ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता. घाई-घाईत सगळं साहित्य बॅगेत त्याने अक्षरशः कोंबून भरलं होतं, त्यात आवर्जून घेतलेली छत्री मात्र ऑफिसातच विसरून राहिली होती... नेहमीप्रमाणे... ही व्यथा खुप पुढं निघून आल्यावर त्याच्या ध्यानी आली होती. पण आताश्या सुटलेल्या गोष्टींचं काही सोयर सुतक राहिलंच नव्हतं. कित्येक छोट्या मोठ्या क्षणांना आपलंस करण्यात, कितीतरी 'आपल्या' म्हणाव्या अश्या गोष्टी पुढ्यातून निसटल्या होत्या, काही सोडल्याही होत्या. त्यामुळे छत्रीच त्याला काही विशेष असं वाटलं नाही. प्रत्येकवेळी सुटलेल्या गोष्टींचा मतितार्थ मात्र काढून झाला होता 'कदाचित हे असंच असेल जीवन असं कायम वाटत होतं'...!!
कसं असतं ते जगणं...? कोणाला विचारणार ना...? ज्याच्या त्याच्या व्यथा अन् कथा अलगच असतात...
माणसं वाढली, कनेक्टिव्हिटीही वाढली पण काहीतरी दुरावलं हे मात्र नक्की हे पुन्हा प्रकर्षाने जाणवलं ....!!
धक्के खात, रस्त्याच्या अवस्थेमुळे शेजाऱ्यांचे
कोपरखिळे खात ... त्याच्या घराचा (सॉरी फ्लॅटचा) स्टॉप येऊन जातो. बॅग सावरत, मोबाईल सावरत त्याने उतरून घेतलं. आत्तापर्यंत थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा त्यांच स्वागत केलं. सुटलेल्या छत्रीचा मनस्ताप देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण त्याला काही फरक पडलाच नाही. सर्द भिजलेल्या कपड्यानिशी तो सोसायटीच्या दारात आला.
जखमेवर मीठ म्हणा... नाहीतर काळजी म्हणा... वॉचमनने हात करत "साहेब आजही छत्री विसरलेच होय....!" असं म्हणत गालात हसला...!!
छत्रीचं कौतुक त्याला काही नव्हतंचमुळी...कित्येक जगाला न दिसणाऱ्या गोष्टी सुटल्या होत्या.. त्याला ही आठवत नसतील इतकं काही 'आपलं' स्वतःचं म्हणावं असं सुटलं होतं... त्यामुळे तोही आपल्याच भिजलेल्या सर्द झालेल्या स्वतःकडे पाहत कुत्सित हसला...!
तसाच जीना चढत तो खोलीत आला.
बॅग ठेवून, चेंज करून, वाफाळता चहा बनवला अन् गॅलरीत आला.
गॅलरीत बसल्यावर, त्याला आत्तापर्यंत धावतच होतो याची जाणीव होऊन गेली. धावण्यात, धावतो आहोत हेही कळू नये याचं मात्र नवल वाटलं.
गॅलरीतून जाणवणारा बेधुंद पाऊस, त्याबरोबरच थंड वारा आणि खाली रस्त्यावर गर्दीतून वाट काढत पटपट घर जवळ करणारी , जगण्यासाठी धावणारी सगळी माणसं तो पाहत होता.
काहीवेळापूर्वी याच गर्दीचा एक भाग असणारा तो आता मात्र शांत एकांत अनुभवत होता, आपल्या गॅलरीतल्या आवडत्या जागी बसून....!!
ऐन तारुण्यातल्या रंगीबेरंगी रंगवलेल्या आयुष्याचा इतका ब्लॅक अँड व्हाईट कॅनव्हास असेल असं कधी कल्पनेत ही न वाटलेला तो.... गॅलरीतल्या वाफाळत्या चहाचा तो निवांतपणा कृतार्थ होऊन अनुभवत होता...
गावाकडच्या आठवणी, कॉलेजातल्या आठवणी, ती दंगा मस्ती, तो अल्लडपणा... वाट्टेल तेव्हा सायकल काढून, नंतर थोडे मोठे झाल्यावर बाईक काढून मारलेली सैर ही किती अनोखं होतं ना...!!
असं स्वतःशीच बडबडत होता...
जीवन जगायचंय म्हणता-म्हणता खूपच दूरवर आलो की काय असंही वाटून गेलं. हाही कित्येक दिवसांनी मिळालेला क्षण उद्यासाठी अप्रूपच वाटेल काय की ...?? याचीही शंका वाटून गेली.
हातातला चहा संपत आला होता, पण कॉलेजच्या कोपऱ्यावरच्या टपरीवरचा चहा मात्र अजूनही ताजातवाना वाफाळताच होता, आठवणींच्या रूपात...!!!
चहा प्यायला म्हणून गेलेली जमात तासंतास रमलेली असायची, कोण चहामध्ये, कोण सिगारच्या धुरामध्ये, तर कोण कोणाच्या धुंदीमध्ये...तर कोण गप्पांच्या लहरीमध्ये... किती अनोखं होतं ना हे सगळं, अगदी सुंदर स्टोरीच्या चित्रपटांसमचं...
आताही दिसते की ती टपरी दुरून, तोच चहावाला, तीच गरम चहाची किटली, तोच चहाचा सुगंध...
पण फक्त चहापिणारे बदलले, त्यांच्या कहाण्यांमधील पात्र बदलले, कहाण्या या सर्वांच्या सारख्याच हो , काही अर्धवट, मळकट कळकट झालेल्या...
.... दुरूनच टपरीकडे बघत 'तो' शोधत होता...
हरवलेल्या 'त्याला,, सुटलेल्या 'ति'ला अन् स्वतःमधल्या अल्लड बालकाला...!! आजही धावता धावता.... पावलं अडखळतातच...पापण्या ओलवतातच, वळवाच्या पावसासम अवकाळपणे....!!
#जगणं ❣️
#जिंदगी_का_फंडा🍃