Sunday, September 15, 2024

शब्द अन् बरच काही...!!!

शब्दांची सुमने झाली,
त्याने भुरळ मात्र घातली...

वाह-वाहच्या शब्दांनी,
शब्दांचीच वाह-वाह केली,
त्यापल्याडची भावना
मात्र वळचणी आडच राहिली....

कधी पोहचली भावना
एखाद्याच्या मनाच्या तळाशी,
तर कधी मात्र लेबलं 
लागली गेली....

शब्दांचे अनेक अर्थ 
निघाले,
शब्दांचे मतितार्थ 
माञ हवेत विरून गेले....

घुसमटीची तळमळ,
विचारांचा कल्लोळ,
शृंगाराचे सौंदर्य,
सौंदर्यातलं प्रेम,
अन् प्रेमातलं सौंदर्य,
यासं शब्दात गुंफलं गेलं,
अन् लेबलं लावलेल्या
फोटोवर दिमाखात लटकवत ठेवलं...

पण,पण 
यात माञ गुंतायच नसतं...
कारण,
गोकुळ सुटतं तेव्हा पुन्हा 
कधी गोकुळाने 
बासरीतला सुर ऐकला नाही....

काही काळ गेलेला हरी
पुन्हा येतो म्हणला,
तो माघारी कधी फिरला नाही....

ते ही शब्दच होते,
जेव्हा राधेस 
यमुनातिरी दिलेले
ते ही वचनच होते...

वाट पाहणाऱ्या राधेस,
पुन्हा कृष्ण कधी 
यमुनातीरी भेटला नाही..

"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" 
म्हणणारा कान्हा अजून परतला नाही....!!

#शब्द #लिहिणं #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, September 8, 2024

तू गेलीस तेव्हा...!!

 

तू गेलीस तेव्हा,
सूर्य अस्ताचलास गेला...
दूर जाताना होणाऱ्या
पैंजनाचा आवाज
मनाला मात्र चिरत राहिला....

तू गेलीस तेव्हा,
आभाळ दाटून आले, 
काही क्षणात आसवांसवे
अंगणात कोसळले....

तू गेलीस तेव्हा,
अंगणातल्या परिजातकाने 
फुलणं सोडलं,
अंगण मात्र उरल्या-सुरल्या 
सुगंधाला पारखं जाहलं....

तू गेलीस तेव्हा,
पौर्णिमेलाही मळभ दाटलं,
चांदणंभरल्या अंगणात
रीतंपण प्रखर जाहलं....  

तू गेलीस तेव्हा 
निसर्गानं पानगळ 
स्वीकारली,
जुन्या आठवणींना 
नव्याने पालवी मात्र फुटली....

तू गेलीस तेव्हा,
सांजेचं दर्पण जाहलं,
तूझ्या नसण्याचं 
सांजेंनेच मज स्वीकारलं....

तू गेलीस तेव्हा 
संधीप्रकाशातल्या
धुलिकणांत मज मी पाहिलं,
तू, तू एक सखी अथवा सखा,
प्रत्येकाच्या मनातल्या
तळघरातला 
बंद खोलीतला आरसा....
जो नाही होत कधी पारखा...

तू गेलीस दूर जरी
जगण्याच्या हमरस्त्यावर 
तू मात्र साथीला असते
श्रावणातला सरिंसम 
मायेचा ओलावा देत राहते..!!

#सखी #सखा❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Thursday, August 15, 2024

'ती'च्या पल्याडची ती....!!

 

माळलेल्या गजाऱ्याने 
सांज सुगंधित जाहली...

चुरगळलेल्या फुलासवे 
जाग तिज तीन प्रहरास आली....

तव अंगणात तीजीया
चांदणं हे पेरलेले...

चंद्र खिडकी पाशी येऊन
हितगुज तिने केलेले...

फुललेल्या रातराणीने 
त्यात अत्तर हे शिंपडलं...

पाहणाऱ्या दुसऱ्यास 
तिने आज स्वतःस पाहिलं...

सुगंधित फुलांना 
तिने चुरगळलेलं पाहिलं...
तीच फुलं वेचून 
तिने सुगंधाला साठवलं....

रात उतरणीला
जाताना तिने
पांघरून हे चढविलं...

स्वतःच्या तिला
तिनेच लपवलं...
उद्याच्या साठी तिने
आज हेही स्वीकारलं....

#तिच्या_पल्याडची_ती❣️
#जिंदगी_का_फंडा🍃



ती अन् तो....!!

 

'ती' उगवत्यास पुजनारी
तू मावळत्याचा पाईक रे...

'ती' हिरव्या रानावरची 
करवंदाची जाळी रे...
'तू' तुरट चवीची
रानभाजी रे...

'ती' खळखळत्या नदीचा
प्रवाह रे...
'तू' उंचावरच्या धबधब्याचा
 न सापडणारा तळ रे...

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, August 4, 2024

पाऊस, जगणं अन् उमलणं....!!

 

पाऊस,

नुकतच रांगायला लागलेल्या

बाळासारखा अंगाखांद्यावर 

अंगणात खेळणारा...

पायातल्या छुणछुण आवजासम

संततधार सरींचा

कानात नाद घुमणारा...


पाऊस,

कित्येक दिवसांच्या 

'ति'च्या विरहाच्या

प्रश्नांचं उत्तर हलकेच देणारा...

कित्येक दिवसांचा आकस 

काही क्षणात वाहून नेणारा...


पाऊस,

पानांवरून घरंगळताना

'ति'च्या गालावरच्या निखळ खळीची

आठवण देणारा...!!

काहीकाळ खळीतच 

मन गुंतवणारा...!!


पाऊस,

जुन्या मित्रांबरोबरच्या

चहाच्या टपरीवरच्या 

हास्य लहरींमधल्या 

जुन्या आठवणींचा 

वाफाळता चटका देणारा...!!

सिगारच्या धुराबरोबर

आठवणी हवेत धूसर करणारा...!!


पाऊस,

जुन्या-नव्या आठवणींच्या

सरितेवरचा साकव तो जोडणारा...!!

त्याच साकवावर 

चिंब केलेल्या 

पावसाबरोबर 

पापण्या 

ओलावणारा...!!


#पाऊस❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

एकांत...!!

 

जगण्याच्या हमरस्त्यावर
अनेक वाटा येऊन मिळतील,
उजळणाऱ्या पावलांबरोबर 
गर्दीचा ओघ वाढवतील...

पण, या गर्दीतही
एकांताची साथ 
सोडायची नसते,
हीच साथ 
प्रवासाचा महोत्सव करते....!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, July 21, 2024

आयुष्य हे...!!

 

शब्दही मुके जाहले,

जरी भावनांना पेव फुटले...


चालणाऱ्या पायांनीही 

प्रश्न करणं आता सोडलं,

उगवणाऱ्या दिसाबरोबर 

चालणंच हे जीवन मानलं...


मावळणाऱ्याचं तर आता 

भेटच नको जाहली,

असंख्य हिशोबांची डायरी

आता कोनाड्यात पडली... 


उगवला-मावळला की

आयुष्याची गणती होते,

धावणाऱ्यास मात्र 

याची कल्पना न होते...


धाव-धाव धावत

दमछाक कधी होते,

पण घाम पुसून 

पुन्हा धावण्यात 

स्पर्धा अपुरी पडते...


कधीतरी केव्हातरी

पेला हा भरतोच 

ओसंडून वाहण्यास

काहीच अवकाश होतो...


तेव्हा किती धावलो

याचा हिशोब काही 

लागत नाही,

कितीही धावलो तरी

जगण्याची

कस्तुरी काही सापडत नाही...


मग अशीच

एक संध्याकाळ होते,

तिरप्या किरणांनी 

सुरकुतल्या पायास स्पर्शून जाते..


तेव्हा मात्र ओलावणाऱ्या 

पापण्या किरणांना अंधुक करतात,

हा , हा म्हणता-म्हणता,

सर्वांग त्या सांजेच्या किरणांनी

व्यापून टाकतात..

 अनंत काळासाठी ....

काही वाईट, काही चांगल्या

 पाऊलखुणा मात्र मागं सोडतात ....!!!


#आयुष्य_हे❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Wednesday, July 17, 2024

तत्व अन् बरंच काही....!!

 


तत्वनिष्ठता ही भाजीपाल्यासम कुठंही मिळणारी संजीवनी नाही. यासाठी कित्येक त्याग, अनुभव अन् आपण ज्यांना आदर्श मानतो यांच्या वाचनातून, त्या वाचलेल्या आदर्शवत कृतींच्या अनुभूतीतून अन् तपश्चर्येतून येते. पण त्याची व्याप्ती मातीच्या कणापेक्षाही लहान आपणाला उमजली जाते ...या काही अक्षरांची ताकद कळायला अन् अजमवायला कित्येक अनुभूतीतून तरल राहून स्वतःच्या परे जाऊन चुकीला स्वीकारून बरोबर गोष्टींची सक्षम बाजू मांडून्याचं  धारिष्ट खूप कमींकडे असतं... अर्थात, तत्त्वनिष्ठता ही एक ज्वाला आहे, जपली तर अनंतकाळासाठी कालातीत राहणारी अवघा आपला आसमंत रंगवून टाकणारी नाहीतर काही भौतिक अन् नश्वर लालसेपोटी वेशीवर टांगून, त्याचं ज्वालेची भस्मात जळून गेलेली तत्त्व अन् निष्ठा पाहूनही खेद नसणारी मंडळी भाळी ल्यायतात अन् आविर्भावातच जगणं रेटतात. यात उरली सुरली माणसं मात्र जिकिरीने प्रकाशाचा धर्म सांभाळतात, हे इतरांना हेकट, त्रासदायक अन् न पटणारी बनु शकतात यावर कितीही विश्वास न बसण्यासारखे असलं तरी तथ्य आहेच.... एव्हाना कधी कधी आपल्याच तत्वनिष्ठपणाचा, बाणेदारपणाचा कस लागतो. हे सगळं सोडून देऊन वाहत्या गंगेबरोबर, असंख्य माणसांच्या गर्दी बरोबर जाऊन त्या गर्दीचं व्हावं की काय असं होतं, बंडखोर वृत्ती उफाळून येते... पण तेव्हाच वेगळंपण जपण्याचा वसा घेऊन सद्सद्विवेक बुद्धी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं काम करत असते अन् कोलमडणारा रथ पूर्वरत होतो...

यात स्वतःला सांभाळणे अन् त्या काही अक्षरांसाठी जगणं हे ही एक तत्वचं... अश्या स्वभावाच्या माणसांना दुनियादारीत एकरूप होणं महाकाठिण्य असतं...

कारण जे पोटात तेच ओठावर आणण्याचं धारिष्ट ठेवणारी मंडळी हेकट म्हणून नाकारली जातात नाहीतर काही लेबलं लावून दूर फेकली जातात....

समाजात अशी माणसं एकाकी पडतातही पण याच वृत्तीमुळे जो जगण्यातला बाणेदार पणा आयुष्याच्या सोबतीला सावली प्रमाणे जपतात अन् निरोप घेऊन जातानाही काही चांगल्या पाऊल खुणा ठळक अनंत काळासाठी सोडून जातात....

भौतिक लालसेपोटी सांभाळलेल्या तत्वांना तिलांजली काही क्षणात दिली जाऊ शकते पण तीच तत्व अन् निष्ठा स्वीकारायला अन् अंगिकारायला हत्तीच बळ यावं लागतं क्षणोक्षणी आपल्या आदर्शांच स्मरण असावं लागतं

सभोवतालचं वातावरण आपल्याला त्याच्यानुसार बनायला भाग पाडतंही.... अश्यावेळी आपलं स्वतःचं वयल जपताना दमछाक होते, पण तीच दमछाक सकाात्मकतेचा सुंदर डाग देऊन जाते 

गर्दीचं व्हायचं नाही. हे पुन्हा-पुन्हा सांगत राहते.....

जगाला हेकट वाटणारी, बहुतांश वेळा न पटणारी ही वृत्ती त्याग मागत असते बलिदान मागत असते ..... जी माणसं बलिदान देतात ती अनंत काळात जिवंत राहतात.....!!!


#तत्त्व_अन्_निष्ठा #जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

प्रवाह जगण्याचा....!!

 

जीवनात या उन्ह कडाक्याचं 
हमखास पडावं,
उन्हानंतरच्या सावलीने
मात्र ते स्मरावं...
उन्हानंतर सावली
ही अपेक्षा काही गैर नाही,
पण सावली दिसताही
उन्ह वाट्याला हे काही
पचत नाही....

मातीत गाडून घेणारं 
बिजही पावसाअभावी 
कुजतच की,
पण कधीतरी फुलावं 
हे त्यालाही वाटतंच की...

जीवनात या 
कुजनं-फुलणं नक्की यावं,
संघर्षाच्या हा पावित्र्यात मात्र
मनाने कुठेतरी शांत निजावं...
गर्द काळोखातल्या वाटेवरही
चमकतोच की काजवा एखादा,
तोच तर ठरवतो चालण्याच्या दिशेला...

'तो' काजवा 'ती' फुलं
हवीच असतात सोबतीला,
त्याशिवाय प्रत्येक पाऊल 
वाटेल विरान वाटेवरला...

एका मागून एक पाऊल
पडत राहतं,
जीवनाच्या प्रवाहात 
प्रत्येक पाऊल मात्र गणलं जातं...
दुखःच्या लहरीबरोबर
सुखाचा शिडकावाने
प्रत्येक पाऊल स्मरलं जातं..

कितीही नाही म्हणलं तरी
थंड शिडकावा हवा असतो,
ठेचकाळलेल्या पावलांना
प्रवास असा नाही 
याचा विश्वास तोच देतो...

थकलेल्या पावलांनाही
थकायचा अधिकार नसतो,
उसनं आवसान आणून
पुढचं पाऊल पाहत राहतो...
कदाचित हाच तो प्रवास असतो
अनीच्छित, अनाकलनीय 
आळवाच्या पानावरच्या 
पाण्याच्या थेंबासारखा
कितिकाळ अस्तित्व
याची काहीएक कल्पना नसलेला
तरीही
उद्याची चांगली स्वप्नं पाहणारा 
नश्वर जीव.....!!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


Wednesday, June 5, 2024

पाऊस, जगणं अन् बरंच काही....!!

आताश्या कामात दंग असणारं मन पाऊसात भिजून एकरूप होत नाही. खूपच वाटलं तर पाठीशी एका हातावर दुसऱ्या हाताची घट्ट मूठ बांधून किंवा खिडकीत उभं राहून, दुरूनच पाऊस पहिला जातो... अनुभवला जातो. हाताची पाठीशी बांधलेली घट्ट मूठच, सगळं नकळत सांगून जातेय.. यात मनाची घालमेल, मिळवलं-गमवल्याचा हिशोब, दुरावलेल्या गोष्टी, हुलकावणी देऊन गेलेले असंख्य क्षण, चुकलेल्या निर्णयापासून दुखावलेलं मन तर बरोबर निर्णयांमुळे खुश होणारं मन , सलणारे काटे, झालेल्या असंख्य जखमा, कधीच कोणालाच सांगू न शकणारं, आपल्याबरोबरचं, या जगाचा कायमचा निरोप घेणारं जगण्याच्या प्रवासातलं एखादं (एखादं ...??असंख्य) रहस्य असं कित्येक गोष्टी त्या मुठीत घट्ट पकडुन ठेवलेल्या असतात.... कोणासही दिसू नये ती घट्ट पकड म्हणून पाठीशी बांधून ठेवत असू कदाचित....

पण खिडकीतून कोसळणारा हा पाऊस ही पकड सैल करू पाहतो.... कोसळणाऱ्या त्या सरींबरोबर आपल्यालाही वाहत जाण्यास उद्विक्त करू पाहतो... 

वाऱ्यास सोबती घेऊन खिडकीतल्या पारिजातकाच्या झाडाबरोबर लपंडावाचा खेळ मांडून, त्याच्या इवलुश्या नाजूक फुलांचा अंगणात सडा टाकून, मनाला सुगंधाची भुरळ पाडू पाहतो.... 

कोसळणाऱ्या या सरी अन् हा अल्लड, अवखळपणे बिनदिक्कत मुक्त संचार करणारा वारा दूर कुठेतरी आठवणींच्या गावा घेऊन जातो....

कधीकाळी रेखाटलेली, आपलीच कल्पनेतील पावसाळी दिवसांची चित्रफीत डोळ्यांसमोर उभी करतो... कोसळणाऱ्या प्रत्येक सरींचा नवा अध्याय लिहितो.... झाडाच्या पानावरून घरंगळत येणारा हा पावसाचा थेंब काही वेगळाच भासतो....हा-हा म्हणता मातीत एकरूप होतो...

कसं जमवतो हा....??? याच कोड्यात आपलं मन गुंतून जातं.

पडणाऱ्या पावसाच्या सरी आता खोल मनाच्या बंद खोलीत डोकावून पाहतो... कित्येक दिवसांच्या जळमटांनी आच्छादलेेली, सुंदर क्षणांची चकचकीत भरजरी कापडात गुंडाळलेली कुपी लखलखीत करतो.

फुलं तोडण्याच्या झटापटीत झालेल्या जखमांवर हलकेच फुंकर घालून, सलणाऱ्या- रुतणाऱ्या काट्यांना दूर करत पाठीशी बांधलेली मूठ सैल करतो...

तेंव्हाच मनी रंगवलेली,हरवलेल्या क्षणांची, दुरावलेल्या किंवा दूर लोटलेल्या गोष्टींची, पावसाळी दिवसातली, गुलाबी रंगाची  कोपऱ्यात धूळ खात पडलेली कूपी पाहून हलकेच पापणी ओली होते ... 

दूर अनोख्या प्रदेशात घेऊन जाते.... 

कित्येक क्षणांचा हिशोब न ठेवता मनाला, आभाळात पाऊस पडुन गेल्यावर मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यासम जमिनीचा विसर पडुन वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते....

तेंव्हाच वाऱ्याबरोबर खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे जाग येते....ऑफिसातल्या कारकुनाने खोली बंद करण्यासाठी कुलुप हाती घेतल्याचा नाद होतो .... कल्पनेतल्या मनाला वास्तविक मन हाक देतं....

जणू खिडकीतून येणारा हा गार वारा सांगून जातो, कितीही सुंदर असले क्षण तरी कधीतरी सोडून द्यावेच लागतात ...

कल्पनेतलं जग विलोभनीय असतंच पण जगण्याच्या भागदौडी मध्ये ते मागं सुटलं जातं.... कितीही सुंदर असलं तरीही पावसाच्या सरींसम कधीतरी मातीत झोकून द्यावं लागतं विसरून स्वतःला एकरूप व्हावं लागतं..... जसं

दाटून आलेल्या आभाळानं आता कोसळनं पसंद केलं,

तसं मोलाच्या क्षणानांही मातीत मिसळनं 

आता नित्याचाच होऊन गेलं.....


#पाऊस❣️ #जगणं

#जिंदगी_का_फंडा🍃
 

सर्द भिजलेला....!!!

ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...