Monday, September 27, 2021

कधी कधी...!!

 

कधी कधी 

तुमच्या दोन चांगल्या शब्दांनी काही चांगलं होणार असेल,

तर ते बोलायचे असतात,

कधी कधी,

वाईट बोलल्याने काही चांगलं होणार असेल,

तर वाईट बोलायचं असतं,

कधी कधी

मनात खूप काही असताना,

काहीच नसल्याचा आव आणायचा असतो,

कधी कधी 

काही चांगलं होणार असेल तर,

भळभळणारी आपली जखम लपवायची असते,

कधी कधी

तुमच्या "नाही" ने काही चांगलं होणार असेल,

तर 'हो' असताना ही 'नाही' म्हणायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलंच होणार असेल 

तर जसे आपण नसतो, तसेच आहोत अस भासवायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलं होण्यासाठी,

स्वतःला वाईट म्हणूवून घ्यायचं असतं,

आज नाही पण उद्याच्या उज्वलतेसाठी आज स्वतःला जाळायच असतं,

कधी कधी 

काही चांगलं घडणार असेल तर 'स्व' बाजूला ठेवायचा असतो,

कधी कधी 

एकरूप पाण्याच्या प्रवाहाचा आपण दुभाजक बनत असेल,

 तर नकळत स्वतः बाजूला व्हायचं असतं,

कधी कधी 

लडखडणाऱ्या पायांना हात द्यायचा नसतो,

त्यांना त्यांच्याच पायावर उभं राहू द्यायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलं होणार असेल,

तर प्रवाहाच्या उलट दिशेने चालायचं असतं,

जखमा होणार असल्या तरीही....!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃



Thursday, September 23, 2021

एक दुःख हवंच..!!

 


एक दुःखं हवंच,

मखमली पाऊलवाटेवरून चालताना,

रक्ताळलेल्या ठेचांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

उंच शिखरावर गेल्यावर,

मागे वळून पाहण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

जेव्हा कधी ठेच लागली,

आर्त हाक दिली,

त्या हाकेला साद दिलेल्यांच्या आठवणीसाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आकाशात उंच भरारी घेतल्यावर,

जमिनीवर येण्याची जाणीव देण्यासाठी..!


एक तरी दुःखं  हवंच,

समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी,

दुःखी माणसाच्या दुःखाची खोली कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मखमली गादीवर झोपल्यावर,

जमिनीवरच्या अंथरुणाची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं तर हवंच,

वातानुकूलित गाडीत बसल्यावर,

भर उन्हात चालताना अनवाणी पायांना बसलेल्या चटक्यांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

पंचतारांकित हॉटेलात जेवताना,

आईने घाईघाईने बांधून दिलेल्या भाकरीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सिग्नलला गाडी थांबल्यावर,

पोटासाठी भीक मागणाऱ्यांच्या वेदना कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

अलिशान बंगल्यात राहताना,

गावाकडच्या झोपडीत आईच्या कुशीतल्या उबेची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपलं छत सुरक्षित असताना,

ज्यांची घरं उध्वस्त झाली ना त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मॉलमध्ये किंमती ड्रेस घेताना,

बापाने शेतात केलेल्या कष्टाची आठवण देण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

यशाची शिखरं चढताना,

प्रवासात अंधारून गेलेल्या पाऊलवाटेवर दिलेल्या साथीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

कवितेच्या शब्दांसाठी,

त्या शब्दांना धार येण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

एकांतात सोबत करण्यासाठी,

कुरवाळत आसवं ढाळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपल्यापासून आपणच खूप दूर गेल्यावर,

पुन्हा एकदा मागे वळून स्वतः ला शोधण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सुखाची किंमत कळण्यासाठी,

समाधानी जगण्याचा अर्थ कळण्यासाठी..!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

भरून आलेल्या...!!


 

भरून आलेल्या आभाळाकडून,

कोसळणं शिकावं..!


विरहाने तापलेल्या पृथ्वीकडून,

वाट पाहणं शिकावं..!


प्रेम भरल्या सरींकडून,

तहान भागवनं शिकावं..!


दूरवरून आलेल्या वाऱ्याकडून,

पानासंग गीत गाणं शिकावं..!


उगवणाऱ्या सूर्याकडून,

काळोखावर मात देणं शिकावं..!


मावळत्या सूर्याकडून,

निरोपाचा मोल जाणावं..!


मातीत गाडलेल्या बीजाकडून,

नवनिर्मितीचं गमक घ्यावं..!


इवलूश्या कळीकडून,

उमलण्याचं धैर्य शिकावं,

त्याकळीच्या फुलाकडून,

सुगंधाचं देणं शिकावं,

अन् फुलता फुलता एक दिवस,

कोमेजून सहजतेने मातीतही मिसळावं...!!

फक्त इतकं सहजतेने जमावं..!!


#निसर्ग_गुरू❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


बरं झालं ईठ्ठला..!!


थकलेल्या आजोबाची कहाणी त्यांच्याच शब्दात गुंफण्याचा प्रयत्न.....

बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,

जे जे वाईट ते दिसायची ईपत टळली..!


बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,

डोळ्यादेखत अन्याय पहायची नौबत ना आली..!


बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,

अनिष्ठ ऐकण्यातून सुटका मज जाहली..!


बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,

काळजात घुसणारे शब्दबाण लांबूनच रोखू शकलो..!


बरं झालं ईठ्ठला गुडघे कुरबुरु लागले,

दूर जाऊन माणसांतही एकटा मी ना राहिलो..!


हे सर्व असते असह्य मज जाहले,

म्हणून म्हणतो,

बरं झालं ईठ्ठला गोष्टी इसरायला लागलो,

ओझ त्या जखमांचं उतरू चाललो..!


बरं झालं ईठ्ठला जे केलं ते खूप,

म्हणूनतर दुखःबरोबर चाखू शकलो सुख....!!


#कहाणी_जेष्ठत्वाची❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Thursday, September 9, 2021

माणूस एक बंद पुस्तक...!!

माणूस म्हणजे एक बंद पुस्तकंच. त्या पुस्तकाची सुरवात आणि शेवट जरी सारखाच असलातरी, आतमधील पानं मात्र खूप विभिन्न, काही फाटलेली, पण व्रण ठेऊन गेलेली. काही आयुष्याच्या भागदौड मध्ये गळून खूप दूर जाऊन पडलेली तर काही चुरगळुन गेलेली, अगदी जीर्ण झाली तरी प्राणप्रिय जपलेली....!!
काही पानांची कितीही पारायण झाली तरीकाही अनटोल्ड स्टोरी सम नव्यानेच भासनारी....
       प्रत्येक पान प्रत्येकाला समजेलच असं नाही आणि वाचकाने त्याचा अट्टहास ही धरू नये...!!
        काही कथा आणि व्यथा या ज्याच्या त्यालाच भोगायच्या असतात त्यामुळे शहाण्याने खोलात जायचं नसतं....
       कितीतरी जखमांचे हुंदके, उसासे आतल्या आत प्रत्येक पानात दडलेले असतात प्रत्येक शब्दांची एक नवी कहाणी बनून. जसे उसासे-हुंदके तसेच कधीच कोणाला सांगता न येणारे असे असंख्य क्षण...!!
असे काही क्षण ज्यांची पुन्हा कधीच आठवण ही होऊ नये,
तर असे काही क्षण जे कधीच विसमूर्तितही जाऊ नये.
अन् असेेही काही क्षण, क्षणभर डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू आणणारे...!
असे प्रत्येक माणसाचे असंख्य क्षण हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडलेले असतात, बंद दाराआड...!
हे तेच क्षण असतात जे करतात आपल्याबरोबर सोबत प्रत्येक वाटेवर काळोखातल्या असो किंवा प्रकाशातल्या अन् आपल्याबरोबरच जगाचा निरोपसुध्दा घेतात.
        माणसाला जवळचं म्हणून असं कोणी नसतंच मुळी, ज्यांच्याशी तो सगळं-सगळं खरं सांगून टाकेल, काहीतरी कुठंतरी, कधीतरी असुरक्षिततेची पाल कायम पिच्छा पुरवत असते.
बोलताना-ऐकताना कुठंतरी,कधीतरी ही असुरक्षिततेची पाल लुकलूकतेच आणि मग सुरू होतो लपंडावाचा जीवघेणा खेळ.
        कोणाचंतरी काही गुपित आपल्याकडे ठेऊन, आपलं काही गुपित त्याच्याकडे ठेऊन अव्यक्त करार होतो, व्यवहार होतो आणि त्या करारावर नाती कायम हेलकावे घेत राहतात ... अन् मग नात्यांमध्ये फरफट कोणाची तरी होणारंच हे ठरलेले असतं, कधी याची तर कधी त्याची ... कितीही नाही म्हंटलं तरी प्रत्येक नातं स्वार्थापोटीच बनलं जातं अन् राखलं सुध्दा जातं... कदाचित खुपजण या मताशी असहमत असतीलही पण हे मत नाकारले जाईल असं होणार नाही....
         एकांतात मनाला नेहमी प्रश्न सतावत राहतो. हे जे बंद पुस्तक आहे, हे कधी उघडतं का..? ही बंद दारं खरंच कोण ठोठावतं का?
ठोठावलंच तर ही मनाच्या अडगळीची बंद दारं कधी उघडतील का..??
नाही म्हणजे उघडलीच तर ते कोणत्या स्वरूपात उघडतील...??
         हा हा हा इथंसुद्धा असुरक्षितता😬😀 म्हणजे स्वतःच्या विचारांवर सुद्धा हे भूत स्वार असतं. याचपायी माणूस कायम धावत राहतो कधी खऱ्यागोष्टींपासून तर कधी खोट्यापासून...!
अन् यांतच हे बंद पुस्तक अजून कुलूप बंद करण्यासाठी माणूस नवनवे तंत्र अवगत करतो यात कधी घसरतो तर कधी क्षितिज गाठतो...!! अन् पुन्हा त्या बंद पुस्तकाची पान लिहीत राहतो, दिगंतरापर्यंत...!!
         जे पुस्तक तो स्वतःसुद्धा वाचू शकत नाही पण मात्र त्या पुस्तकाची पानं वाढत जातात दिवसोंदिवस...!! पण कधीतरी काही क्षण का होईना पुस्तक उघडण्याचा मोह अनावर होतो आणि मग तेव्हा माणूस, माणूस राहत नाही तो एक विचार बनतो..
जो विचार कायम वाहत राहतो, पाषाणात सापडलेल्या जिंवत पाण्याच्या झऱ्यासारखा..तेव्हा त्याला नसते तमा कशाचीच, नसते पर्वा कडक दुष्काळाची, ना पाषाणाच्या दाहकतेची.
        हे बंद पुस्तकाचं ओझं वागवता वागवता आयुष्याची संध्याकाळ होते.अशी संध्यावेळ जेव्हा सूर्य आयुष्यभराची दाहकता पोटात साठवून अस्तचलास निघालेला असतो..!!
        आयुष्याच्या संध्याकाळी मंद,शांत कोमल किरणांचा आभास देऊन, कसलाही आततायीपणा न करता, कसलीही घाई न करता, जीवनाच्या मिथ्या असणाऱ्या मोह, लोभ, मत्सराच्या डोंगराला मागे सोडून सर्वांच्या दृष्टीआड होत, मंद पावलं टाकत माघारी फिरतो, क्षितिजापल्याड जातो.
         आयुष्याच्या सकाळ धामधुमीत उत्साहात सुरू होऊन, आसमंत प्रकाशमय करून, कर्तृत्वाच्या प्रकाशाने तळपत राहून आजची ही संध्याकाळ झालेली असते.यात एक पुस्तक मिटून जात असतं न उघडताच, ज्या पुस्तकाची पुनरावृत्ती कधीच न होण्यासाठी...!!
हे अमूल्य, अतुलनीय पुस्तक एकाही वाचकाविना अमर होतं, बंद होतं अगदी कायमचं....!!! 

#आयुष्याचं_पुस्तक❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, August 1, 2021

मैत्री..!!

मैत्री असते,
खवळलेल्या प्रवाहाला शांत करणारा नदीकाठ,
मैत्री असते,
उजाड माळरानावरचा गुलमोहराचा थाट,
मैत्री असते,
भावनांच्या गोंधळातून निघणारी एक पाऊलवाट,
मैत्री असते,
दगडधोंड्यांच्या वाटेवरचा आधाराचा हात,
मैत्री असते,
सोबत नसताना साथीला असल्याचा भास,
मैत्री असते,
प्रेमाच्या पल्याडच्या नदीतीरावरच गाव,
मैत्री असते,
रिमझिम पावसाच्या संततधार सरी
आपलेपणाचा ओलावा कायम ठेवणारी,
न भिजताही ओल-चिंब करणारी....!!!

#मैत्री❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Tuesday, July 20, 2021

बा विठुराया...!!

 



                       नजर रोखून त्या  दिवे घाटावर,

यंदाही वाट पाहत उभा विटेवर,


नाही दिसला त्यास एकही वारकरी,

राहिले हात तसेच त्याचे कमरेवरी,


नाही आली ऐकू काकडा आरती,

नाही जमले यंदा वारकरी,


अन् तो मात्र तसाच उभा विटेवर,

नजर रोखून दिवे घाटावर,


बस्स झालं रे बा विठुराया,

संपुदे ही काया,


धाव घेण्यास पंढरी,

अवघा महाराष्ट्र तळमळतो...!

दर्शन घेण्यास,

आजही वाट तुझीच पाहतो,


तू गेला होता नारे,

जनीच्या घरी,

तूच वाचवलं ना,

गोऱ्याच लेकरू,


मग साकडं तुज मजकडून,

संपुदे हे संकट,

भेटुदे तुज परत,

बा विठुराया 

माझा वारकरी,

राहिला यंदाही घरी,

तू तसाच विटेवरी,

हात तुझे कमरेवरी...!!


#वारकरी

#एकादशी

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, June 2, 2021

उत्तररात्रीचा पाऊस...!!


      दिवसभराच्या धावपळीने थकलेलं शरीर बेड वर पडताच झोपी गेलं होतं. पावसाळा सुरू होऊन दहा-एक दिवस उलटून गेले होते, पण अजूनतरी म्हणावा असा पाऊस सुरू झाला नव्हता. पण आज काही वेगळं भासत होतं. सांजवेळीचा सूर्य अगदी झाकोळून गेला होता. काळेकुट्ट ढग वाऱ्याबरोबर रुंदन घालत होते. यथावकाश धो-धो पाऊस कोसळेल असंच झालं होतं. पण तसं पाहायला गेलं तर त्याच्या कोसळण्याला अजून अवधी होता.
     या वातावरणाने लाईट गेलेली होती आणि दिवसभराच्या कारस्थानाने कधी झोप लागली हे कळलंही नव्हतं.

     पण तश्यातच खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या थंडगार झोताने जाग आली. उठून, खिडकीत येऊन उतुंग आभाळाकडे पाहिलंतर कातरवेळेच्या काळ्याकुट्ट ढगांची जागा आता टिपूर चांदण्यांनीं घेतली होती. आताच पाऊस पडून गेल्यामुळे आभाळ अगदी रीतं झालं होतं.

     हवेतला गारवा वाढला होता, रात्र जशी चढत गेली तसा गारवा पण वाढत जातोय असा भास होत होता. खिडकीतल्या रातराणीच्या झाडाच्या पानांवरचे पावसाचे इवलूसे थेंब वाऱ्याच्या झोताबरोबर चेहऱ्यावर पडले आणि त्याचक्षणी मी लोटला गेलो आठवणींच्या अखंड-अथांग सागरात. 

     जेवढ्या चांदण्या खुल्या आभाळात दिसत होत्या, त्यांच्या प्रत्येक लुकलूकण्यात आठवणींचे क्षण जमा झाल्याचा भास होत होता... या ओल्या रात्रीच्या एकांतात अगदी हरवून गेलो. आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडला. थकवा-झोप दूर पळून गेली. लुकलूकणारी प्रत्येक चांदणी कधी बुडवत तर कधी तरंगवत आनंदाचे सप्तरंग उठवत होती. 

     मग सुरू झाला तो भूतकाळाची डायरी चाळण्याचा लपंडावाचा खेळ. प्रत्येक क्षणांची गोळाबेरीज-वजाबाकी म्हणजेच हिशोबाचा मेळ बसवणं सुरू झालं.बेरीज वजाबाकीतच रात्र सरत चालली होती. पण हिशोब काही लागत नव्हता.कधी पापण्या ओल्या झाल्याचा भास तर कधी स्मित हास्याची लहर सर्वांगातून जात होती.

     ते पुण्यातले पावसाळी दिवस, कधी छत्री विसरली तर कधी मुद्दामच विसरवलेली छत्री, तर कधी आपल्याच धुंदीत विचारमग्न होऊन पावसाचा विसर पडून एकट्याने कोणाच्या आधाराविना केलेला प्रवास.तर कधी कोणी धावत येऊन खांद्यावर हात ठेवून छत्रीत घेतल्याच्या आठवणी. अश्या अनेक आठवणी होत्या या पावसाच्या...!!या सर्व आज जश्याच्या तश्या आठवत होत्या.

     आज कसलेच भान राहीलं नव्हतं. आठवणींच्या गर्तेत बुडालो असतानाच, दूरच्या झाडावरच्या नेहमीच्या कोकिळेने शीळ वाजवली.  त्यामुळे अचानक भानावर आलो, रातराणीचा दरवळ ही बहरला होता, तो दरवळ हृदयात साठवत गेलो, ती टपटप पडणारी फुलं सुद्धा आठवणी बनून राहणार होती चिरकाल...!!

रात्र आता रातराणीच्या शेंड्यावरून उतरणीला लागली होती. पूर्व क्षितिजावर काहीवेळाने तांबडं फुटणार होतं, पहाट होण्याची ती चाहूल होती.

घड्याळाच्या काट्याने तीनचा टोल देऊन, वेगाने पुढं सरकत होता. त्याला थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं, नसतं.

आजचे हे क्षणही उद्याची आठवण बनणार आहेत, हे माहीत असूनही यांना ही खुशी-खुशीने सोडण्यातच धन्यता असते.

पुनश्च एकदा आता रित्या आभाळात काळेकुट्ट ढग दाटून यायला लागलेत. पुन्हा एकदा अशीच रात्र कोसळणार आहे आभाळ रीतं करण्यासाठी....!!

 जसं होतं मन रीतं ओल्या पापन्यांनी...!! तसं आभाळ होतं रीतं अश्या रात्रींनी....कोणाला कानोकान खबर न देता...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, May 28, 2021

रात्र...!!

.                              शांत वाटणारी तू ही,
                               शांत कधी सरत नाही,

न बोलता तू काही,

खूप सारे हितगुज करी,

तू सरताना येती आठवणींचे  दाटून नभ

अन् करती न गर्जताही सर्वांग चिंब,

शहारे  आणणारा दूरदेशीचा तो वारा,

वाटे मज  सम कोणी मोरपीस फिरवला,

खिडकीतून येणारी चंद्राची  ती छाया,

वाटे मज कोण आले अवेळी भेटाया,

दारातल्या बागेत बकुळ दरवळला,

वाटे कोण्या परीचा दूरदेशीचा अत्तर पसरला,

अश्यातच रात्र सरत गेली,

नव्याने पहाट पावलं टाकीत आली,

कोकिळेने नेहमीची इशारत केली,

ही शांत वाटणारी रात्र सरली,

आठवणींचे नभ रिकामे करत,

भूतकाळात विलीन झाली,

पुन्हा तू येशील,

पुन्हा नभ दाटतील,

पुन्हा भास होतील,

नव्याने....!!


#रात्र

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, May 23, 2021

श्रीकृष्णा...!!

 


तू नव्हता फक्त श्याम राधेचा,

तू दाखवला अर्थ प्रेमाचा,

तू नाही वाजवली फक्त बासरी,

तू बनवले विश्व आमुचे सप्तसुरी,

तू होता गोकुळातला गोपाळ,

अन् अधर्माचा कर्दनकाळ,

तू नाही हाकल्या फक्त गोकुळातल्या गाया,

तू दिली आम्हा भूतदया,

तू अर्जुनाच्या रथाचा होता सारथी,

पण जीवनाचा लगाम तर तुझ्याच हाती,

तू होता महानायक महाभारतातला,

तू  श्रेष्ठ यादवकुळातला,

तू दिले  वचन आम्हांस गीतेत,

'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत , 

वाट पाहतो हा सुदामा,

कधी येईल त्याचा तो कान्हा,

कान्हा,

कसा नाही दिसत तुज अजून द्रौपदीचा छळ?

कसं नाही भेटत तुज येण्यास कारण प्रबळ?

का नाही दिसत तूज अजून ग्लानी धर्माची?

का नाही वाटत अजूनही तुज गरज येण्याची?

कान्हा,

आयुष्याच्या बासरीतील मधुर स्वर ऐकवायला ये,

गोमातेचा-गोपालांचा गोपाळ बनून ये,

कंसाचा(विकृतींचा) काळ बनून ये,

सुदामाचा यार बनून ये,

आजच्या अर्जुनाचा सारथी बनून ये,

द्रौपदीचा संकटमोचक सखा बनून ये,

अन् हो राधेचा कान्हा बनून अवश्य ये,

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!....


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

【 Sketch by Reshma】

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...