Sunday, February 23, 2020

वसुंधरेकडून घेऊ काही ....!!!


      कसा असतो ना निसर्ग ....!! झाडाची पूर्ण पानं गळून गेले तरी नाउमेद न होता, नव्या जोमाने सुरवात करतो अन् तीच ऊर्जा तोच गोडवा घेऊन सर्वांना आनंदित करतो...!!
       झाडाचं गळून पडलेलं प्रत्येक पान जाता-जाता छान संदेश देऊन जातं, मी  जातो आहे, पण माझ्या जाण्याने नवनीनिर्मितीचा कोंब फुटणार आहे,नवीन पालवी फुटणार आहे अन् याच आनंदात मातीत मिसळून जातं मातीचं होतं.!!
     नवनिर्मितीची हे संक्रमण हे कोणाच्यातरी त्यागातून कोणाच्यातरी निस्वार्थी,समर्पणाच्या भावेतूनच चालू राहत असतं.
याच गोष्टी जर निसर्गाची निर्मिती असणाऱ्या मानव मध्ये आल्यातर निसर्ग जसा नवप्रेरीत करणारा , नाविन्याचा ध्यास असणारा सृजनशील आहे. तसाच मानव ही सृजनशील, नवप्रेरीत अन् नाविन्यपूर्ण असेल..!
पण आपल्याला स्वतःची तर सोडाच पण निसर्गाकडूनच मिळालेली गोष्ट देण्यास आपण कचरतो.
निसर्गाकडे पाहीलं तर खूप प्रेरणा मिळते, पण आपण चांगलं लवकर घेत नाहीत, स्वीकारत नाहीत.
जे स्वीकारायला पाहिजे, ते अंगवळणी पडत नाही अन् पडलंच तर ते समाजात रुचत नाही.
म्हणूनच माणूस हा प्राणी निसर्गाची निर्मिती असूनही निसर्गासारखं पारदर्शक, दानशूर, निस्वार्थी कधीच होत नाही, होता येणारही नाही...!
   आपणास विंदा करंदीकरांची कविता पूर्णत्वाने लागू होते.
        "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे"
        "घेता-घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे"
माणसाला आणखी एक  भा.रा. तांबेच्या कवितेचं बिरुद लावलं जातं की जे साजेसंच आहे...!!
        'जो तो वंदन करी उगवत्या,'
        'जो तो पाठ फिरवि मावळत्या,'
        'रीत जगाची ही रे सवित्या'
       "स्वार्थपरायणपरा |"
पण त्याच निसर्गाची निर्मित्ती असणारी पानं, फुलं, फळांच्या बाबतीत असं कधी होत नाही.
      त्यांचा परोपकारी, निस्वार्थी बाणा आपणास छान संदेश देऊन जातो. फक्त पाहणाऱ्याने त्या-त्या नजरेनं पाहावं....!!
      काही सुगंधी फुलांकडे सौंदर्य असेलचं असं नसतं अन्
काही दिसायला मोहक असतात पण ते सुगंधी असतातच असं नाही..!!
पण आपण इथंही अपेक्षा करतो की सुंदर दिसणाऱ्याने सुगंधितही करावं
कसं शक्य आहे....!!??
       ज्या झाडाने फळातील गोडवा द्यावा त्यानेच कसं वाटसरूस शीतल छाया द्यावी....!!
       भल्या पहाटे उठून निसर्गाच्या सानिध्यात एक फेरी मारली तर  निसर्गाचा नवीन आविष्कार अनुभवण्यास मिळतो.
तो पक्ष्यांचा किलबिलाट, दूरवरून ऐकू येणारी कोकिळेची कुहुकुहू , असाच दूरवरून संदेश घेऊन येणारा, पानांची शीळ वाजवणारा, मंद थंडगार वारा..! त्याची झुळूक जेव्हा सर्वांगाला स्पर्श करून जाते ना, तेव्हा कोण्या एका प्रियकराने किंवा प्रियसीने फुंकर मारल्या नंतर जी आवर्तने निर्माण होतात अन् पूर्ण अंग शहारले जातं तसा भास होतो...!!
        नंतर पूर्वेकडून क्षितिजाआडून आकाशाला त्याच्या रंगानी नाहून टाकणारा सुवर्णगोल पूर्ण आभाळ तांबूस रंगाने रंगवतो अन् आदल्या दिवसापेक्षा जास्त तेजोमय उत्तेजित दिसतो. तेव्हा तो क्षण पाहणं अवर्णनीय असतं ...!!!
तेव्हाच पक्षी आपल्या पिल्लांसाठी खाऊ आणण्यासाठी उंच आकाशी फरारी घेतात, तो क्षणही  तांबूस रंगात लोभनिय वाटतो...!!
      अन् हीच निसर्गाची देणगी दिवसभरासाठी पुरून उरते....
पण माणूस दिवसभराच्या कटकारस्थानाने थकतो
त्याला परत उत्तेजित करण्यासाठी असते ती कातरवेळ..!!
   दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ म्हणजे कातरवेळ.
पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल दिसू लागला की सुरू होतो सूर्यास्ताचा अटळ उत्सव. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त उधळण होते . नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण होते.
      सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....... या कातरवेळी प्रत्येकाला हवा असतो एकांत ....एक स्वतःचा क्षण....त्यावेळेस त्याला भान हरपून शांत बसणं पसंद असतं....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, December 23, 2019

अडगळीतलं सोनं...!!!!

      आज रात्रीचं जेवण झाल्यानंतर, मांजरी रोड वर शतपावली करावी म्हणून चालत होतो...!!
      तेव्हा एक दृश्य मनाला छेदून गेलं , त्याच्यांकडे लक्ष जायला कारणही तसंच होतं...!
       साधारणतः 70-75 वय वर्षे असणारे आजोबा हातगाडीवर मेथीच्या 20-25 जुड्या घेऊन विकण्यासाठी बसले होते , त्यांना साधं उभाही राहता येत नव्हतं, तरीही ते स्वतः ला संभाळत हातगाडी पुढे-पुढे ढकलत चालत होते....!!!
मग मनात असा प्रश्न पडला , कुठून येते यांच्याकडे एवढी ऊर्जा...!?
     आयुष्यभर कष्ट केलेलं असतं, कारण की आयुष्याच्या संध्याकाळी थोडे-थोडके सुखाचे दिवस येतील, दोन घास आनंदाने खाता येतील, नातवंडांबरोबर लहान होऊन जगता येईल, कोडकौतुक करता येईल...!!!
     या आजीं-आजोबांनीही हीच स्वप्ने पहिली असतील, यांनीही ऐशोआरामी जीवन जगण्याचे छान बेत केले असतील, आयुष्याची संध्याकाळ आपल्या प्रियजनांबरोबर घालवण्याची स्वप्न रंगवली असतील . पण मग या वयातही का असावी ही व्यथा ...!!
त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी तर इतर खूप साधनं होतीच की, वृद्धाश्रम होते, मंदिर -मज्जीद होती....!!
पण मग त्यांनी ही वाट का निवडावी...??
      तर याच्यासाठी माझ्या आकलनांनुसार एकच शब्द होता अन् तो म्हणजे "स्वाभिमान"...!
     "उतार वयातील व्यक्ती म्हणजे वय झालेलं उपजत बालकचं...!!"
      सगळं साथीनं करत असताना काबाड कष्ट करून त्यांच्या लेकरांची पोटाची खळगी भरवलेली असतात.
      आयुष्यभर केलेल्या तडजोडी, उपभोगलेले मान , पचवलेलं अपमान, झेललेली अवहेलना, अन् भोगलेली दुःखं....!!!
यामुळे त्यांची सहन करण्याची क्षमता संपलेली असते. आपल्याचं लोकांकडून आलेले बोल, त्यांना अनुकूचीदार बाणांसारखे हृदयात खोलवर रुतत जातात अन् ती जखम घेऊन चालणं आता अशक्य होतं...!
      ज्या लेकासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र केली,  त्याच्याकडुनच आज अवहेलना सहन करावी लागतेय...!
      मग जागा होतो तो स्वाभिमान, जो जपण्यासाठी आयुष्यभर धडपडत होते, आयुष्यभर त्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला , म्हणून मग आतातरी होऊ द्यायचा नाही...!! समाजातील असे आजोबा-आजी सत्तर पंचाहतरीनंतरही तरुण असलेले, आयुष्याच्या संध्याकाळचं चिरतरुण जीवन जगतात.......!!
       कोण हातगाडीवर भाजी घेऊन बसतं, कोण केळी घेऊन खणखणीत आवाजात केळी घेण्यासाठी आरोळी देतंय तर कोण आणखीही गावातल्या वाण्याकडे भाकरी वारी हमाली करतंय...!!
कोण मंदिराची साफ -सफाई करतंय, कोण मार्केटवर काही काम करून, पण स्वाभिमानाने ताठ मानेने तरण्याबांड पोरासारखं ऐटीत चालतंय...!
     पण काही जीवनात हार मानतात, आहे ते दिवस ढकलायचेत म्हणून चालतायतं, आधुनिक म्हणणाऱ्या गर्दीतल्या समाजाबरोबर....
      तर काही आजी-आजोबांच्या आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात गर्दी करताना दिसतेय हो ..!!
      पेपरात , दूरचित्रवाणी वर खूप कहाण्या वाचायला , बघायला मिळतात. नोकरीच्या ठिकाणी घेऊन जातो म्हणून आलेला लेक गावकडचं घरदार, शेत विकून, आई-बापाला स्टँड वर सोडुन गेलेल्या घटना जेव्हा घडतात तेव्हाही हाच प्रश्न पडतो , "हेच का लेका तुझे प्रेम...तुझ्या आई-बापावरचं ...!!"
हे दिवस बघण्यासाठीच का रे, त्यांनी तुझ्यासाठी पोटाला चिमटा घेऊन तुला तालुक्याच्या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या तारखेला एसटी ड्रायव्हरकडे कापडात गुंडाळून पैसे पाठवले ...?
अरे लेका त्यांना तुझ्याकडून काहीच नकोय रे, फक्त दोनवेळची भाकरी अन् दोन आपुलकीचे शब्द..!!
        पण समाजात खूप विदारक चित्र आहे , नातवाकडे जे संस्कारांचं संक्रमण होतं, त्यासाठी आजी-आजोबांसारखं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंच नाही.
       पण खेदजनक हे आहे की या आजी आजोबांची जागा मोबाईलने घेतलीय असं वाटतंय.....!!
     समाधानी आयुष्य जगण्यासाठी कशाचीच गरज लागत नाही...
जिद्दीला तरुण ठेवलं तर कायम समाधानी आयुष्य जगता येतं...!!
स्वाभिमानी माणसं अशीच असतात सदा सर्वदा तरुणाई फुललेली असते ....!!
    जी दिसतेय या जेष्ठांकडे, अनुभवाचं भांडार अन्  आयुष्यभर पुरून उरेल अशी संस्काराची शिदोरी असलेल्या आजी-आजोबांमध्ये....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, September 18, 2019

गाव अन् गावकडचं घर...!!

       कितीही दूर असलंतरीही गाव अन् गावकडचं घर यांचं आकर्षण कमी होत नाही ......!!
       गावातला दगडी बांधकाम असलेला वाडा, त्याच्याच पाठीमागे असलेली परसबाग अन् त्यात आजी-आजोबानीं; लेकरांप्रमाणे वाढवलेल्या वेगवेगळ्या फुलांची झाडं, काही सुगंधाने मोहून टाकणारी, तर काही सौंदर्याने खेचून नेणारी...!!!
आंब्या-फणसाबरोबरच नारळाची अन् औषधी गुणधर्म असलेल्या असंख्य वनस्पती ...!!
        किती छान असतं गावाकडचं जीवन, रात्रीच्या जेवणाला कोणताही डायनिंग हॉल फिका पडेल, अश्या सर्व भावंडे मिळून चंद्राच्या मंद प्रकाशात जेवणावळी बसायच्या; सुसंवाद अन् हास्यांची ललकारी उडून चंद्राला निरोप द्यायला निघून जायची ....!!!
      पण आत्ता काही राहिलं नाही,आत्ता राहिले फक्त आठवणींचे रिकामे सांगाडे......!! पण तीच आठवणींची पुंजी कामी येते; आत्ता कधी-कधी आनंदित करण्यासाठी ....!!
परसबागेतील बकुळीची फुलं जगण्याचं मूल्य सांगून जातं शेवटच्या क्षणांपर्यंत सौम्य सुगंधाची उधळत करत राहणं ...!!
हीच फुलं जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात आपण
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं.
      सुट्टीचे दिवस संपुन गावातुन शहरात परतलं की आपण नक्की कुठले गावातले का शहरातले ? हा छळणारा प्रश्न ??
गाव बदलत नाही , गाव धुळीतल्या रस्त्यांची साथ सोडत नाही, गाव पुढं सरकत नाही ,
       पण त्या गावाने पाहिलेलं असतं तुम्ही मोठे होत असताना, त्या गावाने पाहिलेलं असतं तुमच्यातलं लहान मूल, त्याच गावाने पाहिलेलं असतं तुमच्या अंगातील असंख्य खोडी, तुमच्यातील सुप्त गुण आणि दोष ...!!!!
       ते गावचं शिकवते तुम्हाला तुमचे संस्कार ...
पण , पण त्या गावातही असतात अशी घरं, माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं ....ज्या घराने भोगली असतात तुमच्या बरोबर सुखं आणि अश्रुंचे क्षणही ...त्या घरातील अंगणाने दिला  असतो तुम्हास अनेक खेळांमधून आनंद ...!!! आणि त्याच अंगणाने दिलं असतं तुम्हास खेळताना झालेली जखम ...!!!
पण हीच मोडकळीस आलेली घरं आणि तेच अंगण वाट पाहत असतं कोणाची तरी हे नक्की ...!!
      पण त्याच अंगणातील प्राजक्त आत्ता पूर्वी सारखा बहरत नाही.
       गाव वाढत चाललंय, गावातील घरांच्या  मातीचा वास आत्ता सिमेंटच्या वासाने हरवून जातोय...!!
आत्ता जुनं घर इथं शोधूनही सापडणार नाही  ...!!!
आत्ता फक्तआठवणींचे सांगाडे आहेत ,असतील....!!!
पोपडे आलेल्या घराला पोतेरे मारणाऱ्या आई आणि आजीचं थकलेलं शरीर , तसचं संध्याकाळी शेतातून घरी येणाऱ्या बापाचा थकलेला आराम शोधणारा देह , आजोबांच्या हरिपाठाची आणि तुकोबांच्या अभंगाच्या सुखवणाऱ्या लयी ...!!!
        दारातलं मोठं गुलमोहराच झाड, त्याच्या शेंगा, त्याला उन्हाळयात येणारी लालबुंद फुलं किंवा क्वचित नाजूक हिरवी पानं ...!! ही अशी वाढत जाणारी रांग थांबनार नाही तरीही थांबावच लागणार...!!
      पण गावातील घरासमोरील अंगणातील पारिजातकाच्या फुलं तुला नेहमीच भुलवत राहतील, खेळवत राहतील त्यांच्या सुगंधाचा जोरावर .....अन् वाट पाहतच कोमेजून जातील पण तेही सुगधं देऊनच ......!!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, August 4, 2019

प्रवासातलं जगणं...!!

     आयुष्यातला प्रवास सपंतच नाही हो ...!!
     जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास , जिंदगी ला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!!
     बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं,  कठीण जातं...!!
     नंतर थोडे मोठे झालो तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई अण्णांच्या (बाबांच्या) पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं तरी आई बाबांना खुशालीत आहे हे पटवून देण्यात आंनद वाटतो ...!!
    आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुण-छुण घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना,आण्णा-आईने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंमबुन वाहणारा आनंद आज ही हर्षभरीत करून जातो. पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही आधार व्हावा वाटतो , त्यांतच आनंद वाटतो...!!
     या प्रवासात वाट चालत असताना अडखळत , बोबडयाने टाकलेला पहिला शब्द ऐकताना घर अगदी आनंदाने नाहून निघालं असेल ....!! पण आज अडखळत बोललं तर आई बाबांना कळेल "कुछ तो हुवा है".....त्यामुळे मजेत बोललं जातं..
बालपणी चे दिवसचं भारी होते ते ....!!
     पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच खरं...!!
शिक्षणासाठी आई बाबांच्या कुशीतली ऊब सोडावी लागली , घर, घरासमोरील अंगण सोडावं लागलं, गावातली गल्ली अन् गाव सोडावं लागलं, मित्र मंडळी,जाता येता आजी-आजोबांच्या तब्बेतीची चौकशी केल्याने निर्माण झालेलं, एक जिव्हाळ्याचं नातं , हे सगळं-सगळं विसरून जड पावलाने अन् तितक्याच जड अंतःकरणाने,भरल्या डोळ्याने, एका नव्या प्रवासाला सुरवात झालेली आजही डोळ्यासमोर तरळते, आत्ता प्रत्येकवेळी घरी जाताना आई-अण्णांबरोबरच , अंगण अन् गावातली गल्ली आतुरतेने वाट पाहते ...!!
     शिक्षण झाल्यावर कामानिमित्त हॉस्टेल ही सुटलं जातं
याच हॉस्टेलने खूप गोष्टी शिकवल्या , खूप आठवणी दिल्या.
आयुष्याच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा या हॉस्टेलचा आहे
घरापासून दूर असल्यावर हेच हॉस्टेल आपलं घर मानायचं
अन् सुरवातीचे काही दिवस बळेच घालवायचे...!!
अन् तेच हॉस्टेल सोडताना, जेवढं घर सोडताना वाईट वाटलं  तेवढंच हॉस्टेल ची रूम सोडताना अन् शेवटच कुलूप लॉक करताना वाईट अन् डोळ्यात थेंब तरळून गेले..!!
पण त्या हॉस्टेल ने खूप आठवणी दिल्या....!!
     शिक्षणाच्या काळात युनिव्हर्सिटी मध्ये खूप चांगले मित्र मैत्रिणी  झाल्या. जीवनात कधी वाटलं ही नव्हतं एवढे जीवाला जीव देणारे मित्र होतील ....आज काही कारणास्तव त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी झाला असलातरी ते विसमूर्तित जाणं शक्य नाही...!
प्रवास काटत असताना काही गोष्टी सुटल्या जातात, सोडव्या लागतात...पण त्या कधी विसमूर्तित जात नसतात ...!!
    अश्या या प्रवासाचा हव्यास पांथस्त्याला सुटत नाही.
अनंत अडचणीतून मार्ग काढत, करावा प्रवास आनंदात
...! स्वतःबरोबर इतरांनाही करावी वाटप आनंदाची अन् याच प्रवासाचा महोत्सव करता यावा, महोत्सव व्हावा .....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, July 24, 2019

आभासी जगातला "प्रवास"

      जीवनातल्या प्रवासात कधी कोणाचा थांबा येईल सांगता येत नाही.त्या थांब्यापर्यंतच्या प्रवासात खूप सारे त्याच वाटेने जाणारे वाटसरू एकमेकांना भेटतात..!!
      काहींचा प्रवास आनंदात होतो, कधी कोणाचं थांब्याच ठिकाण आकस्मित येतं. त्यांचा प्रवास संपतो, पण त्या प्रवासात त्याच्या बरोबर मागे राहिलेला प्रवासी हतबल होतो ,त्या थोड्या प्रवासात खिडकीतून बाहेर डोकावून खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, काही अनुभवलेल्या अन् काहींविषयी स्वप्न पाहिलेली असतात.
पण अर्ध्याअधिक वाटेवर आपल्या सहप्रवाश्याने नाईलाजास्तव त्याच्या थांब्यावर उतरून घेतलेलं असतं. त्याचं उतरणं त्यालाही सोप्प नसतं, पण नियतीपुढे कोणालाच विजय मिळवता येत नाही, येणार नाही. या प्रवासात माणसं एकमेकांना भेटतात , पण त्या प्रवासाचा आनंद लुटण्याचं सौभाग्य सर्वांच्याच भाळी लिहिलेलं असतंच असं नाही .
      काहींच्या प्रवासातील रस्ता कापत असतांनाच स्वप्नांचे दोर ही तुटले जातात. तो थांबा कधी येणार हे पांथस्थ्याला ही माहीत नसतं त्यामुळे त्याचा कोणता शब्द, कोणतं वाक्य हे शेवटचं असेल हे सांगता येत नाही. जीवनाच्या या प्रवासात फिरून तो वाटसरू मिळेलच असं अजिबात नाही. म्हणून उगवलेला प्रत्येक दिवस हा प्रवासातील शेवटचा दिवस आहे असचं जगता आलं तर त्याने आयुष्यात सारं कमवल्यासारखं होतं.
     आपण स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली अहंकारच विष कधी जपून ठेवतो हे आपल्यालाही कळत नाही. कारण नसताना एकमेकांविषयी आकस ठेवतो. आपण या पृथ्वीवरील पाहुणे आहोत हेच विसरले जातो.अन् मग इथूनच चालू होते तीअहंकारी वृत्ती.
      स्वतःला या भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील एक छोटा क्षुद्र प्राणी आहोत हे मान्य केलं तर प्रवास नेटका जरी असला तरी आनंदाचा होईल.
      कोणता कॉल, कोणता sms , कोणता शब्द शेवटचा असेल हे माहीत नसतं कदाचित तो कॉल कधीच न येण्यासाठी असू शकतो किंवा परत तो कॉल रेसिव्ह ही होऊ शकत नाही. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असेल पण तो कधीच लागणार नाही.
     त्यामूळे मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगता यावा.
          भेटावं तेही शेवटची भेट असल्यासारखं
          बोलावं भरभरून शेवटच्या शब्दासारखं
      परत वेळ निघून गेल्यावर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अन् गोडवे गाण्यापेक्षा, आहेत तोपर्यंत ego, स्वाभिमान, अहंकार बाजूला ठेऊन बोलाच सर्वांशी अगदी भरभरून मन मोकळे पणानं...!!
      अहंकाराला बाजूला ठेऊन एकदा मारा हाक तुमच्याच जिवाभावाच्या माणसांना, वेळ निघून जाण्या अगोदर, दूर निघून जाण्याअगोदर.....!!!
      अन् हा जीवनाचा प्रवास आनंदात करण्यासाठी प्रयत्नवत असावं.....!! जीवनाच्या प्रवासात आनंद देत चालत राहावं दिगंतरापर्यंत...!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, June 12, 2019

पावसाच्या पहिल्या सरी ...!!!

         मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे, यावर्षी धरतीवरचे सर्वच जीव-जंतू , झाडे-वेली, पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते...!! अन् काही ओळी सुचल्या..!!
धरणी आसुसलेली तुझ्या मिलनासाठी
बरस रे नभा ....!!!
माझा बळीराजा चातकापेक्षा ही जास्त आस लावून बसलाय, वाट पाहतोय तुझी डोळ्यात तेल घालून..!!
कर ओलं चिंब अंग अन् अंगण , दरवळु दे सुगंध मातीचा...!!
बरस भरभरून, धरणीला दे घट्ट प्रेमभराने मिठी अन् कर तृप्त....!!
कर आनंदी बळीराजाला...!!
फुटूदे पालवी , होउदे हिरवाई चोहोबाजूंनी ....!!
बरस, बरस रे नभा
तुझ्याबरोबर बरसू दे मन ही होउदे प्रफुल्लीत ...!!

         अन् हीच प्रतीक्षा आज संपली अन् यावर्षीच्या पाऊसकाळातील पहिल्या पावसाच्या पहिल्या सरी आवेगाने त्याच्या प्रेयसीला धरणीला घट्ट मिठी मारून प्रेम भराने कोसळायला सुरवात झाली...!!
त्यामुळे आपसूकच काही शब्द फुटले...

पावसाच्या पहिल्या सरी,बेधुंद करणाऱ्या,
अंगावर शहारे आणणाऱ्या...!!
पावसाच्या पहिल्या सरी,मरगळलेल्या मनाला प्रफुल्लीत करणाऱ्या,
सगळं संपलेल्याला,सुकलेल्याला नवचेतना देणाऱ्या...
पावसाच्या पहिल्या सरी,मातीत मिसळलेल्याला नवनिर्मितीचा कोंब फोडणाऱ्या,
बीजाच रूपांतर इवल्याश्या रोपट्यात करणाऱ्या...!!
पावसाच्या पहिल्या सरी, अंगावर शिरशिरी आणणाऱ्या,
सर्वांगाबरोबरच मनालाही ओलाचिंब करून जाणाऱ्या..!!!
पावसाच्या पहिल्या सरी,धरणीला हिरवा शालू घालणाऱ्या...!!
अन् त्याच पावसाच्या पहिल्या सरी,
जुन्या-नव्यांच्या आठवणीत चिंब करणाऱ्या...!!!

       अन् तो कोसळणारा पाऊस खिडकीतून बघताना, मनातही आठवणींनीचा पाऊस धो-धो कोसळू लागला..
पडणाऱ्या सरींबरोबर आठवले चिंब करणारे कॉलेजातले ते दिवस..!!
सर्व गोष्टी बदलल्या कॉलेजचे दिवसही बदलले, कॉलेज ही पूर्ण बदलले, काळाबरोबर  "तो" ही बदलला.
पण "ती"...?
"ती" आणखी तशीच टवटवीत, अगदी तेव्हा जशी तरुण होती तशीच आज ही तरुण, आभूषणांनी नटलेली ...!!
"त्याने" खूप पावसाळे पाहिले, पण प्रत्येकवेळी "ती" ही तशीच चिरतरुण उभी राहायची, प्रत्येक पहिल्या पावसात अगदी तरुण...!!
तिला काळाचे बंधनच नाही त्यामुळे वयाचं ही बंधन नाही...!!तिला विसरण्याची, बद्दलवण्याची मिसाज कोणातच नाही.
ती म्हणजे "आठवण"....

      पाऊस अंगणात कोसळत होता, पण आता भिजायला जाण्यापेक्षा लांब उभा राहून खिडकीतून पाऊस पाहण्यातच आंनद वाटत होता..!!
      त्या पहिल्या सरी पाहताना सर्व आठवणींचा चित्रपट त्या सरींबरोबर डोळ्यासमोर कोसळत होता, चिंब-चिंब करत होता.
      त्या पहिल्या पावसाच्या पहिल्या सरींनी आठवणींना उजाळा दिला होता...!!
      भिजायला जरी अंगणात गेलो नाही, तरी खिडकीत उभा राहून मन मात्र ओल चिंब झालं होतं....!!
       त्यावेळी आईचं रागावणं पत्करून धावत जाऊन भिजायला जायची मज्जा, आज मात्र पाऊस खिडकीतून बघण्यात समाधान मानत होतो. आज आई रागवणारही नव्हती पण तरीही पहिल्या सारखं पहिल्या पावसात भिजण्याची इच्छा राहिली नव्हती..!
       खिडकीत उभा राहून ती संध्याकाळ जुन्या आठवणीत चिंब भिजवून जात होती पावसात न जाताही....!!!
असा होता यावर्षीचा पहिला पाऊस....मनात दाटलेल्या ढगांतुन बरसणाऱ्या सरींनी ओलं चिंब करणारा ...!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Monday, June 10, 2019

गावाकडची सांजवेळ...!!!

        गावाकडची सांजवेळ ही बेभान करणारी असते..!!
परदेशी जाणारा सुर्य रंगांची उधळण करत जातो,
ती उधळण त्याच्यासाठी महोत्सव असतो.

      पण त्या  रंगांच्या छटांची उधळण मनात एक अनामिक कालवाकालव करत असते..!!
कितीही समजवलं स्वतःला तरी तो महोत्सव एक हुरहूर लावून जातो...!
      यावेळी उगाच कोणाची तरी आठवण येणं,माहीतही नसतं कोणाची आठवण येतेय.पण उगाच एखादी जुनीपुराणी गोष्ट, चित्रपट उभा राहावा तशी इथंभूत डोळ्यासमोर उभी राहते...!
विनाकारण डोळ्यांच्या कडा ओलावतात, अनामिक कसल्यातरी ओढी ने कासावीस होतं..!
      ही अनामिक हुरहूर कमी होते ती सांजवेळ संपल्यावरच..!
गंमत म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेवर जाऊन बसून तो उत्सव निर्विकार होऊन पाहत बसलं तर आपोआप ती हुरहूर कमी होऊन, शांत वाटतं..!!
     पण ही सांजवेळ अनुभवयास मिळते ती गावाकडेच...!
शहराच्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्याला हा महोत्सव, ही निसर्गाची अगाधलीला पाहवयास, अनुभवयास अन् त्याचा आनंद लुटावयास नाही मिळतं. पण हा दैवी सोहळा बघण्याची मज्जा काही औरच...!!
      गावांकडे दिसणारा सांजवेळीचा सूर्याचा लाल गोळा जसा जसा क्षितिजाआड जायला लागतो तसा तसा मनात कल्लोळ उठतो..!
      त्याचं क्षणा-क्षणाला क्षितिजापल्याड जाणं मनांत दुखरी नस रुततेय असं क्षणभर वाटतं...!!
     सगळं आभाळ तांबड्या रंगांनी भरून गेलंय आणि छोटी प्रकाशाची लाल छटाही आवरून निघायच्या तयारीला लागली आहे.
     ती छटा नजरे आड होते न होते तोच वाऱ्याची एक मंजुळ थंडगार झुळूक मनाला खिलवून अन् अंगावर शहारे आणते..!!
ती बोचरी हवहवीशी झुळूक काहीतरी संदेश घेऊन आलीय असा भास होतो.... कदाचित, "सूर्य गेला......" हाच संदेश असावा तो...!!
    महोत्सवातुन जागं करण्यासाठीच आली असावी ती झुळूक ,झुळूक नाहीच ती, ती तर कुजबूज,केलेलं हितगुज...!!
      या सांजवेळी सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला....!!
     सूर्यास्ताचा अटळ महोत्सव मनात उलथापालथ करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....
      आयुष्यात अशी सांजवेळ, कातरवेळ अनुभवावी एकदातरी..!!
पहावा महोत्सव नयनभरल्या डोळ्यांनी , प्रसन्न मनाने...!!

#जिंगदी_का_फ़ंडा🍃

Friday, May 31, 2019

आयुष्याच्या संध्याकाळी...!!!

    आज काल नवा ट्रेंड सुरू आहे,लिव्ह इन रिलशनशीपचा ( मी विरोधातही नाही आणि समर्थनातही नाही ) आणि त्याचं समर्थन केले जातं की लग्नाच्या अगोदर एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं, एकमेकांच्या आवडी-निवडी समजणं अन् आपल्या जोडीदाराला समजून घेतल्यावर लग्नानंतरचे problems होत नाहीत हे समर्थन दिलं जातं.
       पण मित्रांनो तुम्ही तुमच्या आज्जी आजोबांकडे पाहिलं आहे का हो ?
       आज जवळजवळ त्यांच्या लग्नाला सरासरी पन्नास साठ वर्षे नक्कीच उलटून गेले असतील.
तरीही त्यांचं एकमेकांवरचं प्रेम , एकमेकांची काळजी पुसटशीही कमी झालेली दिसत नाही,जाणवत नाही.
   अहो, समजून घ्यायचं सोडाच,पण त्यांनी लग्नाच्या अगोदर एकमेकांना पाहिलेलंही नसतं हो ..!!
सरळ बोहल्यावर चढल्यावर कळतं की हा माझा जीवनसाथी...!
     आणि लग्नाला पन्नास साठ वर्षे झाली तरीही अतूट नात्यातलं प्रेम अबाधित राहतं....!!!
पण आजकालचं प्रेम ...खूप अल्पायुषी झालंय हो, हीच शोकांतिका...!!
      प्रेम ही संकल्पनाच बदललीय की काय असं वाटायला लागलंय... आजकालची नाती  सरासरी एक नाहीतर दोन वर्षे टिकतात  मग नंतर तेच नातं बोअर वाटायला लागतं....!!
किती मज्जा आहे बघा ना , एक दोन वर्षांपूर्वी  एकमेकांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आवडायच्या, ज्यावर तासन् तास  गप्पा व्हायच्या,एकमेकांच्या अडचणी दोघांनी सोडवल्या जायच्या, संवाद व्हायचा, त्याच गोष्टी एक दोन वर्षांनंतर नातं तुटायचं कारण बनतात. मग याला खरंच प्रेम म्हणायचं का हो ?
    म्हणजे तुम्हाला फक्त एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे , प्रेम करायचं नाहीय....
 तुम्हाला आधार हवा आहे म्हणून partner पाहिजे असतो असं वाटत असेल तर थांबा..!
 एकमेकांना एकमेकांची गरज आहे म्हणुन एकत्र राहायचंय अन् याला जर तुम्ही प्रेम म्हणत असाल तर नक्कीच थोडं थांबा ...!!!
आणि दुसऱ्या बाजूला आजी आजोबांकडे पहा, नवल वाटेल...
    त्यांचं प्रेम आज पन्नास साठ वर्षांनंतरही तरुण असतं, त्या प्रेमातली काळजी कधीच कमी होत नाही. आयुष्यात असंख्य अडचणींना , दुःखांना दोघेही सामोरे जातात. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार आल्यावर एकमेकांना दिलेला हात, दिलेला आधार खूप समजावून जातो.
   खांद्याला खांदा लावून त्या अडचणींवर मात करतात, दुःखं पचवली जातात. प्रत्येक अडचणी वर उत्तरं शोधली जातात...
त्यांच्या आयुष्यातला चांगल्या वाईट वळणावरती मिळालेली एकमेकांची साथ वाखाणण्याजोगी असते.
     जर आजोबा गावात गेले असतील अन् दिवसातला तिसरा प्रहरही संपला असेल पण जर आजोबा गावातून आले नसतील तर आजी तोपर्यंत जेवणाच्या ताटाला शिवतही नाही. जेव्हा आजोबा येतील तेव्हाच जेवण करेल हा तिचा पण असतो ...!!
कुठून येतं हे प्रेम , कुठून येते एवढं प्रेम करण्याची शक्ती...?
     एकमेकांवर रागावतील, चिडतील, शिव्या घालतील पण  जेवणाच्या वेळेस एकमेकांना जेवायला विचारल्याशिवाय घास तोंडात सरकवणार नाहीत....
     यांना याचं प्रेम कधीच बोअर वाटत नाही, अन् यांनीच तर थेट लग्नात एकमेकांना पाहिलेलं असतं , मग कोणतं प्रेम खरं समजायचं ...?
     प्रेम निःस्वार्थपणात अन् निरागसतेत असतं, प्रेम हे ठरवून होत नसतं. जगात प्रेम गोष्टचं न्यारी आहे, त्यात निरागसता ही भरभरून असते ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Tuesday, May 21, 2019

"यारी"तली दुनिया...!!

आज काही कामानिमित्त बस स्टँड वर जाणं झालं.
जसं-जसं स्टँड मध्ये जात होतो; तसं-तसं कॉलेजच्या दिवसांचा एक चित्रपट समोर दिसू लागला..!!
नुकतंच दहावीच्या वर्गातून, दहावीच्या बंधनातून, म्हणजे शाळेतून कॉलेजात पाऊल ठेवलेलं....!!
कॉलेज जीवनाबाबत खूप ऐकलेलं , पाहिलेलं, अन् वाचलेलं होतं
अन् ते दिवस आत्ता अनुभवन्यास मिळणार होते.
त्यामुळे कॉलेज जीवनाबाबत खुप कुतूहल होतं.
   दहावीची शाळा गावात होती अन् आत्ता कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं ती उत्सुकता वेगळीच...!
    1-2 किलोमीटर चालत जाऊन लाल डब्बा पकडायचा, तो नेहमीप्रमाणे कधीच वेळेवर यायचा नाही आणि त्या डब्ब्यात गर्दी खूप असली तरी ही त्यात मज्जा यायची..!!
एखाद्या दिवशी बस रिकामी असली की उदास वाटायचं.
गर्दीतल्या धक्यांची सवय झालेली....!!
कॉलेजमध्ये मग वर्गात बसायचं, काही चाळे केले तर वर्गाच्या बाहेर ही जावं लागायचं!!
    नवीन मित्र भेटले, भांडण झाली, प्रॅक्टिकला सरांचा मारही खाल्ला...!!
तास बुडवून स्टँडवर कोणाची तरी वाट पाहत बसणं...भारीच!!
    मित्राच्या "ति"च्या साठी तासनतास कॉलेजच्या कोपऱ्यावर थांबून ती आली की इशारत करणं..!!
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी बस मध्ये चमकलेली "ती" अन्
"ती" येणार म्हणून स्टँड वर तिच्या अगोदर एक तास जाऊन बसणं....!
बस मध्ये 'ती" असल्यावर तेव्हा उगाच समाजसेवेचा आव आणत एखाद्या आजी-आजोबांचा शोध घेत त्यांना आपल्या सीट वर जागा देऊन, बस मध्ये खुप मोठं काम केल्यासारखं कॉलर टाईट करणं...!!
असं करत कॉलेज कधी संपलं कळलंच नाही, यात रिझल्टची पूर्ण वाट लागली होती....!
   पण या कॉलेज जीवनाने खूप शिकवलं, आयुष्याविषयी खूप धडे दिले, कसं जगावं, कसं असायला पाहिजे,आपण कसे आहोत याची ओळख झाली, चमकलेली "ती" ही इथंच दिसली, अन् as usual कायम "ती" ही पराई च राहिली.... ठेवली..!!
खूप भारी दोस्त मिळाले...! जीवाला जीव देणारे यार मिळाले.
कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले तेव्हा कोणीच नव्हते ते..!!
पण नंतर जीवनामध्ये वादळासारखे घुसले..
 पुन्हा आयुष्य कधी जुन्या वळणावर आलं नाही..!!
चहाच्या टपरीवरच्या गप्पा....!!! आज ती टपरी आहे, पण कमीने दोस्त नाहीत...!!
 कॉलेज ते स्टॅन्ड पर्यंत केलेला दंगा, घालवलेला वेळ, केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी....!!
     जगाचा विसर पडून केलेले कांड....! आजही आठवलं तर एक छोटंसं हसू आणतात....!!
किती वेडे होतो आपण यात अभिमान वाटतो...!!! एकमेकांसाठी सोडलेल्या बस...!!
आज सर्व आठवत गेलं.
यात graduation, postgraduation अन् नंतरच्या एका वर्षातील कमीने यारही आठवत गेले.
   या दोस्तांनी खूप छळलं, चिडवलं, खुप पिडलं,पकवलं, गडवलं त्यांच्याकडे पाहिलं, तर वाटायचं यार मला दुष्मनांची गरजच नाही.
त्यांना एक सल्ला विचारला तर पन्नास सल्ले द्यायचे..!
 ज्या प्रश्नांवर स्वतः गंडलेले असतात, confused असतात, त्याचं उत्तरं आपल्याला मात्र confidently द्यायचे,
म्हणायचे, 'कर तू बिंधास्त, तू करू शकतो हे', स्वतः पेक्षा आपल्यावर जास्त भरोसा करणारे...!!
त्यांच्यावर भरोसा ठेवून आपणही मग बिनधास्त करायचो, ते म्हणतील तसं! उगाच हरभऱ्याच्या झाडावर बसवलं जायचं पण त्यामुळे तर डेअरिंग केली, नाहीतर आपण कधीच केलं नसतं...!!!
त्यांचा असणारा विश्वास आपल्याला आत्मविश्वास देऊन जायचा...!!स्वत:च्या खिसा रिकामा असताना,
ते उधारी करून आपली गरज भागवायचे...!!
     कॉलेजच्या शेवटच्या दिवशी हे सगळे कमीने उदास होते, पण हळवं कोणी झालं नाही. सगळ्यांनी भेटत रहायचं हे एकमेकांना शिव्या देऊन सांगितलं...!!
पण जो तो आपापल्या आयुष्यामध्ये busy झाले...! काहींबाबत गैरसमज होऊन दुरावले गेले , काही गोष्टी न पटल्यामुळे स्वतः दूर झालो,पण त्यामुळे कधी त्यांच्याबाबत तिरस्कार वाटला नाही. आज त्यांनाही तेवढाच आदर आहे, राहील...!
   काहींची विकेट पडली, काही कामानिमित्त बाहेर पडले,
काही जॉब मधून बॉस सुट्टी देत नाही म्हणत बॉसला शिव्या देतात तेव्हा आपणच समजुन घ्यावं..!
आपण तरी कुठं वेळ काढुन भेटतो ?
   आत्ता महिन्यातून एखादा कॉल होतो , 4-5 महिन्याने भेट होते, यातच समाधान मानणं अगत्याचं..!
हे सगळं-सगळं वारुळातुन बाहेर पडणाऱ्या मूग्यांप्रमाणे हळूहळू सर्व आठवत गेलं..!!!
पण आत्ता वेळ ही खूप झाला होता,त्यामुळे आत्ता हे सगळं तिथंच सोडून निघणं गरजेचं होतं.
जस पाऊलं स्टँड च्या बाहेर च्या दिशेने जात होते तसे आठवणीतून बाहेर पडत होतो .....!!
पण एक नक्की "ओ दिन कभी नहीं भुलेंगे ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, May 15, 2019

बकुळीची फुलं ....!!!

"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!!
     फुलांनी बहरलेल्या बागेतलं गर्द हिरवी पानं असलेलं झाड सुध्दा लक्ष वेधून घेतं, सुंदर दिसतं.
 दुसऱ्या फुलझाडांपेक्षा उठून दिसतं फक्त गर्द हिरवी पानं असतानाही ...!!   
पण, ते सूंदर दिसण्यासाठी एका स्वतंत्र दृष्टीने पाहायला हवं. 
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं. 
फुलांकडे पहा; काही फुलं दिसण्याने आकर्षित करतात, तर काही फुलांचा सुगंध आकर्षित करतो..!
पण मग आपण ही अपेक्षा कशी करू शकतो? 
सूंदर दिसणाऱ्या फुलाने सुगंधही द्यावा किंवा सुगधं देणाऱ्या फुलाने सूंदर सुद्धा दिसावं.
आपण त्याला त्याच्या angle ने पहावं लागेल, तर ते खूप सूंदर वाटेल, मन प्रसन्न करेल. 
 आभाळाला भिडायला गेलेला एखादा गर्द झाडांचा डोंगर किंवा वेगळ्या आकाराचा उजाड डोंगर सुद्धा त्याच्या नजरेनं पाहिलं तर सूंदर दिसतो..!!
क्षितिजाला टेकलेलं आभाळ, ते आभाळ वेगवेगळ्या आकाराच्या कलाकृती धारण करत असल्याचा भास होणं अन् त्या कलाकृती, मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने शांतपणे तासन् तास निहाळत राहणं, मनात नवचेतना निर्माण करतं.
ते क्षितिजापल्याडचं आभाळ सकाळी अन् संध्याकाळी सोनेरी रंग धारण करतं तेव्हा तो सोनेरी क्षण कधीही सरू नये असंच वाटतं...!!
हे पाहिल्यावर- अनुभवल्यावर चेहऱ्यावर नाजूक हसू फुटते अन् हा क्षण कोणत्याही आनंदाच्या क्षणांपेक्षा अतिउच्च असतो..!!
निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या जगण्याशी-आयुष्याशी साधर्म्य दाखवते. एक जगण्याचं तत्वज्ञान सांगते.
फुलं देण्यामागचं प्रयोजन काय असू शकतं? त्यात एक सुप्त संदेश असतो की, या फुलांप्रमाणे बहरत रहा, 
            फुलत रहा, परोपकारी असा, 
समोरच्याला आनंदाच्या खाऊची वाटप करा.    
              सदाबहार असा...!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

सर्द भिजलेला....!!!

ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...