Friday, July 31, 2020

बघ काही आठवतंय का...??

खिडकीत उभा राहून पाऊस पहा,
बघ काही आठवतंय का..?
श्रावणात पडणाऱ्या बेधुंद सरी,
बघ मनाला ओलाचिंब करतायत का..?
अलगद ओंजळीत साचलेलं पाणी पहा,
बघ कशाची ओळख देतंय का..??
दुरून चालत येणारी गुलाबी छत्री पहा,
बघ काही आठवतंय का..?
सरी थोड्या मंदावल्यावर बाहेर ये,
साचलेलं पाणी थोडं उडवुन पहा,
बघ काही आठवतंय का..?
कोपऱ्यावरच्या टपरीवरचा वाफाळता चहा पिऊन पहा,
बघ काही आठवतंय का..?
त्या चहाच्या नशेबरोबर चढलेल्या गप्पांची रंगत ऐक,
बघ काही आठवतंय का..?
झाडांवरून घरंगळत मातीत मिसळनाऱ्या श्रावण सरी पहा,
बघ काही आठवतंय का??
बघ काही आठवतंय का??

#सहजच_श्रावणसरी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Monday, June 22, 2020

तो, ती अन् कातरवेळ...!!!

      सांजवेळ,सर्व जण परतीच्या वाटेवर आहेत, पाखरांचा थवाही निघालाय घरट्याच्या दिशेने...!! त्यांची दोन दिवसांपूर्वीच उपजलेली पिल्लं घरट्याच्या दाराशी येऊन चिवचिव करतायत, वाट पाहत आहेत काही खाऊ घेऊन येणाऱ्या आई बाबांची...!!! ते ही लगबगीने घरट्याकडे थव्याने गुंजण करत चाललेत.
     सूर्याच्या क्षितिजाकडे रुतल्याने पूर्ण आभाळ तांबूस रंगात अगदी नाहून निघालं आहे त्यात हे थव्याचं विहंगम दृश्य खेचुन घेतंय... आकर्षित करतंय,रोखायचा प्रयत्न ही करू देत नाही...!!
दुरून गाणकोकिळा कुहुकुहू करतेय,
आत्ताच पाऊस थांबल्याने निसर्गाने अगदी नव्या नवरीसारखा साज चढवला आहे.रानातून थकून आलेला आई बाबांचा देह घराच्या अंगणात स्थिरावला आहे...!
     रानात गेलेली जनावरे आता गोठ्यात येऊन थबकली आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटेच्या लयबद्ध सौम्य घंटानादात  त्यांच्या पाडसाना जवळ घेत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
     एवढा शांत-स्तब्ध निसर्ग भासत असताना,
     'तो' मात्र त्या क्षितिजाकडे इंचा-इंचाने रुतत जाणाऱ्या सूर्याकडे टक लावून शांत बसलाय, कश्याततरी अगदी हरखून गेलाय.. यात विशेष असं काही नव्हतं,तो त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन दररोज त्या सूर्याचं कातरवेळेचं सौंदर्य टक लावून पाहणं त्याचा छंदच आहे, होता.....!!
     त्याला त्या परतीचा प्रवास करणाऱ्या सूर्याचा हेवा वाटत असावा... कदाचित...!! अस्तित्वाला राम-राम ठोकत असतानाही त्याच्या रंगांच्या उधळणीवर-महोत्सवावर जळत असावा, कदाचित....!! त्याच्या औदार्याचा हेवा करत बसत असेल, त्याचही असंच काही स्वप्न असेल आयुष्याच्या संध्याकाळचं, परतीच्या प्रवासाचं महोत्सव करत रंगाची उधळण करत जिंदगीला राम राम ठोकण्याचं...!!
     पण त्याचं अन् तिचं-कातरवेळेचंं काहीतरी असं अतूट ऋणानुबंध असावेत, कोणतंतरी अनामिक नातं त्याला दररोज त्याचवेळी- सूर्य डुबण्याच्या वेळी, अनामिक ओढीने खेचून नेतं.
     'तो'ही हातातील सर्व कामे टाकून धावत जातो,अगदी खूप दिवसातून भेटणाऱ्या प्रेयसीला भेटताना जी डोळ्यात चमक असते, जी ओढ असते ना अगदी तीच ओढ, तिच चमक तोच उत्साह....!!!
पण आज काहीतरी वेगळा भासत होता 'तो'...!! क्षितिजाकडे रुतणाऱ्या सूर्याकडं पाहत तर होता,पण मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं त्याच्या...!! चेहऱ्यावर कोणाच्यातरी आठवणीत व्याकुळ झालेले भाव स्पष्ट दिसत होते ...!!!कोण असावं बरं...?? असो पण या कातरवेळी कोणाबरोबरतरी घालवल्या असल्याच्या शंकेला डोळ्यातील चमक दुजोरा देत होती...!!
     ते जगलेले क्षण आज आठवणी बनुवन डोळ्यात चमकत होत्या....!! कातरवेळेच्या सूर्याचं क्षितीजात रुतण्याचा अन् सूर्याने जातेवेळी केलेला महोत्सव कदाचित त्यांच्या अनामिक नात्याचा साक्षीदार असावा....!!! तो एकमेव साक्षीदार असेल त्यांच्या अनामिक नात्याचा, ज्याने जवळून पाहिलं असेल त्यांना एकमेकांसाठी, भेटण्यासाठी बोलावं लागणारं खोटं...!! मित्र-मैत्रिणींची आप्तेष्टांची नजर चुकवून कधी-कधी खोटं बोलून भेटण्यासाठी,सूर्याचा महोत्सव पाहण्यासाठी केलेली धडपड...!!त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन  काही न बोलताही सर्व काही बोलल्यासारखं हलकं वाटण्यासाठी...!!!
धावत जाऊन दररोज भेटलं तरी खूप वर्षांनी भेटल्यासारखं उत्साहाने गळाभेट घेण्यासाठी धावत-पळत याचं सांजवेळी भेटले असतील ते तिघे....!!
'तो', 'ती' अन् 'ती'-कातरवेळ
     हे सर्व-सर्व एखाद्या पुस्तकातील ओळी वाचाव्यात तश्या त्याच्या चेहऱ्यावर आज स्पष्ट वाचता येत होत्या...!! बरेच दिवस झाले होते त्यांना विभक्त होऊन..!!
     पण 'त्या'ने ती कातरवेळ दुसऱ्या कोणाबरोबर न घालवता आता एकट्याने घालवत होता...!! कदाचीत 'ती' ही घालवत असेल बसत असेल क्षितिजाकडे डोळे लावून...!!
'तो' ही आज जाब विचारत असेल त्या कातरवेळेला, त्या अनामिक नात्याच्या साक्षीदाराला...!!एवढं सुदरतेने- महोत्सवाने नटलेल्या क्षितीजाला........!!!
या महोत्सवासारखा असावा आपला ही परतीचा प्रवास
निरोपाच्या क्षणींही हसत-खेळत महोत्सव करत, रंगांची उधळण करत व्हावा प्रवास दिगंतरापर्यंतचा......!!!

#जिंदगी _का_फ़ंडा🍃

Wednesday, June 10, 2020

स्त्री तुझं नक्की गाव कोणतं....??


     लहानपणापासून वयाच्या 23-24 वर्षापर्यंत आई-बाबांबरोबर असणारी त्याच गावाला आपलं गाव म्हणलेलं असतं.ज्या गावात-गल्लीत, घरात, घरातच्या अंगणात असंख्य आठवणी असतात.

     भावंडांबरोबर सुख-दुःख पचवलेले असतात. चुकलं तर आई-बाबांनी दिलेल्या मारामध्ये, खाऊमध्ये अगदी समसमान वाटप झालेली असते नव्हे केलेली असते.

पण, पण वयाच्या 23-24 वर्षांनंतर असं काय होतं की तिला हे अंगण परक्या सारखं वाटतं...??
      कारण, आता वयाच्या 24 वर्षापर्यंत जे आपलं घर आपलं अंगण असं वाटत होतं ते आता माहेर होणार असतं...!! म्हणजे 23-24 वर्षाच्या आठवणी, गावाशी, घराशी, घराच्या अंगणाशी जुळलेलं भावनिक नातं हे परकं होणार होतं...!
किती हा मोठा त्याग....!!
     जे आजपर्यंत मनावर ठासून बिंबवलं असतं की हेच माझं घर आहे. भावंडांशी बरोबरच्या वाट्यासाठी भांडणं केली असतात.
आई शेजारी झोपण्यापासून ते बाजारातून आणलेल्या खाऊमध्ये भांडून मिळवलेला वाटा हे सगळं काय होतं?
आभासी होतं का...??

     आई-बाबांच्या ताटात केलेलं जेवण, कधी-कधी कौतुकाने म्हणा किंवा हट्टाने बाबांनी भरवलेला घास सर्व-सर्व परकं होणारं असतं.
आजपासून मागचं सर्व सोडून कोनाचतरी घर आपलं म्हणायचंय, त्यालाच आयुष्य म्हणायचंय. तिथली माणसंच आपली म्हणायची आहेत,ज्यांना जन्मापासून 24 वर्षापर्यंत साधं पाहिलेलंही नसतं.
त्यांनाच आज अचानक काही क्षणात आपलं म्हणायचंय.
त्यांच्या आवडी-निवडी बघायच्यात.
रुसवे-फुगवे काढायचे आहेत.
नवरा म्हणणाऱ्या प्राण्याला खुश ठेवायचंय.
कस, कस शक्य आहे...??
     आई-बाबांकडून आलेल्या सवयी इथं चालतीलच असं नाही.
म्हणजे आतापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी-सवयी सोडायच्या असतात, भले चांगल्या असो वा वाईट...!!!
म्हणजे 'ती' म्हणून असं काही उरतच नाही.
       जे करायचं ते फक्त या 24 वर्षानंतर भेटलेल्या आपल्या माणसांसाठी....!!गजब है यार...!!
     त्या घराला, त्या अंगणाला, आपलं मानायचं नव्हे-नव्हे  म्हणायचंय...!!
इथली माणसंच,आपली म्हणायचं दिगंतरापर्यंत....!!
अन् एवढं सगळं त्यागून, चुकून काही झालं तर ही माणसं, तो त्याग, तिचं मन पाहत नाहीत...!!
     अन् जेव्हा कधी 'ती' कंटाळवून माहेरी येते.तेव्हा माहेर ही खूप बदलेल असतं.
'ति'चं असणारं अंगण, तिचं असणारं घर, तिचं गाव, तिला  तिचेच भावंडं, तिचेच आई-बाबा पाहुणी म्हणून पाहत असतील तेव्हा काय म्हणत असेल तिचं मन....समुद्राच्या पोटात असणाऱ्या त्सुनामी सारखं हेलकावे खात असेल तरीही पृष्ठभागावर साधे तरंगही न दाखवता शांत होत असेल.
किती वाईट वाटतं असेल ना...??
ज्या भावंडांशी समान वाट्यासाठी भांडणं केलेली असतात, त्यांच्यापुढे ती आज चार दिवसांची पाहुणी असते.
किती ती insecure होत असेल याचा विचार केलाय कधी...??
म्हणजे मग नक्की 'स्त्री'चं गाव कोणतं...??
कोणत्या गावची 'ती'...??
     माहेर तिला पाहुणी म्हणून पाहतेय,अन् सासर तर तिच्याकडे त्यागमूर्ती म्हणूनच पाहतंय.
आई-बाबांच्या ऐकण्यातली लेक
नवऱ्याची आज्ञाधारक बायको बनते,
सर्व ऐकणारी सून बनते,
नन्तर हट्ट पुरवणारी टिफिन पुरवणारी आई बनते,
अन् शेवटी घराचं ओझं बनणारी म्हतारी सासू
पण मग नक्की 'ती' काय हवंय काय व्हायचंय याचा कधी विचार होत नाही.

वपूनी लिहून ठेवलंय, पचायला जड आहे पण कटुसत्य आहे::--

(टीप:-सगळेच पुरुष-नवरे नाही पण हे लागू होतं बहुतांश वेळा....!! पुरुषांनाही भावना असतात मध्य साधायचा असतो)

"या नवऱ्यानां मोलकरीण, स्वयंपाकिण, शय्यासोबतीण, मैत्रीण, पत्नी आणि पोरांची जबाबदारी  उचलणारी एक परिचारिका हवी असते. त्याशिवाय ती मिळवती हवी पण तिला लौकिक नको. एका बायकोत स्त्रीत त्यांना इतकं हवं असतं...!!"

 किती शोकांतिका ही....!!

     आजपर्यंत तिच्या वाट्याला काय आलं....!!

रामायणात सीता होऊन वनवास,
कुंती होऊन त्याग....!!
महाभारतात द्रौपदी होऊन वीरांच्या भरसभेत वस्त्रहरण...!!
ज्यां स्त्रीने,
जिजाऊ होऊन...आदर्श छत्रपती शिवराय घडवले
मणिकर्णिका होऊन...झाशीसाठी लढली
सावित्री होऊन...स्त्री शिक्षणासाठी जीव वेचला
तरी आजही ती छळली जातेय 
ती परकीच वाटेत ती एवढी आदिमाया शक्ती त्यागमूर्ती असतानाही दुय्यम लेखली जाते.
मग त्या त्यागमूर्तीचं नक्की गाव कोणतं...?
तिच्यावर ऍसिड हल्ले होतात,
विकृतींकडून शिकार होते,
नक्की तिची चूक काय..??
एक स्त्री जन्म हीच चूक म्हणावी का..??
कारण तिचं असं कायमस्वरूपीचं मुक्कामाचं ठिकाण कोणतं...??
'ती' त्यागच करत येते, स्पंदनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Saturday, May 23, 2020

आम्ही गावाकडचे की शहराचे...??


     भौतिकशास्रामध्ये पदवी पूर्ण केली, पदव्युत्तर शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला , त्यात उत्सुकतेची बाब म्हणजे नावाजलेल्या भौतिकशास्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेता येणार यामुळे प्रचंड खुश...!!
     त्याचबरोबर उदासीनतेनेही पाठ सोडली नाही, पहिल्यांदाच घर सोडावं लागणार , आई-आण्णांपासून दूर जावं लागणार...!!
नवीन मित्र-मैत्रिणी , हॉस्टेलला जमेल का...?? वैगरे, वैगरे असंख्य प्रश्नांनी डोक्यात विचारांचं काहूर माजवलं होतं.
     पण उत्साह होताच काहीतरी नवीन शिकायला मिळणार, जयकरसारखं लाखोंचं पुस्तक भांडार वापरायला मिळणार......!!
आजपर्यंत रिझल्टवरच दिसलेली युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग अनुभवास मिळणार वैगरे वैगरे....!!
      तालुक्याचं गाव सोडून दुसऱ्या मोठ्या शहरात जाण्याचा/राहण्याचा कधी सबंध आला नव्हता, नव्हे नव्हे योगच नव्हता..!!
     आता पहिल्यांदाच पुण्यात जावं लागणार होतं, मनाच्या एका कोपऱ्यात कुतुहुल ही होतं तर दुसऱ्या कोपऱ्यात असुरक्षितता....!!
     कुतुहुल का...?? तर विद्येचं माहेर घर म्हणलं जाणाऱ्या शहरात M.Sc करायला मिळणार होती अन् त्यात भरीसभर युनिव्हर्सिटीमध्ये..., आणि  असणारं पुण्याचं आकर्षण वेगळंच...!!!
     तर हे शहर आपल्याला स्वीकारेल का..?? याबाबत असुरक्षितता, आपण काहीतरी विभिन्न आहोत काय की ...?? हा न्यूनगंड....
     अशी एकंदरीत अवस्था असतानाही आई-आण्णांपासून कधीही दूर न जाणारा मी , जेव्हा पुण्याला निघालो तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू होते अन् तीच गत माझीही होती...!! 
     अश्रू नयनांनी लाल डब्याने धावपळीचा प्रवास सुरु झाला , ओळखीची माणसं, ओळखीची धुळीची वाट, गावातली ती गल्ली अन् वळणावरील गप्पांचा कट्टा हा सर्व ओळखीचा प्रदेश झटपट मागे टाकत एसटी भरभर शहर जवळ करत होती...!!
     मायानगरी भल्यापहाटे चालू होणारी अन् रात्री 12-1 पर्यंत जागी असणारी पुण्य नगरी....अन् यामध्ये आत्ता सुरू होणार होता, स्पर्धेच्या जगातील  जीवघेण्या गर्दीतला कायमच धावपळीचा प्रवास......! जसं एसटीची चाकं फिरत होती, तसं डोक्यात विचारांचं काहूरही गरगर फिरत होतं.
     आता गाव , गावातील गल्ली, घर अन् अंगण हे सगळं सुटणार होतं, सुट्टी भेटली म्हणून कधी गावी आलोच तर तो ही कायमचा पाहुणा म्हणूनच येणार होतो, स्वतःच अंगण आता परका म्हणून पाहणार होतं, ज्या अंगणाने पाहिलंय माझं पहिलं पाऊल टाकताना लटपटणारे पाय, ऐकलंय माझ बोबड बोलणं अन् हासलही असेल मनोमन, हे तेच अंगण ज्याने पाहिलंय सुखद क्षण अन् दुःखद आठवणीही, यानेच दिल्या होत्या काही सुखद तर काही दुःखद जखमा आता त्याच अंगणात मी पाहुणा म्हणून परका तर होणार नाही ना....?? या विचारांनी डोकं सुन्न होत होतं अन् डोळ्यांच्या कडा ओलसर...!!
     गावातील उनाडक्या केलेले दिवस, अंगणातली बाग , पारावर बसणारी जेष्ठ मंडळींची बैठक अन् त्यांच्या गप्पा...!! सर्व -सर्व डोळ्यासमोर तरळत होतं, जसं-जसं एसटी शहर जवळ करत होती तसं तसं या माझ्या गावाच्या गोष्टीपासून दूर जात होतो...!!
जेव्हा कधी शहरातल्या गर्दीत एकटा हरवून जातो ना तेव्हा- तेव्हा प्रत्येकवेळी हाच प्रश्न आजही पडतो.
                    आपण गावाकडचे की शहराकडचे...?
     गावाकडचे म्हणावं तर आपण इथे फक्त सुट्टी मिळाली तर काही काळासाठीच येतो म्हणजे पाहुणे बनुनच...!!
अन् शहराचे म्हणावं तर शहर कधी आपलंसं वाटलंच नाही, इथं दिसते ती फक्त जीवघेणी स्पर्धा, जीव गुदमरून टाकणारी, इथली माणसांमध्ये कधी मायेचा ओलावा, आपलेसे पण कधी जांवलंच नाही...!!
     मात्र ना गाव सुटलं गेलं, ना शहराने स्वीकारलं....!!
     गावाकडचं निरागस प्रेम इकडं कधी दिसलं नाही अन् शहर बदलत गेली पण माझ्या गावाने धुळीची वाट सोडली नाही. आई-आजीने सारवलेली भिंतीतून येणारा पहिला पावसाचा सुगधं आजही विसरत नाही...
     आजोबांनी गायलेले भल्या पहाटेचे ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग अन् दिवे लागणीच्या वेळेचा हरिपाठ कानात आजही गुणगुणत राहतो, एक मृत्तिमंत भास देतो...!!बापाचा काम करून थकणारा देह आजही अंगणात आला की उत्साहित होतो...!!
कातरवेळीची शांतता अन् प्रसन्नता जाणवत नाही.
हे सर्व-सर्व आता चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत होतं
तसं शहरात यातलं काहीच अनुभवता येणार नव्हतं, इथं फक्त गर्दीतलं जीवमुठीत धरून जगणं अन् गाड्यांचे कर्कश आवाज, शांत झोप ही न येऊ देणारे... हे सगळं वास्तव होतं ते स्वीकारावच लागणार आहे....
अन् परत शहराकडे पावलं टाकावीचं लागणार आहेत .
न थकता ......!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, May 14, 2020

मनाच्या कप्प्यातून....!!

     मन काय असतं....??
     मन हे नुकतंच पाऊल टाकायला लागलेल्या बाळाचं अंगणातलं पहिलं पाऊल असतं, नाविण्याने नटलेलं...कुतूहलाच्या शोधात असलेलं , नाविण्याला चटावलेलं...!!
मन तोल सांभाळत, आधार घेत उत्साहाने पण घाबरत टाकलेलं पाऊल असतं...त्यात तितकाच अल्लडपणा, अगदी छुन-छुन वाजणाऱ्या पैंजनासारखा...
     मन असतं खळखळत्या झऱ्यासारखं ,परिणामांची पर्वा न करता स्वतःचा प्रवाह स्वतः निर्माण करणारं,
झऱ्यासारखं वाट मिळेल तिकडं धावणारं.
     मन असतं समुद्राच्या शांत दिसणाऱ्या पाण्यासारखं पण असंख्य भूकंपाचे धक्के अन् ज्वालामुखी पोटात साठवून सुद्धा शांत दिसणारं.....झालंच असह्य तर किनाऱ्याला जाब विचारणारं त्सुनामीसह
     मनाच्या वारू वर स्वार झालं तर वास्तविकतेचा लगाम घट्ट असावा लागतो नाहीतर अपघात अटळ असतो.
हेच मन हळवं असतं तर कधी निगरघट्ट मुर्दाड , सतत वास्तविकतेच्या जगात जगणारं.
     यात पायाखाली आलेली मुंगी पाहून डोळ्यात टचकन पाणी येणाराही असतो अन् आत्ताच जगाचा मायावी प्रवास संपलेल्याचं स्वतःच्या हाताने पोस्टमार्टेम करणाराही....!!
     जखमांनी घायाळ झालेला , ज्याने मरण जवळून पाहिलंय म्हणून भावनाशून्य मुर्दाड बनलेला योग्य की हळहळ व्यक्त करणारा, होऊन गेलेल्या क्षणांना कवटाळुन बसलेला...??
     गंभीर आरोप्याला फाशी देणाऱ्या जल्लादाच काय?त्याला  नसेल का मन, कधी फाशी देताना हात नसेल का थरथरला, अंग शहारून नसेल का आलं??
     मग प्रश्न उरतो, तो मन संवेदनशील असणं शाप की वरदान?
योग्य कोण, मुंगी पायाखाली आली म्हणून हळहळत बसणारा अवलिया की हा जल्लाद...?? एक कर्तव्य बजावतोय तर दुसरा सवेदनांनी भरलेला...!.
     दैनंदिन जीवनाच्या प्रवासात जगताना आपण सहज काही बोलून जातो एखाद्याला लागेल अशी कंमेंट्स देऊन मस्तवाल चालत राहतो...!! पण आयुष्यात कधी हा विचार मनाला स्पर्श करून जातो का ओ...!? आपल्या त्या शब्दांमुळे त्याचं मन दुखावलं तर नसेल ना?ते शब्द काटेरी बाणांसारखे त्याच्या काळजात खोलवर रुतले तर नसतील ना ??
                          नाही ना.....?
     बरोबर, एवढा विचार करायला आम्हाला कुठं वेळ आहे.
फोर व्हीलर घ्यायचीय, मस्त घर घ्यायचंय सो called luxurious life जगायचंय?? जसं कधींच या जगातून आपला प्रवास संपणारच नाही. आलीच तशी वेळ तर प्रेमाने कमावलेल्या माणसांच्या आठवणीत, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात थोडीच राहणार आहोत. दिगंतराचं गाठोडं बांधताना ही luxurious life घेऊन जायचीय होय ना ??
               आपण केलेल्या कृतीचा का विचार होऊ नये??
     त्याच्यावर आपण समर्थनार्थ म्हणतो मी सहज बोललो होतो, मग त्याने ही सहज घ्यावं अन् उपदेशपर आव आणत ऐटीत म्हणतो, असं किती लोकांचं मनावर घेणारयस...
                               गंमत आहे ना ??
      संवेदनशील मन असणारा एकतर रात्र रडत-कढत काढतो, दुःखाने विव्हळत असतो, नाहीतर मग सर्वांवर वार करत सुटतो... यात जवळची म्हणवणारी माणसंही भरडली जातात, दुरावली जातात. यात  आपण दूर जातो नाहीतर ते स्वतःहून दूर होतात.
चांगुलपणावरचा विश्वास डगमगतो. त्यांना मध्य साधता येत नाही, नव्हे नव्हे साधत नाहीत.
 एकतर हृदयात स्थान देतील नाहीतर परत वळुन पाहणार ही नाहीत...!! अशी माणसं जितकी संवेदनशील असतात तितकीच कट्टरही....!!
मग संवेदनशील असणं शाप की वरदान...?
     चालताना एखाद्यावर केलेला विनोद उडवलेली थट्टा योग्य की अयोग्य....त्याचं मन किती विव्हळत असेल याचा आपल्याला पुसटशी ही कल्पना नसावी....!!
     जीवन एवढं क्षणभंगुर असताना, उद्या काय होणार याची कोणतीच शाश्वती नसताना आपण का दुखावतो एकमेकांना...??
     पुढच्या क्षणी काय होणार याची कल्पना नसतानाही आपण एकमेकांविषयी आकस बाळगतो मनं दुखावतो.
'दिल खोलके' गप्पा मारत नाहीत, आपल्याच म्हणवणाऱ्या लोकांशी.....!!
      सहज बघा, तुम्ही दूरच्या प्रवासाला आहात अगदी अनोळखी प्रदेशात .. तिथं तुमचं असं कोणी नाही.
      पण जर तिथं भेटलेल्या व्यक्तीने तुमची आपुलकीने  खुशाली विचारली अन् एक गोड smile दिली तर तुम्हाला किती हायसंं वाटतं ना.
       मग तुम्हीही या प्रदेशात अनोळखीच अन् पाहुणेच आहात
मग का असावं आपण असं...?
का बोलू नये हृदयाच्या तळातून,भरभरून...!!!!
      दूर जाणाऱ्याला एकदा तोंडभरून हाक मारावी अन् एक प्रेमभराने मिठी मारावी, काय माहीत ती दूर चाललेली व्यक्ती परतवून येईल, पुन्हा नव्याने नात्याला पालवी फुटेल, बहरेल नातं पूर्वीप्रमाणे....!!
     प्रत्येकाच्या मनाचा-भावनेचा आदर व्हावा,तर जग खूप सुंदर दिसेल.
     आजच्या धक्काधकीच्या गर्दीत माणसं माणसानं भेटतच नाहीत. भेटतात ते मुखवटे घालून , त्यांना घट्ट चिकटलेल्या असतात आशा,आकांशा महत्वकांक्षा अन् हेतू .....!!
हेतू साध्य झाला की ती माणसं दूर निघून जातात. मग हळव्या मनाची माणस स्वतःचा त्रागा करून घेतात स्वतःला दोष देत राहतात...!! स्वतःला समजवावं ती माणसं कधी आपली झालीच नाहीत मग एवढा त्रागा का, उलट त्यांच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांची पुंजी जपून वापराची, संपत आलेल्या कुपितल्या अत्तराप्रमाणे...!! त्यांचं जाणंही अपरिहार्य असेल...!!
म्हणूनच आहेत तोपर्यंत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत,काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद?
   कोणीतरी म्हणून ठेवलंय....!!
"कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?
एकदाच ओंजळीत दे ना जाई जुई.........!"
अगदीच हळूवार नको राजरोष,
पाकलीच एक नको डवरले घोस,
पानासाठी कवितेच्या देना खुण काही,
एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई.
     खरंच कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?आयुष्य घटकाभराचं आहे...!!म्हणूनच
त्याला भरभरून प्रतिसाद द्या, प्रेम द्या.
वादाला संवादाची साथ
सादेला प्रतिसाद द्या,
शत्रुत्वाला मैत्रीचा हात,
द्वेषाला प्रेमाची साथ,
अंधारलेल्याला प्रकाशाची वाट,
कडक उन्हाला प्रेमळ थंड सावली ध्या,
कधी आपला प्रवास संपणार आहे हे माहीत नाही.
आहोत तोपर्यंत आकस का ठेवावं,भेटावं,बोलावं अगदी मनाच्या तळातून, खूप दिवसांनी भेटल्यासारखं प्रत्येकवेळी नाविन्यपूर्ण...!!!


#जिंदगी का फ़ंडा🍃

Friday, April 10, 2020

लग्न, बाप अन् बरंच काही....!!!

आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे हे लग्न...!!
अक्षदारूपी तांदळाचे चार दाणे काय अंगावर पडले की, दोन अनोळखी जीव आयुष्याचे जीवनसाथी होतात....!! काय गजब आहे ना...?
     काय ताकद आहे, बघा या अक्षदांमध्ये....!!
आजही बहुतांश ठिकाणी पोह्यांचा कार्यक्रम म्हणजे पाहण्याचे कार्यक्रम होतात..!
     अन् वयाच्या 23-24 वर्षापर्यंत एकमेकांना ओळखणं तर सोडाच पण पाहिलेलं ही नसतं...!!
     त्या 5-10 मिनिटांच्या संभाषणात इथून पुढचं आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं की नाही याचा निर्णय होतो...!!
वडीलधारी माणसं त्यात मूला मुलींना मोठ्यामनाने एकमेकांना बोलण्यासाठी गच्चीवर जाण्यासाठी दिल मोठा करतात...!!
काय विशेष आहे ना....??
     आयुष्याचा महत्वपूर्ण निर्णय बहुतांश ठिकाणी असेच 5-10 मिनिटाच्या ओळखीवर घेतले जातात....!!
     मग बघण्याच्या कार्यक्रमानंतर , एकमेकांच्या होकारांनंतर,असतो तो देवाणघेवाणीचा बाजार....!!
होय बाजारच...!!!
      नवऱ्या मुलाच्या बापाच्या अवाजवी मागण्या,हुंडा वैगरे, त्यात खेदजनक हे असते की नवरा मुलगा कितीही शिकलेला असलातरी आई-बापाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, याच्या आड सर्व गुपचूप स्वीकारत असतो.
     यात मुलीचा बाप, सर्व मागण्या कमी-जास्त करून मान्य करतो.
का.....??
    तर त्याच्या काळजाच्या तुकड्याचं, लेकीचं आयुष्याचं कल्याण होईल..
     ऐपत नसलीतरी सावकाऱ्याच्या दाराचे उंबरठे झिजवतो,
बँकेच्या कारकूनाला व्यथा सांगत,कर्ज काढतो. पण त्या पोटच्या पोरीच्या कल्याणासाठी, भल्यासाठी त्या नवऱ्याच्या, त्याच्या कुटूंबाच्या अवाजवी मागण्या, अन् त्याची हौस पूर्ण करतो....!!
     सावकाराकडून व्याजाने पैसे आणताना स्वतःला समजावत येतो, याने माझ्या लेकरांचं भलं होणार असेल तर असे कर्ज फेडण्यात आनंद असेल....!!
     या बापाच्या काळजाची कल्पना कोणालाच येत नाही,
आतून प्रत्येक क्षणाला तिळ-तीळ तुटत असतो..!!
     काळजाचा तुकडा आपल्यापासून दुरावणार, हे काळजावर दगड ठेऊन स्वतःलाच समजावत असतो...!!
     बापाची पाहुण्यांमडळींच आदरातिथ्य करण्यात दमछाक होत असते...!पण तो ही दमछाक कोणालाच कळू देत नाही.

कारण अर्धांगिनी जवळ बोलावं, तर ती खचेल,
पोटच्या लेकरांपुढे सांगावी, तर त्यांना त्यांच्या बापाची व्यथा  डोळ्यात  दिसेल...!!
म्हणून मनोमन पोटात ठेवून सर्व कार्य  करत असतो....!!
लग्नाची गोष्टच न्यारी असते हो..!!
       दोन घराचं नातं जोडलं जातं असं म्हणलं जातं
पण खरंच तसं आहे का....??
मुलीच्या बापाकडून फक्त घेतलं जातं, छोट्या-छोट्या भांडयांपासून ते सर्व मोठया गोष्टी ज्या की प्रत्यक्षता मुलाने कधी पाहिलेल्याही नसतात..!
मग का हा एवढा हव्यास, तो ही दुसऱ्यांकडून, मुलीच्या बापाकडून....??
     त्याने त्याचा काळजाचा तुकडाही द्यायचा, हुंडा द्यायचा अन् अवाजवी मागण्याही मान्य करायच्या ..??
तुम्हाला खाण्यासाठी त्याने दिलेल्याचं थाळीत खायची वेळ यावी...!!
तुमची एवढीशीही ऐपत नाही, तुम्ही घेतलेल्या थाळीत जेवण करता येईल.....??
अन् जर नसेल तर तुम्ही लग्न का करावं...??
    हुंड्याच्या बाबतीतही तेच, कपड्याचं तर सोडाच ,
पुढील वर्षभर पुरतील एवढे ड्रेस घेतले जातात.
कोणाकडून.....?? तर ते मुलीच्या बापाकडून....!!
      सुटा-बुटापासून सर्व गोष्टी मुलीचा बाप देणार असेल तर लग्न करण्याचा काय अधिकार....??
याला बाजार नाही म्हणावं तर आणखी काय...??
   एवढं सगळं करूनही त्या मुलीकडून अजाणतेपणी काही चूक झाली, तर त्या बापाच्या नावाचा उद्गार होतो....!!
कीती अजब आहे ना ....?
     एवढं करूनही जेव्हा बापाचा फोन आल्यावर लेकीचा रडका आवाज येतो ना, तेव्हा बापाला धरणी दुभंगल्याचा भास होत असेल....!!
त्या बापाच्या काळजाचा कोणालाच थांगपत्ता नसतो,
ते क्षणा-क्षणाला तुटत असतं...
     एवढं करूनही लेकीच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग आले, अघटित घडलं, तरीही पाय रोवून न डगमगता, आतून तुटत असलेतरी, मजुबत असल्याचा भास देऊन आधार देत असतात....!
बाप, जो लडखडत असलेल्या लेकराला आधार देत
बोटाला धरून चालायला शिकवतो, बोबड्या बोलाने बोलायला शिकवतो,नव्हे नव्हे जिंदगी देतो...!!
बाप , जो लग्नाची धामधूम झाल्यावर पाठवणीच्या वेळी, लग्नमंडपाच्या कोपऱ्यातल्या खांबाला डोकं टेकवून गंगा-यमुनेला वाट मोकळी करून देतो....
बाप ,जो कणखर आहे, असं म्हणलं जातं,
तोच बाप इतरांची नजर चुकवून डोळ्यातील अश्रुनां रोखण्याचा-पुसण्याचा भाबडा प्रयत्न करत असतो...!!
बाप, जो वेळोवेळी खड्याबोलात दटावलेलं, धमकावलेलं असतं, त्याच्याच मुखातून आज शब्दच फुटत नसतात कंठ दाटून आलेला असतो...!!
फुलपाखरू उडून जाणार हे माहीत असूनही....
ज्या लेकराला तळतावर बसलेल्या फुलपाखराप्रमाणे नाजुकतेनं सभाळलेलं असतं.
त्याच्या पाठवणीचा क्षण म्हणजे किती कठीण असेल
याचं वर्णन करणं महाकठीण....!!
     सर्वांची हौस करतो ती फक्त लेकीच्या सुखासाठी,
कोणापुढे कधीच न झुकणारा बाप लेकीसाठी झुकतोही....!!
हे सर्व लेकीच्या बापाला , लेकीलाच का सहन करावं लागतं..?
तर त्याला आपला समाजाची मानसिकता कारणीभूत आहे 
हुंडा, स्त्रीला दुय्यम स्थान अन् लग्नाच्या अवाजवी मागण्या यावर सुज्ञतेने विचार व्हावा....!!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 16, 2020

प्रवासात भेटलेले 'कवडसे'...!!!

       ईस्पितस्थळी पोहचताना आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या काळ्याकुट्ट  घनदाट जंगलातल्या अंधाऱ्या पायवाटेवरून चालताना, इथपर्यंतच्या प्रवासात जगलेल्या क्षणांचे कवडसे डोकावत असतात..!
        आपण त्या कवडसांबरोबर थोडाकाळ का होईना रमत गमत चालायचं असतं...! पण कितीवेळ रममाण व्हावं यालाही मर्यादा येतेच....
       काळ्याकुट्ट अंधाऱ्या वाटेवरुन चालताना , पाऊलवाट अगदी दिसेनाशी झाली तर हेच कवडसे वाटेत आशेचा किरण दाखवतात....अन् थोडावेळ का होईना, पाऊलवाट प्रकाशित करतात.. आपल्या साथीला आहेत याचा अभासातील भास देतात...!!
        त्यामुळे आयुष्यात जगलेले क्षण हे या कवडश्यांसारखं  काम करत असतात.....!
       कधी वाटलं, वाट दिसेनाशी झालीय तर, या क्षणांना जवळ करणं आवश्यक असतंय...!! वाट दिसेनाशी होते म्हणजे त्यात त्या वाटेचा दोष नसतोच, गरज असते ती दिव्य दृष्टीने पाहण्याची...!! गरज असते साथीची, आपल्या म्हणवणाऱ्या कोणाचीतरी...!!
अन् गरज असते ती स्वतःचा हात स्वतः आवेगाने घट्ट पकडण्याची, जो कोणत्याही कठीण प्रसंगी साथ सोडत नाही. दरम्यानच्या काळात जगलेल्या क्षणांच्या पाऊलखुणाच, आपली साथ निःसंकोचपणे देऊ शकतात अन्य कोणीही नाही अन् शहाण्याने ती अपेक्षा ही धरू नये...!!
         कवडश्यानीच का साथ द्यावी...??, कवडश्यांमुळेच अंधुक वाट का दिसावी...??  पूर्ण वाट लक्खं प्रकाशित का होऊ नये..?? याच्या फ़ंद्यात आपण पडायचं नसतं...!!
          दमून आलेल्या पंथास्त्याला वटवृक्षाने विचारलं आहे का की, तू माझ्याच सावलीत का विसावला...??  असं कधी ऐकीवात आहे का....? नाही ना, मग आपण ही निसर्गाची निर्मिती आहोत, आपण ही मीच का ?  हा सवाल विचारू नये, त्यात अडकू नये .....!!काही मिळणारही नाही ....!!! 
         जेव्हा प्रवासाला चालायला सुरुवात केली तेव्हापासूनच दऱ्या-खोऱ्यातल्या चढ-उतारांची, दगड-धोंड्यांची साथ होती, काट्या-कुपाट्या असणाऱ्या पाऊलवाटेवर रक्तबंबाळ झालेल्या पायांनी , माथ्यावर सूर्य आग ओकत असतानाही ईस्पितस्थळापर्यंतच्या प्रवासाचा महोत्सव करण्याचा निर्धार केलाय..
           यात माहीत नसतं  मुक्कामाचा थांबा कधी येणारय,अन् नंतर हळहळ व्यक्त करायला संधी नसावी म्हणून या प्रवासाचाही महोत्सव करत रमतगमत चालायचं , अनपेक्षित वळणं आलीतर वेगाला आवर घालायचा अन् एक-एक पाऊल टाकत राहायचं....!!
       यात चांगल्या-वाईट गोष्टींच्या पाऊलखुणा, उमटणारच आहेत.....!!
चांगल्या पाऊलखुणा, कोणालातरी प्रेरणा देत राहतील,

वाईट पाऊलखुणा,कोणालातरी शिकवण देत राहतील...!
पण या चांगल्या वाईट पाऊलखुणांचा, गणिताचे नियम वापरून हिशोब लावायचा नसतो , हाती काही लागत नाही.....

      जेव्हा कधी हा दिगंतरापर्यंतचा प्रवास सुरू केला, तेव्हाच कोणाच्या साथीची अपेक्षा नव्हती तरीही प्रवासात भेटलेल्या घनदाट जंगलातल्या अंधाऱ्या पायवाटेवर, काहीकाळ का होईना कवडश्यानीं साथ दिलीय, हेच ऊर्जा देणारं आहे, नवचेतना देणारं असतंय...त्यात समाधान मानावं....!!
         समाधानी जगण्यासाठी कशाचीच आवश्यकता नसतेय, गरज असते ती आपल्यावर असणाऱ्या दृढ विश्वासाची अन् जिद्दीची......!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 2, 2020

दुनिया स्वप्नांची....!!!

       Hey hey जिंदगी हा तूच-तूच...तुझ्यापेक्षा सध्या कोण आहे हाक द्यायला...!!
 कशी आहेस न तू...??
        किती ते स्वप्न बघण्यास भाग पाडते....
कितीतरी रंगरंगोटी करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे रंग, रंगपेटीमध्ये आणून ठेवते...!!
      आम्हीही भाबडी माणसं, त्या स्वप्नांच्यामागे जीव ओतून पळतो....!! मनलावून रंग भरतो, का...??, तर माझ्या स्वप्नातला दिवस अगदी रंगेबिरंगी उत्साहित, प्रेरित करणारा असावा...!!
यात तुझा तो काय दोष....!?
      तुझं तू काम केलंस रंग दिले, रंग पेटीही दिली, आत्ता आम्हाला ते रंग कोणत्या पृष्ठभागावर उमटवायचे, ते आमचं-आम्हीचं ठरवलं पाहिजे...!!!
       किती असतो, हा स्वप्नांचा पसारा, किती छान बेत असतात जगण्याचे...!!! आप्तस्वकीयांची, आपली, आपल्या म्हणवणाऱ्या आपल्या लोकांची, भरमसाट स्वप्ने ...!!
         पण ही स्वप्ने सत्यात उतरवण्याची धमकही असतेच की आपल्याकडे...!
      पण जीवनात कधी-कधी अश्या गोष्टी घडतात की,आपली स्वप्नच स्वप्नांच्या हवाली करून, आपली वाट सोडून, आपल्या माणसांसाठी, काही काळासाठी, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात ...!!
          पण मग कधी एकांत मिळालाचं तर आयुष्यात आठवणी बनून गेलेली, जीवनरुपी पुस्तकाची पान चाळायला घेतली तर अगदी हरवून गेल्यासारखं होतं..!!
         जीवन जगण्याचे किती छान बेत होते,
         किती तो स्वप्नांचा पसारा...!!!
         कुठंतरी मी जात होतो, तर कुठं नियती घेऊन जात होती..!!
         काय योजलं होतं अन् काय मिळालं?
         कुठं पोहचायचं होतं अन् कुठं येऊन पोहचलोत?
        याचा हिशोब लागता लागत नाही, या विचारांच्या भाऊगर्दीत  अनुभुती येते ती गर्दीतल्या एकांताची....आत्मपरीक्षणाची.... स्वप्नांच्या रंगरंगोटीची...!!
          पण पुन्हा स्वप्नाच्या पाठीमागे नक्की धावू, तेवढी ऊर्जा नक्कीच आहे.नव्या जोमाने कामाला लागू तीच ऊर्जा तीच धमक...!!
         जीवनातल्या थोड्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर स्वप्नांवर तुटून पडून ते नक्कीच वास्तवात आणू एवढी धमक नक्कीच आहे....!!
         हरलोय का जिकलोय हाच प्रश्न ठाण मांडून उभा असतो तो उसंत घ्यायला तयारच नसतो..!!
     अश्यावेळी गरज असते आत्मपरीक्षणाची स्व-ओळख करण्याची...!!
पुन्हा नव्याने रंगपेटीत रंग भरण्याची अन् नव्या जोमाने स्वप्न रंगवण्याची ....!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, February 23, 2020

वसुंधरेकडून घेऊ काही ....!!!


      कसा असतो ना निसर्ग ....!! झाडाची पूर्ण पानं गळून गेले तरी नाउमेद न होता, नव्या जोमाने सुरवात करतो अन् तीच ऊर्जा तोच गोडवा घेऊन सर्वांना आनंदित करतो...!!
       झाडाचं गळून पडलेलं प्रत्येक पान जाता-जाता छान संदेश देऊन जातं, मी  जातो आहे, पण माझ्या जाण्याने नवनीनिर्मितीचा कोंब फुटणार आहे,नवीन पालवी फुटणार आहे अन् याच आनंदात मातीत मिसळून जातं मातीचं होतं.!!
     नवनिर्मितीची हे संक्रमण हे कोणाच्यातरी त्यागातून कोणाच्यातरी निस्वार्थी,समर्पणाच्या भावेतूनच चालू राहत असतं.
याच गोष्टी जर निसर्गाची निर्मिती असणाऱ्या मानव मध्ये आल्यातर निसर्ग जसा नवप्रेरीत करणारा , नाविन्याचा ध्यास असणारा सृजनशील आहे. तसाच मानव ही सृजनशील, नवप्रेरीत अन् नाविन्यपूर्ण असेल..!
पण आपल्याला स्वतःची तर सोडाच पण निसर्गाकडूनच मिळालेली गोष्ट देण्यास आपण कचरतो.
निसर्गाकडे पाहीलं तर खूप प्रेरणा मिळते, पण आपण चांगलं लवकर घेत नाहीत, स्वीकारत नाहीत.
जे स्वीकारायला पाहिजे, ते अंगवळणी पडत नाही अन् पडलंच तर ते समाजात रुचत नाही.
म्हणूनच माणूस हा प्राणी निसर्गाची निर्मिती असूनही निसर्गासारखं पारदर्शक, दानशूर, निस्वार्थी कधीच होत नाही, होता येणारही नाही...!
   आपणास विंदा करंदीकरांची कविता पूर्णत्वाने लागू होते.
        "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे"
        "घेता-घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे"
माणसाला आणखी एक  भा.रा. तांबेच्या कवितेचं बिरुद लावलं जातं की जे साजेसंच आहे...!!
        'जो तो वंदन करी उगवत्या,'
        'जो तो पाठ फिरवि मावळत्या,'
        'रीत जगाची ही रे सवित्या'
       "स्वार्थपरायणपरा |"
पण त्याच निसर्गाची निर्मित्ती असणारी पानं, फुलं, फळांच्या बाबतीत असं कधी होत नाही.
      त्यांचा परोपकारी, निस्वार्थी बाणा आपणास छान संदेश देऊन जातो. फक्त पाहणाऱ्याने त्या-त्या नजरेनं पाहावं....!!
      काही सुगंधी फुलांकडे सौंदर्य असेलचं असं नसतं अन्
काही दिसायला मोहक असतात पण ते सुगंधी असतातच असं नाही..!!
पण आपण इथंही अपेक्षा करतो की सुंदर दिसणाऱ्याने सुगंधितही करावं
कसं शक्य आहे....!!??
       ज्या झाडाने फळातील गोडवा द्यावा त्यानेच कसं वाटसरूस शीतल छाया द्यावी....!!
       भल्या पहाटे उठून निसर्गाच्या सानिध्यात एक फेरी मारली तर  निसर्गाचा नवीन आविष्कार अनुभवण्यास मिळतो.
तो पक्ष्यांचा किलबिलाट, दूरवरून ऐकू येणारी कोकिळेची कुहुकुहू , असाच दूरवरून संदेश घेऊन येणारा, पानांची शीळ वाजवणारा, मंद थंडगार वारा..! त्याची झुळूक जेव्हा सर्वांगाला स्पर्श करून जाते ना, तेव्हा कोण्या एका प्रियकराने किंवा प्रियसीने फुंकर मारल्या नंतर जी आवर्तने निर्माण होतात अन् पूर्ण अंग शहारले जातं तसा भास होतो...!!
        नंतर पूर्वेकडून क्षितिजाआडून आकाशाला त्याच्या रंगानी नाहून टाकणारा सुवर्णगोल पूर्ण आभाळ तांबूस रंगाने रंगवतो अन् आदल्या दिवसापेक्षा जास्त तेजोमय उत्तेजित दिसतो. तेव्हा तो क्षण पाहणं अवर्णनीय असतं ...!!!
तेव्हाच पक्षी आपल्या पिल्लांसाठी खाऊ आणण्यासाठी उंच आकाशी फरारी घेतात, तो क्षणही  तांबूस रंगात लोभनिय वाटतो...!!
      अन् हीच निसर्गाची देणगी दिवसभरासाठी पुरून उरते....
पण माणूस दिवसभराच्या कटकारस्थानाने थकतो
त्याला परत उत्तेजित करण्यासाठी असते ती कातरवेळ..!!
   दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ म्हणजे कातरवेळ.
पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल दिसू लागला की सुरू होतो सूर्यास्ताचा अटळ उत्सव. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त उधळण होते . नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण होते.
      सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....... या कातरवेळी प्रत्येकाला हवा असतो एकांत ....एक स्वतःचा क्षण....त्यावेळेस त्याला भान हरपून शांत बसणं पसंद असतं....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, December 23, 2019

अडगळीतलं सोनं...!!!!

      आज रात्रीचं जेवण झाल्यानंतर, मांजरी रोड वर शतपावली करावी म्हणून चालत होतो...!!
      तेव्हा एक दृश्य मनाला छेदून गेलं , त्याच्यांकडे लक्ष जायला कारणही तसंच होतं...!
       साधारणतः 70-75 वय वर्षे असणारे आजोबा हातगाडीवर मेथीच्या 20-25 जुड्या घेऊन विकण्यासाठी बसले होते , त्यांना साधं उभाही राहता येत नव्हतं, तरीही ते स्वतः ला संभाळत हातगाडी पुढे-पुढे ढकलत चालत होते....!!!
मग मनात असा प्रश्न पडला , कुठून येते यांच्याकडे एवढी ऊर्जा...!?
     आयुष्यभर कष्ट केलेलं असतं, कारण की आयुष्याच्या संध्याकाळी थोडे-थोडके सुखाचे दिवस येतील, दोन घास आनंदाने खाता येतील, नातवंडांबरोबर लहान होऊन जगता येईल, कोडकौतुक करता येईल...!!!
     या आजीं-आजोबांनीही हीच स्वप्ने पहिली असतील, यांनीही ऐशोआरामी जीवन जगण्याचे छान बेत केले असतील, आयुष्याची संध्याकाळ आपल्या प्रियजनांबरोबर घालवण्याची स्वप्न रंगवली असतील . पण मग या वयातही का असावी ही व्यथा ...!!
त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी तर इतर खूप साधनं होतीच की, वृद्धाश्रम होते, मंदिर -मज्जीद होती....!!
पण मग त्यांनी ही वाट का निवडावी...??
      तर याच्यासाठी माझ्या आकलनांनुसार एकच शब्द होता अन् तो म्हणजे "स्वाभिमान"...!
     "उतार वयातील व्यक्ती म्हणजे वय झालेलं उपजत बालकचं...!!"
      सगळं साथीनं करत असताना काबाड कष्ट करून त्यांच्या लेकरांची पोटाची खळगी भरवलेली असतात.
      आयुष्यभर केलेल्या तडजोडी, उपभोगलेले मान , पचवलेलं अपमान, झेललेली अवहेलना, अन् भोगलेली दुःखं....!!!
यामुळे त्यांची सहन करण्याची क्षमता संपलेली असते. आपल्याचं लोकांकडून आलेले बोल, त्यांना अनुकूचीदार बाणांसारखे हृदयात खोलवर रुतत जातात अन् ती जखम घेऊन चालणं आता अशक्य होतं...!
      ज्या लेकासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र केली,  त्याच्याकडुनच आज अवहेलना सहन करावी लागतेय...!
      मग जागा होतो तो स्वाभिमान, जो जपण्यासाठी आयुष्यभर धडपडत होते, आयुष्यभर त्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला , म्हणून मग आतातरी होऊ द्यायचा नाही...!! समाजातील असे आजोबा-आजी सत्तर पंचाहतरीनंतरही तरुण असलेले, आयुष्याच्या संध्याकाळचं चिरतरुण जीवन जगतात.......!!
       कोण हातगाडीवर भाजी घेऊन बसतं, कोण केळी घेऊन खणखणीत आवाजात केळी घेण्यासाठी आरोळी देतंय तर कोण आणखीही गावातल्या वाण्याकडे भाकरी वारी हमाली करतंय...!!
कोण मंदिराची साफ -सफाई करतंय, कोण मार्केटवर काही काम करून, पण स्वाभिमानाने ताठ मानेने तरण्याबांड पोरासारखं ऐटीत चालतंय...!
     पण काही जीवनात हार मानतात, आहे ते दिवस ढकलायचेत म्हणून चालतायतं, आधुनिक म्हणणाऱ्या गर्दीतल्या समाजाबरोबर....
      तर काही आजी-आजोबांच्या आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात गर्दी करताना दिसतेय हो ..!!
      पेपरात , दूरचित्रवाणी वर खूप कहाण्या वाचायला , बघायला मिळतात. नोकरीच्या ठिकाणी घेऊन जातो म्हणून आलेला लेक गावकडचं घरदार, शेत विकून, आई-बापाला स्टँड वर सोडुन गेलेल्या घटना जेव्हा घडतात तेव्हाही हाच प्रश्न पडतो , "हेच का लेका तुझे प्रेम...तुझ्या आई-बापावरचं ...!!"
हे दिवस बघण्यासाठीच का रे, त्यांनी तुझ्यासाठी पोटाला चिमटा घेऊन तुला तालुक्याच्या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या तारखेला एसटी ड्रायव्हरकडे कापडात गुंडाळून पैसे पाठवले ...?
अरे लेका त्यांना तुझ्याकडून काहीच नकोय रे, फक्त दोनवेळची भाकरी अन् दोन आपुलकीचे शब्द..!!
        पण समाजात खूप विदारक चित्र आहे , नातवाकडे जे संस्कारांचं संक्रमण होतं, त्यासाठी आजी-आजोबांसारखं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंच नाही.
       पण खेदजनक हे आहे की या आजी आजोबांची जागा मोबाईलने घेतलीय असं वाटतंय.....!!
     समाधानी आयुष्य जगण्यासाठी कशाचीच गरज लागत नाही...
जिद्दीला तरुण ठेवलं तर कायम समाधानी आयुष्य जगता येतं...!!
स्वाभिमानी माणसं अशीच असतात सदा सर्वदा तरुणाई फुललेली असते ....!!
    जी दिसतेय या जेष्ठांकडे, अनुभवाचं भांडार अन्  आयुष्यभर पुरून उरेल अशी संस्काराची शिदोरी असलेल्या आजी-आजोबांमध्ये....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

सर्द भिजलेला....!!!

ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...