मनुष्य म्हणजे भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील; आळवाच्या पानावरील, पाण्याचा थेंब.....!! सूर्याच्या किरणांमुळे काहीकाळ लकाकणारा, सोनेरी दिसणारा,..!! पण कितीकाळ सोनेरी..? अन् कितीवेळ अस्तित्व..?? याची कल्पना नसलेला जीव ....!! यात शब्दरूपी #जिंदगी_का_फ़ंडा�� चिरकाल राहील राहावा एवढीच भाबडी आशा.......!! 【काही चुकीचं वाटलं तर खुल्या मनाने आवश्य सांगा.. तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी अमूल्य आहे..आणि हेच शब्द लिहिण्यास प्रेरणा देतील】
Tuesday, September 29, 2020
त्यागमूर्ती..!!
अबोल...!!!
Tuesday, September 22, 2020
लॉकडाउन:-एक अकल्पनिय काळ...!!
Thursday, September 17, 2020
बैलपोळा-एक उत्सव...!!!
लेझीम चाले जोरात.
या ग.ल. ठोकळ यांच्या कवितेची हमखास आठवण होते ती बैलपोळयाच्या दिवशी.
बैलपोळ्याचा दिवस उगवला की, माझं सारं मन गोळा होऊन गाववेशीतून फिरून येतं. बसल्या बसल्या गावच्या आठवणी काढतं. लहानपणाच्या, शाळकरी असतानाच्या आठवणी मनात रुंजी घालतात.
वर्षभर शेतकऱ्याबरोबर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या बैलजोडीचा विश्रांतीचा दिवस म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा श्रावण अमावस्या किंवा काहि ठिकाणी भाद्रपद अमावसेला साजरा केला जातो.एव्हाना शेतीतील सर्व कामे झालेली असायची, सुगीचे दिवस सरून, धान्य शेतकऱ्याच्या घरात विसावा घेत असायचं.
बैलपोळ्याच्या आदल्यादिवशी बळीराजा त्याच्या सर्जा -राजाची शिंग घासून-पुसून स्वच्छ केली जायची.संध्याकाळी खांदा मळणीचा कार्यक्रम म्हणजे खांद्यावर तुप आणि हळद लावून सर्जा-राजाचा खांदा मळला जायचा, म्हणजे थोडक्यात हळदी समारंभ....!! त्यावेळी पावसाच्या नक्षत्राची नावं घेतली जायची आणि बैलाच्या हलचालीवरून बळीराजाला धान्याच्या बरकतीवर किंवा पावसावर संकेत मिळायचे अशी धारणा असायची.
दुसऱ्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी भल्यापहाटे उठून गावाच्या जवळच जनावरांसाठी चरण्यासाठी म्हणून राखीव जंगल असायचं त्याला गायरान म्हणलं जायचं.
गावातील सगळी बैलजोडी पहाटेच त्या गायरानात चरण्यासाठी असायची.खाऊन सुस्त झाल्यावर सर्जा-राजा मस्त उधळाचे, टोकदार शिंगांनी उचवट्याची माती उकरायचे.नंतर नदी-नाल्यामध्ये बैलांना अंघोळ घालून चकचकीत केलं जायचं.त्यादिवशी बैलाच्या मालकाचा म्हणजे धन्याचा उपवास असायचा.
घरी आणून हिंगुळ लावून त्यावर बेगड लावली जायची त्यावर छबीगोंडा लावून, मस्तकावर बाशिंग, गळ्यात चंगळ, घुंगुरु,गाठी आणि पितळेची साखळी बांधली जायची.
पायात पैंजण किंवा तोडा असायचा पाठीवर झुल असायची
आणि उघड्या अंगावर रंगानी रंगवला जायचा.बैलजोडी घुंगराच्या आवाजाच्या तालावर उंच उड्या मारायचे उधळायचे.
मग अगदी नवऱ्या मुलागत सजवून गावात मिरवणुकीसाठी घेऊन जायचं.पाटलाच्या बैलजोडीच्या मानानंतर मिरवणूक काढली जायची. महादेवाच्या मंदिराला फेरी मारून "हर हर महादेव" च्या गजरात गावातून मिरवणूक निघायची..!
मिरवणूक वेशीत आली की घाईघाईने पण अचूक नेम धरून एका ठोक्यात वेशीतल्या दगडावर नारळ फुटले जायचे.ते नारळ गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडायची.
घरी आल्यावर घर मालककिणीने बैलांच्या लग्नाची तयारी करून ठेवलेली असायची. सगळं व्यवस्थित आणि वेळेत व्हयचं. अंगणातल्या बाजेवर गव्हाची आरास घातली जायची, त्याच्या मध्यभागी एका मडक्यात दिवा ठेवलेला असायचा तो दिवा पोळीने झाकलेला असायचा.
बैलजोडी आणि मालक गावातून आलेले दिसल्यावर लगबगीने येऊन बैलांची मनोभावे पूजा केली जायची हळद-कुंकू लावून मालकीण पाया पडायची नंतर पोळीचा नैवेद्य खाऊ घालून,बैलांचं लग्न लावलं जायचं.
हातात पितळी ताट घेऊन त्याच्यावर लाटण्याने पिटवणारा आणि त्याच्या मागे "चाढं" घरून चालणारा...!!
यासाठी घरातल्या बच्चे कंपनीची चढा-ओढ असायची..!
ताट वाजवत फेरी मारणारा गजर करायचा.
"चावढ चावढ चांगभलं, पाऊस आला चांगभलं"
अश्या प्रसन्न वातावरणात लग्न पार पडायचं.
मग धनी उपवास सोडायचा.
सर्जा-राजाच्या घुंगराचा आवाज जसा कमी होत जाई तशी धन्याला समाधानाने झोप लागून जायची.बच्चेकंपनी भलतीच खुश असायची, दिवसभरातल्या गमती जमतीं सांगत, चांदण्या मोजत निद्रेच्या अधीन व्हायची.असा स्वतःच्या लेकराच्या लग्नाप्रमाणे उत्साह असायचा.
'जनावरांची पूजा करा', 'त्यांना जीव लावा' ही सुप्त भूतदया शिकवली जायची.
पण तद्नंतर विभक्त कुटुंब पद्धत उदयास आली,जमीनीच्या वाटण्या वाढल्या बळीराजाला बैलजोडी सांभाळणं, जिकिरीचं व्हायला लागलं.सर्जा राजांची जागा निर्जीव ट्रॅक्टरनी घेतली.
आता हा आनंद आजच्या पिढीला कधीच अनुभवता येणार नाही.खूप सुंदर होते ते दिवस...!!
आता गावात क्वचित बैल दिसतात कुतूहलाने डोळेभरून पाहून बालपणीच्या दिवसांचे आभार मानून चालत राहातो.
आता गाववेशीतून बैलपोळ्याच्या दिवशी कुणाला मिरवायचं? खापराचे मांडे, पुरणपोळी कोणी बनवायची? बैलं तरी किती आहेत गावात मिरवायला? आनंदाने बैलांचा सांभाळ करणारे किती शेतकरी उरले आहेत?
बैलपोळा वेशीत उभा आहे गतकाळाच्या आठवणी उगळीत! आठवणींना घुंगराच्या तालावर खेळवत , मान डोलवत आठवणींच्या प्रदेशात खेचत.....!!
"धन्य तो धनी आणि धन्य ती सर्जा-राजाची बैलजोडी"
#बैलपोळा🎉
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Tuesday, August 18, 2020
धावणारी 'तू'...!!!
Friday, July 31, 2020
बघ काही आठवतंय का...??
बघ काही आठवतंय का..?
श्रावणात पडणाऱ्या बेधुंद सरी,
बघ मनाला ओलाचिंब करतायत का..?
अलगद ओंजळीत साचलेलं पाणी पहा,
बघ कशाची ओळख देतंय का..??
दुरून चालत येणारी गुलाबी छत्री पहा,
बघ काही आठवतंय का..?
सरी थोड्या मंदावल्यावर बाहेर ये,
साचलेलं पाणी थोडं उडवुन पहा,
बघ काही आठवतंय का..?
कोपऱ्यावरच्या टपरीवरचा वाफाळता चहा पिऊन पहा,
बघ काही आठवतंय का..?
त्या चहाच्या नशेबरोबर चढलेल्या गप्पांची रंगत ऐक,
बघ काही आठवतंय का..?
झाडांवरून घरंगळत मातीत मिसळनाऱ्या श्रावण सरी पहा,
बघ काही आठवतंय का??
बघ काही आठवतंय का??
#सहजच_श्रावणसरी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Monday, June 22, 2020
तो, ती अन् कातरवेळ...!!!
सूर्याच्या क्षितिजाकडे रुतल्याने पूर्ण आभाळ तांबूस रंगात अगदी नाहून निघालं आहे त्यात हे थव्याचं विहंगम दृश्य खेचुन घेतंय... आकर्षित करतंय,रोखायचा प्रयत्न ही करू देत नाही...!!
दुरून गाणकोकिळा कुहुकुहू करतेय,
आत्ताच पाऊस थांबल्याने निसर्गाने अगदी नव्या नवरीसारखा साज चढवला आहे.रानातून थकून आलेला आई बाबांचा देह घराच्या अंगणात स्थिरावला आहे...!
रानात गेलेली जनावरे आता गोठ्यात येऊन थबकली आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटेच्या लयबद्ध सौम्य घंटानादात त्यांच्या पाडसाना जवळ घेत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
एवढा शांत-स्तब्ध निसर्ग भासत असताना,
'तो' मात्र त्या क्षितिजाकडे इंचा-इंचाने रुतत जाणाऱ्या सूर्याकडे टक लावून शांत बसलाय, कश्याततरी अगदी हरखून गेलाय.. यात विशेष असं काही नव्हतं,तो त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन दररोज त्या सूर्याचं कातरवेळेचं सौंदर्य टक लावून पाहणं त्याचा छंदच आहे, होता.....!!
त्याला त्या परतीचा प्रवास करणाऱ्या सूर्याचा हेवा वाटत असावा... कदाचित...!! अस्तित्वाला राम-राम ठोकत असतानाही त्याच्या रंगांच्या उधळणीवर-महोत्सवावर जळत असावा, कदाचित....!! त्याच्या औदार्याचा हेवा करत बसत असेल, त्याचही असंच काही स्वप्न असेल आयुष्याच्या संध्याकाळचं, परतीच्या प्रवासाचं महोत्सव करत रंगाची उधळण करत जिंदगीला राम राम ठोकण्याचं...!!
पण त्याचं अन् तिचं-कातरवेळेचंं काहीतरी असं अतूट ऋणानुबंध असावेत, कोणतंतरी अनामिक नातं त्याला दररोज त्याचवेळी- सूर्य डुबण्याच्या वेळी, अनामिक ओढीने खेचून नेतं.
'तो'ही हातातील सर्व कामे टाकून धावत जातो,अगदी खूप दिवसातून भेटणाऱ्या प्रेयसीला भेटताना जी डोळ्यात चमक असते, जी ओढ असते ना अगदी तीच ओढ, तिच चमक तोच उत्साह....!!!
पण आज काहीतरी वेगळा भासत होता 'तो'...!! क्षितिजाकडे रुतणाऱ्या सूर्याकडं पाहत तर होता,पण मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं त्याच्या...!! चेहऱ्यावर कोणाच्यातरी आठवणीत व्याकुळ झालेले भाव स्पष्ट दिसत होते ...!!!कोण असावं बरं...?? असो पण या कातरवेळी कोणाबरोबरतरी घालवल्या असल्याच्या शंकेला डोळ्यातील चमक दुजोरा देत होती...!!
ते जगलेले क्षण आज आठवणी बनुवन डोळ्यात चमकत होत्या....!! कातरवेळेच्या सूर्याचं क्षितीजात रुतण्याचा अन् सूर्याने जातेवेळी केलेला महोत्सव कदाचित त्यांच्या अनामिक नात्याचा साक्षीदार असावा....!!! तो एकमेव साक्षीदार असेल त्यांच्या अनामिक नात्याचा, ज्याने जवळून पाहिलं असेल त्यांना एकमेकांसाठी, भेटण्यासाठी बोलावं लागणारं खोटं...!! मित्र-मैत्रिणींची आप्तेष्टांची नजर चुकवून कधी-कधी खोटं बोलून भेटण्यासाठी,सूर्याचा महोत्सव पाहण्यासाठी केलेली धडपड...!!त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन काही न बोलताही सर्व काही बोलल्यासारखं हलकं वाटण्यासाठी...!!!
धावत जाऊन दररोज भेटलं तरी खूप वर्षांनी भेटल्यासारखं उत्साहाने गळाभेट घेण्यासाठी धावत-पळत याचं सांजवेळी भेटले असतील ते तिघे....!!
'तो', 'ती' अन् 'ती'-कातरवेळ
हे सर्व-सर्व एखाद्या पुस्तकातील ओळी वाचाव्यात तश्या त्याच्या चेहऱ्यावर आज स्पष्ट वाचता येत होत्या...!! बरेच दिवस झाले होते त्यांना विभक्त होऊन..!!
पण 'त्या'ने ती कातरवेळ दुसऱ्या कोणाबरोबर न घालवता आता एकट्याने घालवत होता...!! कदाचीत 'ती' ही घालवत असेल बसत असेल क्षितिजाकडे डोळे लावून...!!
'तो' ही आज जाब विचारत असेल त्या कातरवेळेला, त्या अनामिक नात्याच्या साक्षीदाराला...!!एवढं सुदरतेने- महोत्सवाने नटलेल्या क्षितीजाला........!!!
या महोत्सवासारखा असावा आपला ही परतीचा प्रवास
निरोपाच्या क्षणींही हसत-खेळत महोत्सव करत, रंगांची उधळण करत व्हावा प्रवास दिगंतरापर्यंतचा......!!!
#जिंदगी _का_फ़ंडा🍃
Wednesday, June 10, 2020
स्त्री तुझं नक्की गाव कोणतं....??
भावंडांबरोबर सुख-दुःख पचवलेले असतात. चुकलं तर आई-बाबांनी दिलेल्या मारामध्ये, खाऊमध्ये अगदी समसमान वाटप झालेली असते नव्हे केलेली असते.
पण, पण वयाच्या 23-24 वर्षांनंतर असं काय होतं की तिला हे अंगण परक्या सारखं वाटतं...??
कारण, आता वयाच्या 24 वर्षापर्यंत जे आपलं घर आपलं अंगण असं वाटत होतं ते आता माहेर होणार असतं...!! म्हणजे 23-24 वर्षाच्या आठवणी, गावाशी, घराशी, घराच्या अंगणाशी जुळलेलं भावनिक नातं हे परकं होणार होतं...!
किती हा मोठा त्याग....!!
जे आजपर्यंत मनावर ठासून बिंबवलं असतं की हेच माझं घर आहे. भावंडांशी बरोबरच्या वाट्यासाठी भांडणं केली असतात.
आई शेजारी झोपण्यापासून ते बाजारातून आणलेल्या खाऊमध्ये भांडून मिळवलेला वाटा हे सगळं काय होतं?
आभासी होतं का...??
म्हणजे आतापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी-सवयी सोडायच्या असतात, भले चांगल्या असो वा वाईट...!!!
म्हणजे 'ती' म्हणून असं काही उरतच नाही.
जे करायचं ते फक्त या 24 वर्षानंतर भेटलेल्या आपल्या माणसांसाठी....!!गजब है यार...!!
त्या घराला, त्या अंगणाला, आपलं मानायचं नव्हे-नव्हे म्हणायचंय...!!
इथली माणसंच,आपली म्हणायचं दिगंतरापर्यंत....!!
अन् एवढं सगळं त्यागून, चुकून काही झालं तर ही माणसं, तो त्याग, तिचं मन पाहत नाहीत...!!
अन् जेव्हा कधी 'ती' कंटाळवून माहेरी येते.तेव्हा माहेर ही खूप बदलेल असतं.
वपूनी लिहून ठेवलंय, पचायला जड आहे पण कटुसत्य आहे::--
(टीप:-सगळेच पुरुष-नवरे नाही पण हे लागू होतं बहुतांश वेळा....!! पुरुषांनाही भावना असतात मध्य साधायचा असतो)
"या नवऱ्यानां मोलकरीण, स्वयंपाकिण, शय्यासोबतीण, मैत्रीण, पत्नी आणि पोरांची जबाबदारी उचलणारी एक परिचारिका हवी असते. त्याशिवाय ती मिळवती हवी पण तिला लौकिक नको. एका बायकोत स्त्रीत त्यांना इतकं हवं असतं...!!"
किती शोकांतिका ही....!!
आजपर्यंत तिच्या वाट्याला काय आलं....!!
मग त्या त्यागमूर्तीचं नक्की गाव कोणतं...?
तिच्यावर ऍसिड हल्ले होतात,
विकृतींकडून शिकार होते,
नक्की तिची चूक काय..??
एक स्त्री जन्म हीच चूक म्हणावी का..??
कारण तिचं असं कायमस्वरूपीचं मुक्कामाचं ठिकाण कोणतं...??
'ती' त्यागच करत येते, स्पंदनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत....!!!
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Saturday, May 23, 2020
आम्ही गावाकडचे की शहराचे...??
त्याचबरोबर उदासीनतेनेही पाठ सोडली नाही, पहिल्यांदाच घर सोडावं लागणार , आई-आण्णांपासून दूर जावं लागणार...!!
नवीन मित्र-मैत्रिणी , हॉस्टेलला जमेल का...?? वैगरे, वैगरे असंख्य प्रश्नांनी डोक्यात विचारांचं काहूर माजवलं होतं.
आता पहिल्यांदाच पुण्यात जावं लागणार होतं, मनाच्या एका कोपऱ्यात कुतुहुल ही होतं तर दुसऱ्या कोपऱ्यात असुरक्षितता....!!
कुतुहुल का...?? तर विद्येचं माहेर घर म्हणलं जाणाऱ्या शहरात M.Sc करायला मिळणार होती अन् त्यात भरीसभर युनिव्हर्सिटीमध्ये..., आणि असणारं पुण्याचं आकर्षण वेगळंच...!!!
तर हे शहर आपल्याला स्वीकारेल का..?? याबाबत असुरक्षितता, आपण काहीतरी विभिन्न आहोत काय की ...?? हा न्यूनगंड....
मायानगरी भल्यापहाटे चालू होणारी अन् रात्री 12-1 पर्यंत जागी असणारी पुण्य नगरी....अन् यामध्ये आत्ता सुरू होणार होता, स्पर्धेच्या जगातील जीवघेण्या गर्दीतला कायमच धावपळीचा प्रवास......! जसं एसटीची चाकं फिरत होती, तसं डोक्यात विचारांचं काहूरही गरगर फिरत होतं.
आता गाव , गावातील गल्ली, घर अन् अंगण हे सगळं सुटणार होतं, सुट्टी भेटली म्हणून कधी गावी आलोच तर तो ही कायमचा पाहुणा म्हणूनच येणार होतो, स्वतःच अंगण आता परका म्हणून पाहणार होतं, ज्या अंगणाने पाहिलंय माझं पहिलं पाऊल टाकताना लटपटणारे पाय, ऐकलंय माझ बोबड बोलणं अन् हासलही असेल मनोमन, हे तेच अंगण ज्याने पाहिलंय सुखद क्षण अन् दुःखद आठवणीही, यानेच दिल्या होत्या काही सुखद तर काही दुःखद जखमा आता त्याच अंगणात मी पाहुणा म्हणून परका तर होणार नाही ना....?? या विचारांनी डोकं सुन्न होत होतं अन् डोळ्यांच्या कडा ओलसर...!!
गावातील उनाडक्या केलेले दिवस, अंगणातली बाग , पारावर बसणारी जेष्ठ मंडळींची बैठक अन् त्यांच्या गप्पा...!! सर्व -सर्व डोळ्यासमोर तरळत होतं, जसं-जसं एसटी शहर जवळ करत होती तसं तसं या माझ्या गावाच्या गोष्टीपासून दूर जात होतो...!!
जेव्हा कधी शहरातल्या गर्दीत एकटा हरवून जातो ना तेव्हा- तेव्हा प्रत्येकवेळी हाच प्रश्न आजही पडतो.
आपण गावाकडचे की शहराकडचे...?
गावाकडचे म्हणावं तर आपण इथे फक्त सुट्टी मिळाली तर काही काळासाठीच येतो म्हणजे पाहुणे बनुनच...!!
अन् शहराचे म्हणावं तर शहर कधी आपलंसं वाटलंच नाही, इथं दिसते ती फक्त जीवघेणी स्पर्धा, जीव गुदमरून टाकणारी, इथली माणसांमध्ये कधी मायेचा ओलावा, आपलेसे पण कधी जांवलंच नाही...!!
मात्र ना गाव सुटलं गेलं, ना शहराने स्वीकारलं....!!
गावाकडचं निरागस प्रेम इकडं कधी दिसलं नाही अन् शहर बदलत गेली पण माझ्या गावाने धुळीची वाट सोडली नाही. आई-आजीने सारवलेली भिंतीतून येणारा पहिला पावसाचा सुगधं आजही विसरत नाही...
आजोबांनी गायलेले भल्या पहाटेचे ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग अन् दिवे लागणीच्या वेळेचा हरिपाठ कानात आजही गुणगुणत राहतो, एक मृत्तिमंत भास देतो...!!बापाचा काम करून थकणारा देह आजही अंगणात आला की उत्साहित होतो...!!
कातरवेळीची शांतता अन् प्रसन्नता जाणवत नाही.
हे सर्व-सर्व आता चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत होतं
तसं शहरात यातलं काहीच अनुभवता येणार नव्हतं, इथं फक्त गर्दीतलं जीवमुठीत धरून जगणं अन् गाड्यांचे कर्कश आवाज, शांत झोप ही न येऊ देणारे... हे सगळं वास्तव होतं ते स्वीकारावच लागणार आहे....
अन् परत शहराकडे पावलं टाकावीचं लागणार आहेत .
न थकता ......!!!!
Thursday, May 14, 2020
मनाच्या कप्प्यातून....!!
मन हे नुकतंच पाऊल टाकायला लागलेल्या बाळाचं अंगणातलं पहिलं पाऊल असतं, नाविण्याने नटलेलं...कुतूहलाच्या शोधात असलेलं , नाविण्याला चटावलेलं...!!
मन तोल सांभाळत, आधार घेत उत्साहाने पण घाबरत टाकलेलं पाऊल असतं...त्यात तितकाच अल्लडपणा, अगदी छुन-छुन वाजणाऱ्या पैंजनासारखा...
मन असतं खळखळत्या झऱ्यासारखं ,परिणामांची पर्वा न करता स्वतःचा प्रवाह स्वतः निर्माण करणारं,
झऱ्यासारखं वाट मिळेल तिकडं धावणारं.
मन असतं समुद्राच्या शांत दिसणाऱ्या पाण्यासारखं पण असंख्य भूकंपाचे धक्के अन् ज्वालामुखी पोटात साठवून सुद्धा शांत दिसणारं.....झालंच असह्य तर किनाऱ्याला जाब विचारणारं त्सुनामीसह
मनाच्या वारू वर स्वार झालं तर वास्तविकतेचा लगाम घट्ट असावा लागतो नाहीतर अपघात अटळ असतो.
हेच मन हळवं असतं तर कधी निगरघट्ट मुर्दाड , सतत वास्तविकतेच्या जगात जगणारं.
यात पायाखाली आलेली मुंगी पाहून डोळ्यात टचकन पाणी येणाराही असतो अन् आत्ताच जगाचा मायावी प्रवास संपलेल्याचं स्वतःच्या हाताने पोस्टमार्टेम करणाराही....!!
जखमांनी घायाळ झालेला , ज्याने मरण जवळून पाहिलंय म्हणून भावनाशून्य मुर्दाड बनलेला योग्य की हळहळ व्यक्त करणारा, होऊन गेलेल्या क्षणांना कवटाळुन बसलेला...??
गंभीर आरोप्याला फाशी देणाऱ्या जल्लादाच काय?त्याला नसेल का मन, कधी फाशी देताना हात नसेल का थरथरला, अंग शहारून नसेल का आलं??
मग प्रश्न उरतो, तो मन संवेदनशील असणं शाप की वरदान?
बरोबर, एवढा विचार करायला आम्हाला कुठं वेळ आहे.
फोर व्हीलर घ्यायचीय, मस्त घर घ्यायचंय सो called luxurious life जगायचंय?? जसं कधींच या जगातून आपला प्रवास संपणारच नाही. आलीच तशी वेळ तर प्रेमाने कमावलेल्या माणसांच्या आठवणीत, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात थोडीच राहणार आहोत. दिगंतराचं गाठोडं बांधताना ही luxurious life घेऊन जायचीय होय ना ??
त्याच्यावर आपण समर्थनार्थ म्हणतो मी सहज बोललो होतो, मग त्याने ही सहज घ्यावं अन् उपदेशपर आव आणत ऐटीत म्हणतो, असं किती लोकांचं मनावर घेणारयस...
गंमत आहे ना ??
संवेदनशील मन असणारा एकतर रात्र रडत-कढत काढतो, दुःखाने विव्हळत असतो, नाहीतर मग सर्वांवर वार करत सुटतो... यात जवळची म्हणवणारी माणसंही भरडली जातात, दुरावली जातात. यात आपण दूर जातो नाहीतर ते स्वतःहून दूर होतात.
चांगुलपणावरचा विश्वास डगमगतो. त्यांना मध्य साधता येत नाही, नव्हे नव्हे साधत नाहीत.
जीवन एवढं क्षणभंगुर असताना, उद्या काय होणार याची कोणतीच शाश्वती नसताना आपण का दुखावतो एकमेकांना...??
पुढच्या क्षणी काय होणार याची कल्पना नसतानाही आपण एकमेकांविषयी आकस बाळगतो मनं दुखावतो.
पण जर तिथं भेटलेल्या व्यक्तीने तुमची आपुलकीने खुशाली विचारली अन् एक गोड smile दिली तर तुम्हाला किती हायसंं वाटतं ना.
मग तुम्हीही या प्रदेशात अनोळखीच अन् पाहुणेच आहात
मग का असावं आपण असं...?
का बोलू नये हृदयाच्या तळातून,भरभरून...!!!!
दूर जाणाऱ्याला एकदा तोंडभरून हाक मारावी अन् एक प्रेमभराने मिठी मारावी, काय माहीत ती दूर चाललेली व्यक्ती परतवून येईल, पुन्हा नव्याने नात्याला पालवी फुटेल, बहरेल नातं पूर्वीप्रमाणे....!!
प्रत्येकाच्या मनाचा-भावनेचा आदर व्हावा,तर जग खूप सुंदर दिसेल.
आजच्या धक्काधकीच्या गर्दीत माणसं माणसानं भेटतच नाहीत. भेटतात ते मुखवटे घालून , त्यांना घट्ट चिकटलेल्या असतात आशा,आकांशा महत्वकांक्षा अन् हेतू .....!!
हेतू साध्य झाला की ती माणसं दूर निघून जातात. मग हळव्या मनाची माणस स्वतःचा त्रागा करून घेतात स्वतःला दोष देत राहतात...!! स्वतःला समजवावं ती माणसं कधी आपली झालीच नाहीत मग एवढा त्रागा का, उलट त्यांच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांची पुंजी जपून वापराची, संपत आलेल्या कुपितल्या अत्तराप्रमाणे...!! त्यांचं जाणंही अपरिहार्य असेल...!!
म्हणूनच आहेत तोपर्यंत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत,काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद?
कोणीतरी म्हणून ठेवलंय....!!
सर्द भिजलेला....!!!
ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...

-
"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!! फुलांनी बहरलेल्या ब...
-
हेच आग विझवणा रं पाणी, दुष्काळात कधी पेट घेतं हे कळतंच नाही ....!! 'पाणी जपून वापरा' हे वाक्य आम्हांला नवीन नाही माय...
-
सांजवेळी बसावं असंच गावातील उंच टेकडीवर,.. !!अश्या जागेवर की जिथुन दिसेल सगळं गाव , गावात येणारी धुळीची वाट , आपलं घर , आपलं अंगण...
-
चल गड्या, आता पसारा आवरायला घेऊ, माळ्यावरच्या गोष्टींची थोडी निवड करू, थोडं तुझं, थोडं माझं समजून घेऊ, अडगळीवरची धूळ थोडी साफ करू..!! आपलं, ...
-
दिवसभराच्या धावपळीने थकलेलं शरीर बेड वर पडताच झोपी गेलं होतं. पावसाळा सुरू होऊन दहा-एक दिवस उलटून गेले होते, पण अजूनतरी म्हणावा असा पा...
-
मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे, यावर्षी धरतीवरचे सर्वच जीव-जंतू , झाडे-वेली, पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते...!! अन् काही ओळी स...
-
एके दिवशी मेट्रो सिटी असणाऱ्या पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जे एम रोडवरून फिरत असताना , एक 8-9 वर्षाचा मुलगा अंगावर मळलेले क...
-
काही ठिकाणी गेल्यावर तुम्ही स्वतः हरवता त्या सुंदर विश्वात ....!! तुम्ही स्वतःच स्वतःचे होऊन जाता; अन् माणूस जेव्हा स्वतःला...
-
एखाद्या संध्याकाळी स्मशानातून एक फेरी मारून तर पहा काय दिसेल....!! ऐशोआरामी अगदी श्रीमंतीत जन्मलेला आणि गरीबीत हालाकीत...
-
प्रवासी या वाटेवरचा, अनेक चुकांच्या साक्षीला, 'तू' कायम सोबतीला, मी मात्र साक्षीदार माफीचा..!! अल्लडपणात धूळ उडवली, अगदी अस्पष्ट मू...