र त्यास खिडकीत आणून उभं केलं होतं....नियतीच ती....वाऱ्याने पानांबरोबर घातलेला संग, कोकिळेने गायलेलं विरहाचं गाणं हे अनुभवता येत होतं...

संगतीला तिन्हीसांजेची वेळ झाली होती नुकत्याच पावसाळी दिवसांची, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची लगबग चालू होती. काळया ढगांसवे अगदी कोंदटून आलं होतं. पाऊसही कसल्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा श्वास रोखून घालमेल करत होता. याचा हिशोब मनात दाटून आलेल्या भावनांचा होता तर खिडकीबाहेर त्याचा हिशोब वाऱ्याबरोबर मांडलेल्या ढगांच्या लपंडवांचा होता.

आजची ही सांजवेळ काही तरी खुणावत होती मनातली घालमेल खिडकीपाशी उभा होती...

दरवेळी एकट्याची वाटणारी लढाई आज मात्र कोणतरी सोबती आहे याची ग्वाही देत होती... कित्येक वर्षांनी तो हे सगळं अनुभवत होता... .. त्याचमुळे कदाचित बोटांची चाळण अन् घालमेल आता हळूहळू मंदावली होती...

घड्याळाच्या टिक टिक विना घेतलेला दीर्घ श्वास अन् थंडावा घेऊन येणारा मोसमी गार वारा यांची जाणीव आताश्या होऊ लागली होती.

कोंदटून आलेलं आभाळ आता काहीस शांत झालं कदाचित न सुटणाऱ्या कोड्याचं उत्तर  त्यास दूर क्षितिजावर गवसल होतं.

याच तंद्रीत तो अजूनही खिडकीतच उभा होता. तिन्हीसांजेच्या धूसर  प्रकाशात वाऱ्याची झुळूक आली येताना त्याने मात्र थंड पावसाची सर घेऊन आली.

हा हा, म्हणता-म्हणता पहिल्या पावसाच्या पहिल्या सरी पुढ्यात पडल्या. वाऱ्याच्या थंड शिडकाव्याने  आलेला क्षीणवटा नाहीसा केला.

कोंदटलेलं मन अन् आभाळ बरसू नकळत लागलं....दरवाजाच्या नकळत खिडकीस मात्र ते जाणवलं.

ओसरीच्या सरी कधी दारातून घरात येत नाहीत पण खिडकी मात्र त्यांना अडसर  ठरत नाही. मग खिडकीतून दिसणारा लालबुंद गुलमोहर नव्या क्षणाचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर पडणाऱ्या तिन्हीसांजेच्या सोनेरी किरणांना अजूनच साद देत राहतो. तेच तेजोवलय, टोचणारी जळमटं दूर करून पहिल्या पावसाच्या सरींबरोबर कित्येक आठवणीना उजाळा देऊन नव्या क्षितिजाला भेटावयास पुन्हा सज्ज करत असते.

प्रत्येक वर्षीचा पाऊस पुन्हा नव्याने वेगळा भासतो,

पुन्हा नव्या गुलमोहरासारखं जगणं फुलवत राहतो कितीही न सुटणारी कोडी आली तरी आयुष्याचा गुलमोहर सजवणे सोडायचं नसतं... जगणं हे असंच असतं

मिळालेलं गमावलेलं प्रत्येक सांज विचारत राहते अन् पावसासारखं सगळं वाहून नेते पुन्हा नितळ होण्यासाठी पुन्हा गुलमोहोर फुलवण्यासाठी..... म्हणून एकांतातली सांजवेळ अनुभवता यावी ...!!

#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा 🍃


जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...